Oct 9, 2011

देवास पत्र !

प्रिय देव,

हाय ! वॉट्स अप ?

सॉरी.. म्हणजे 'साष्टांग नमस्कार !' असं काहीतरी तुझ्या सरावाचं गंभीरपणे लिहीणार होतो. पण लोकप्रिय देवळात (‘जागृत देवस्थान’ फेम) पुजारी सदृश्य घामट्ट लोक असतात ना आणि ते भक्तांना नीट दर्शन घेतलेले नसतानाच अंगणात घुसलेल्या गुराला हाकलावे तसे पुढे ढकलतात ना, अगदी तसेच माझे पत्र ‘टिप्पिकल’ दिसतयं म्हणून न वाचताच पुढे ढकलून देशील असे वाटले.. म्हणून जरा लक्ष वेधून घेतले. तर ते असो.

वॉट्स अप ? ‘वरती’ काय चाल्लंय ? काय कसं काय एकूणात ?

हे असं म्हणजे एक विचारण्याची पद्धत आहे.. कारण तसं एकूणात तुझं बरंच बरं चाललं आहे हे दिसतचं आहे ! माझंही ठीक चाललय म्हण ना. लौकिक अर्थाने (म्हणजे अलौकिक अर्थानेही असेन कदाचित) मी ब-यापैकी सुखी वगैरे आहे.

अर्थातच ही सारी तुझीच कृपा रे बाबा ! (असंही एक म्हणण्याची एक पद्धत आहे तेव्हा लगेच शब्द्श: घेऊ नको ! कारण आम्ही सगळेच जण तुझीच 'प्रॉडक्टस' आहोत तेव्हा थोडा फार ‘मेंनेटन्स’ करण्याची जबाबदारी तुझी नाही का ?) पण नाही, आभार प्रदर्शनासाठी मी हे पत्र लिहीले नाही.
होतं काय की तूच दिलेल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून जगात एकूणच जे काही चाललं आहे ते समजतं... बोचणारं, खुपणारं.. मनाला भसकन भोसकणारं. हे सर्व म्हणजे गरिबी, क्रौर्य, अस्वच्छता, अन्याय, धर्मांध/सत्तांध श्वापदं, अंसवेदनशीलता... त्यातून निर्माण होणा-या वेदना, निराशा, चिंता, मनस्ताप, लाचारी, हतबलता वाहणारी माणसं. प्रत्येकाचे ओझे वेगळे.. रस्ते वेगळे, काटे वेगळे.
हे सगळं.. बघवत नाही रे ब-याच वेळा. म्हणून तुला पत्र लिहीण्याचे ठरवले. काहितरी केले पाहिजे ना ? दुस-यांची दु:खं नुसताच पाहत राहिलो तर तुझ्यात आणि आमच्यात काय फरक राहिला ?
रिअली.. थॅंक गॉड की मी देव नाही ! तूझेच आभार तू मला 'तू' न बनवल्याबद्दल !
बरं सर्वात आधी एक गोंधळ दूर कर बघू.. नक्की कुणी कुणाला तयार केलं ?

म्हणजे.. तू आम्हाला का आम्ही तुला ?


Oct 3, 2011

तीच ना ती ?

लाल हिरवे, कधी निळे वस्त्र ल्यालेली
कांती ती सावळीशी, सोन्यात न्हालेली

बर्फाळ थंडीतच, तारुण्य फुलते तिचे
गारठते कमनीय कोमलांग नितळ तिचे

वस्त्र जरासे तोकडे, चिकटून अंगास बसते
सख्यांसवे खेळता, कधी ती किणकिण हसते

त्या थंड तुषारांत, अशी ती थिजलेली
नायिकाच जणू ती, पावसात भिजलेली !

सलज्ज उभ्या तिने, धरला अबोला जरासा
उघडता मुखकमल होई सुंदर ध्वनी खासा

फेसाळत उसळली अन ती यौवनलाट आटली
लोकहो, सावरा ! ही तर बिअरची बाटली !


