Jul 21, 2013

'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!

आप्पा जोशी वसईवाले (वाचक, दैनिक 'परखड')
दिनांक: १६ ऑगस्ट १९७५

काल गावातल्या एकमेव टॉकिजमधे 'शोले' हा अप्रतिम बोलपट पाहिला. बाहेर डकवलेल्या पोस्टरावर ७० एमेम, सिनेमास्कोप असे काहीबाही लिहीले होते त्याचा अर्थ कळला नाही. बायोस्कोप पाहिला होता लहानपणी, पण हा सिनेमास्कोप काय हे कळायला काहीच स्कोप नव्हता. चित्रपटाची रिळं जास्त होती त्यामुळे पडदाही नेहमीपेक्षा मोठा लागला बहुतेक त्यांना. चित्रपट सुरु झाल्यावर पडद्यावर वर व खाली आडव्या पट्ट्या दिसत होत्या. झाकायचाच होता तर भव्य पडदा असे कशाला लिहायचे? असो. माझ्या बाजूच्या प्रेक्षकाचे आवाज डावीकडच्या का उजवीकडच्या स्पीकरमधून येतोय इथे जास्त लक्ष होते. 'श्टिर्यो' का कायसं म्हणत होता तो इसम. असो.

तरीही सामाजिक प्रश्नांना हात घालणारा 'शोले' हा अतिशय वास्तवदर्शी चित्रपट आहे असं माझं वैयक्तिक मत झालं आहे. 'विधवा विवाह' हा सामाजिक प्रश्न हाच चित्रपटाचा मुख्य विषय! बाकी डाकू-बिकू म्हणजे आपलं ताटातलं तोंडीलावणं आहे. ते जर नसतं तर 'ग्रामजीवन' व 'ग्रामोद्योग' ह्यावर एक अप्रतिम डॉक्युमेंटरी झाली असती.

'राधा' ही विधवा व 'जय'शी तिचा होऊ घातलेला विवाह हा मुख्य विषय आहे. खरं म्हणजे ह्याला विवाहबाह्य संबंध अशी कुणी दुषणे देईल. पण 'राधा'चा नवरा आधीच 'कालबाह्य' झाला असल्याने त्यांचे प्रेम 'विवाहबाह्य' होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.

अर्थात 'जय' चे पात्र जरी वरकरणी हुशार व चतुर वाटत असले तरी ते तसे नाही असही माझं वैयक्तिक मत आहे. आता ख-या आयुष्यात जी आपली बायको आहे ती चित्रपटात बदलायची सोन्यासारखी संधी मिळाल्यावरही पडद्यावर पुन्हा तीच बायको म्हणून मान्य करण्याचा मूर्खपणा जय करतो. मग काय होणार! 'आपले मरण पाहिले म्या डोळा' असे म्हणण्याची वेळ येते. एखादी 'भाग्यरेखा' एखाद्याच्या हातातच नसते. त्यामुळे तीच ती कंटाळवाणी बायको पदरी पडते. शिवाय आधीच्या सगळ्या पांढ-या साड्या असल्याने लग्नानंतर रंगीत साड्यांचा खर्च वाढणार! नशीब एकेकाचं…