- राफा


Sep 26, 2011

Aug 5, 2011

नवीन चित्र


माध्यम : जलरंग (Watercolor)

(प्रेरणा: प्रसिद्ध चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांचे जलरंगांविषयीचे पुस्तक)


Jul 11, 2011

नवीन चित्र




माध्यम : जलरंग (Watercolor)


Mar 30, 2011

गल्ली क्रिकेटचे नियम !

गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.

गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.

गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:

  1. केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
  2. गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
  3. सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
  4. चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
  5. जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
  6. पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
  7. ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
  8. ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
  9. ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
  10. ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
  11. उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
  12. भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
  13. ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
  14. क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
  15. ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
  16. त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
  17. उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
  18. दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
  19. ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
  20. जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
  21. एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.


- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


Mar 29, 2011

त्या दिव्याखाली..

माझ्या घरासमोरच..

त्या पांढुरक्या, क्षीण दिव्याखाली
संध्याकाळी जमतात
रोज तीच ती..

जवळजवळ विझत आलेली माणसं.

सुरकुतलेल्या हातांची,
भेगाळ चेह-यांची,
कृश, थरथरणा-या शरीरांची

अजूनही जिवंत असणारी..  ती माणसं.

सुकल्या, पराभूत तोंडांनी
आजूबाजूला वाढणा-या अंधाराकडे बघणारी,

कुठेतरी शून्यात नजर लावून
आयुष्याच्या चुकलेल्या गणिताची
पायरी न पायरी मूकपणे
पुन्हा पुन्हा तपासणारी,

रोज एकत्र जमून, एक शब्दही न बोलता
तशीच परत जाणारी..

ती माणसं..

त्यांचे गेले ते बहुतेक दिवस
कठीण. शुष्क.
खड्यांसारखे..

वेचून वेचून फेकून द्यावेसे..
पण तेच आठवून आठवून सारवत बसतात

ती माणसं..
रोज संध्याकाळी..
त्याच पांढुरक्या क्षीण दिव्याखाली.

अचानकच,
मधेच कुणाला तरी आठवतो
कधीतरी आलेला, एखादा.. अगदी एखादाच,
शुभ्र तांदूळाच्या दाण्यासारखा एक दिवस.

त्या दिव्याखालच्या अंधाराला
मग दोन चार शब्द फुटतात
काही क्षण लकाकतात बोलणाराचे डोळे
काही क्षण तरारतात ऐकणा-यांची मने

आपण नियतीला आयुष्यात एकदाच
पण कसे अगदी साफ हरवले..
ती अस्पष्ट कहाणी ऐकताना
काहीसा सुखावून
तो दिवाही फरफरल्यासारखा वाटतो

काहीच क्षण..
मग पुन्हा अस्पष्ट प्रकाशात,
अंधार ठळक जाणवू लागतो..

..

तो डोक्यावरचा पांढुरका क्षीण दिवा,
आता लवकरच जाईल..

पण वाटतं,

तरीही जमतीलच रोजच्या रोज
ती माणसं..
तो नि:शब्द काळोखच बहुतेक
त्यांना उबदार वाटतो आताशा


विझत आलेला दिवा शेवटी शेवटी
अंधाराचा मित्र होत जातो..


- राफा


Feb 23, 2011

कुठल्या विषयाचा तास ?

लाल स्कूटीवालीकडे पाहताना
माझा मित्र ह्या जगात नसतो
दूरवरची स्वप्ने रंगवताना तो
नवकाव्याइतका गूढ हसतो..

खरं तर ‘ती’ ह्या विषयात तो
तोंडी नि लेखी परिक्षा देईल
अगदी एकही मार्क गेला तरी
काय वाट्टेल ती शिक्षा घेईल

पण ओळख कशी करावी
हे गणित त्याला सुटत नाही
ह्या आर्किमिडीजच्या तोंडून
‘युरेका’ काही फुटत नाही

हे असे सामान्य ज्ञान कमीच
म्हणून प्रयत्नाना बसते खीळ
कोण? कुठली? जाणण्यासाठी
मग होतो तो अगदी उतावीळ

मी म्हणतो, तिची माहिती काढूच..
पण सध्या जरा शांत रहा ना..
तिच्या घराण्याचा इतिहास जाऊ दे
तू आत्ता समोरचा भूगोल पहा ना!

जोशात येऊन तो गर्जतो ह्यावर,
नको जॉग्रफी आणि नको हिस्ट्री!
जाऊन थेट विचारतोच तिला
मग जुळेलच आमची केमिस्ट्री!

आता बघशील, लवकरच आम्ही
लग्नात एकमेकाना घास देऊ
आणि रात्री प्रौढ साक्षरता वर्गात
शारीरिक शिक्षणाचा तास घेऊ !


- राफा

 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


Dec 20, 2010

लोकशाहीचा लोचा आणि बकासूर !

मुलांनो,

आज मी तुम्हाला बकासुराची गोष्ट सांगणार आहे !

अरे अरे ! किती ओरडताय ! विधानसभेत आहोत का आपण ? डस्टर कुणी पळवले इथले ?

गोष्ट ऐकायची आहे ना ? ऐका तर. एकचक्रा नगरीच्याबाहेर जंगलात एक बक नावाचा एक बोनाफाईड राक्षस रहायचा. तोच बकासूर ! तो एकचक्रा नगरीच्या लोकांना अतिशय त्रास देत असे.

नाही बरे ! आपल्या वाढदिवसाची पोस्टर्स लावून आपला मनमिळावू व सात्विक चेहरा सतत दाखवण्याइतका काही तो क्रूर नव्हता... तो फक्त माणसे व पाळीव पशू वगैरे पकडून खाऊन टाकी ! पालिका कर्मचा-यांना स्वप्नात दृष्टांत झाल्यासारखे ते अनधिकृत बांधकामे एके दिवशी अचानक पाडू लागतात त्याप्रमाणेच, तो लोकांची घरे पाडून टाकी, नासधूस करी पण अगदी रोजच्या रोज.

हो अगदी रोजच्या रोज ! आपण कसे पेपरमधे रोजच्या रोज राजकारण्यांचे घोटाळे वाचतो, आणि मग रस्त्यावर त्यांचेच ‘आमचे तडफदार नेतृत्व’ अश्या लेबलाखाली कुठल्यातरी दिशेला एक बोट केलेला होर्डींगवरचे फोटो बघतो नि खाली त्यांच्या ‘शुभेच्छुक’ रानदांडग्या बगलबच्च्यांचे फोटो पहातो आणि त्याचा कसा रोजच्या रोज आपल्याला वैताग होतो… अगदी तस्सेच एकचक्रानगरीतले लोक वैतागून गेले होते अगदी.

मग ह्यावर त्या लोकांनी तोडगा, म्हणजे ज्याला आधुनिक सुसंस्कृत समाजात आपण ‘मांडवली’ म्हणतो, तो काढला.


Dec 17, 2010

विडंबन : ‘मालवून टाक दीप’

‘मालवून टाक दीप’ चे विडंबन 

(सुरेश भटांची क्षमा मागून)


(अमानूष केस व दाढी-मिशा वाढलेला इसम न्हाव्याला म्हणतो आहे…)


भादरून टाक नीट, कर्तनात हो तू दंग
नापिता किति दिसात, पाडला बळेच भांग

ह्या अशा जटा बटांत, चेहरा लपे तो आत
हाय तू हसू नकोस, दिसतो मी जरी भणंग

लांब लांब दोन हात, गेला हा संभार व्हात
सावकाश घे कापून, कठीण हा जरी प्रसंग

फार फार ह्या हवेत, उडूनी दाढी झोके घेत
मोकळी करून टाक, घेई वस्त-यास संग

हे तुला तेव्हा कळेल, दिसताच मी कोणी पळेल
काप ना केस हे बरेच, पालटू दे रुपरंग

काय हा तुझा मसाज, नाजूक का इतुका आज
बडव रे लावून तेल, मस्तकाचा कर मृदुंग


- राफा



 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Dec 1, 2010

पुणेरी पाट्या आणि मॅक्डी !

 


‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?



• आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.


• ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)


• दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.


• कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.


• टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.


• टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.


• कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)


• गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)


• पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.


• कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.


• विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.


• शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.


• दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.


• उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.


• हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)


• आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)


• कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.


• शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.




- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Nov 26, 2010

..मग कसाब अजून जिवंत का ?

जे सांगायचे आहे ते २६/११ च्याच निमित्ताने.

गेल्या दोन वर्षांत, जेव्हा जेव्हा आठवण होत होती, विषय निघत होता तेव्हा तेव्हा मनातला खदखदणारा अंसतोष डोकं वर काढतच होता.

कसाब अजून जिवंत का ?

दोन वर्षांपूर्वी २६/११ चा जो अभूतपूर्व हल्ला मुंबईमधे झाला, तो भ्याड, निर्घृण, नियोजनपूर्ण आणि तरीही सर्वसामान्यांस भयभीत करणारा random असा होता.

अपेक्षा काय होती ?

(‘पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून एकदाचे संपवा त्याना’ असा सोप्पे सर्वसाधारण जनमत बाजूला ठेवले तरीही) :
लोकांच्या भावनेचा आदर करून, ज्या अतिरेक्याला जिवंत पकडले आहे त्यासंबंधी विशेष कायदा नसेल तर तसा लवकरात लवकर करून (तासांच्या / दिवसांच्या हिशेबात)
खटला न चालवता त्याला मृत्यूदंड देणे ! अभूतपूर्व हल्ल्याला उत्तर म्हणून अभूतपूर्व असे शौर्य, कार्यक्षमता व निर्धार दाखवण्याची सहाजिक अपेक्षा !

झाले काय ?

सर्वांनाच माहित आहे. पोकळ वल्गना, लाल फीत, उद्वेगजनक दिरंगाई वगैरे. वर मिडीयाने दिलेल्या बातम्या. बिर्याणी मिळते वगैरे. जखमेवर तिखटमीठ चोळल्यासारख्या. ज्या मंदपणाने आणि असंवेदनशीलतेने सत्तेतले जबाबदार लोक ह्याबाबत मुलाखती देत होते/असतात (किंवा त्याहून वाईट म्हणजे संपूर्ण मौन बाळगत असतात.. मग लोकक्षोभ किती का होईना) ते भयंकरच आहे.


आज काय परिस्थिती ?

रीतसर खटला चालून कसाबला फाशीची शिक्षा झालेली आहे.
पण अंमलबजावणी केव्हा होणार ? माहित नाही.
त्याला इतके दिवस जिवंत का ठेवला आहे ? माहित नाही.

कारणे काय असू शकतील ?

काही व्यूहात्मक कारण असू शकेल का ?

खरे म्हणजे सरकारकडे डोके आणि मन ह्यापैकी कुठलाही ऐवज आहे अशी पुसटशी शंकाही येत नाही त्यामुळे ह्या पातळीवर कुणी विचार करत असेल असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आंतरराष्ट्रीय संबंधांचा, दहशतवादाचा ज्यांचा अभ्यास आहे अश्या तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार त्याला जिवंत ठेवला आहे असे गृहीत धरू !

पण का ?

मुद्दा असा आहे की पटण्याजोगे खरे (किंवा खोटे सुद्धा) कारण लोकांना देण्याचीही तसदी सरकारने घेतलेली नाही.

हे अक्षम्य आहे !

लोक रक्त आटवून सांगत आहेत की त्याला लवकर फाशी द्या. ब-याच लोकांना हेही कळते की तो काही पाकपुरस्कृत दहशतवादावर कायमचा उपाय नव्हे. पण ते प्रतिकात्मक आहे ! आमच्यावर हल्ला केला तर आम्ही एकजुटीने मुकाबला करू व सर्वोच्च शिक्षाच हल्लेखोरांना देऊ (छुपे युद्ध पुकारले तर तात्काळ व चोख प्रत्युतर देऊ. उघड युद्ध केलेत तर कायमचा बंदोबस्त करु)

कसाबच्या फाशीने हा संदेश जाणार आहे. जायला हवा. कसाब राक्षस आहेच. पण अर्धशिक्षीत, बेकार युवकांना राक्षस बनवून पाठवणारे नराधम आज पाकिस्तानात आहेत. नाहीतर कसाब व इतरांना मरणाची फिकीर नव्हतीच व त्यांचा अंतही त्याना माहीतच होता. (ताजमधल्या हल्ल्यातून वाचलेली एक फिरंगी वयस्कर महिला म्हणाली होती ‘की आता मला त्यांची कीव येते… ‘doped-up kids who were brainwashed and made into dispensable robots’)

आता मात्र भारत सीमा ओलांडून लष्करी व निर्णायक कारवाई करेल अशी भिती वाटल्याशिवाय पाकिस्तान सरकार त्यांना लगाम घालणार नाही. कमीतकमी सहाय्य तरी करणार नाही. (कारण दीर्घ काळ चालणा-या अशा उघड युद्धात आपले काही खरे नाही हे त्यांनाही माहित आहे)

मग कसाब जिवंत का ?

कसाबकडून सर्व महत्वाची माहिती आत्तापर्यंत नक्कीच घेऊन झाली असणार. त्याचे documentation झाले असणार विविध स्वरुपात (कबुलीजबाब, पुरावे , माहिती ह्यांची कागदपत्रे, ध्वनिचित्रफीत वगैरे). त्या दृष्टीने त्याचा उपयोग संपला आहे.

त्याला पन्नास वर्षांनी फाशी दिले तरी ‘तो पाकिस्तानी नव्हताच व त्याचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता’ असा कांगावा पाकिस्तान करणारच (ह्या नावाचा देश पन्नास वर्षांनी अस्तित्वात असेल असे ढोबळ गृहीत आहे !). तेव्हा ते केव्हाही गळा काढणारच. खोटारडेपणा करणारच. त्यामुळे तेही कारण नाही.

कसाब मुसलमान आहे म्हणून सरकार ‘काळजी’ घेत असेल तर निर्बुद्ध आणि असंवेदनशील ह्याबरोबरच सरकार षंढ आहे असेच म्हणावे लागेल (मुस्लिम संघटनांनी कसाब व पाकिस्तानचा केलेला निषेध बघूनही सरकारला कसाबची फाशी politically incorrect वाटत असेल तर धन्य आहे)

मग मुद्दा असा उरतोच की तो जिवंत का ? एक महिन्याच्या आत त्याला फाशी देणे सोडाच पण दोन वर्षे झाली तरी त्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे वेळापत्रकही जनतेला माहित नसेल (सुरक्षेच्या कारणासाठी पळे घटका असा मुहूर्त सांगितला नाही तर कुठलीही मोघम माहितीही नाही) तर,

‘सत्ताधा-यांना हजार घोटाळ्यांमधून करोडो पैसे कमवण्यापासून फुरसत नाही’ हा आणि असाच अर्थ निघतो.

लोक पेटून उठून जेलवर हल्ला करून कसाबला चौकात फाशी देण्याची सरकार वाट बघत असावे !

आर. आर. पाटील व एकनाथ खडसे कसाबला भेटून आले (कशासाठी ? पुन्हा ‘माहित नाही’ !) तेव्हा आता नेमके २६ नोव्हेंबरच्याच दिवशी कसाबला फाशी देतील अशी अंधूक आशा वाटली..


बघू .. अजून काही तास शिल्लक आहेत २६ नोव्हेंबर २०१० चे !

Nov 24, 2010

कवटी सरकवणा-या गोष्टींपैकी..

खालील विचारांचा अनुवाद करण्याआधीच झटक्यात पोस्ट :

I find it astonishing that a person buys an expensive ticket to watch a movie in a Cineplex and during a particularly interesting scene, answers any unimportant call he receives & continues to talk in a casual and loud voice, with a contented face.

I find it disturbing how pathetically low the probability is that, a lightening stroke can instantly & precisely kill such a person in a crowded cinema hall.

- राफा

Nov 18, 2010

झटक्यात चारोळी

शुभ्र टोपीखालची स्वच्छ माणसे
शोधताना नाकी नऊ आलेत
कलियुग का काय ते हेच
आता घोटाळेही 'आदर्श' झालेत

- राफा

Nov 17, 2010

जिंदगी..

हे सहज सुचलं म्हणून 'झटक्यात' पोस्ट ...


बस यही था सुकूं, के सजा-ए-जिंदगी के दिन अब चंद है
सुनते है अब... के मौत को भी हम नही उतने पसंद है


- राफा