Dec 23, 2008

पुणे ते दिवेआगर - मार्ग व टप्पे

माझ्यासारख्या geographically impaired लोकांसाठी कुठेही जायचे असेल तरी पहिला प्रश्न असतो ते म्हणजे कसे जायचे ?

माझे भौगोलिक ज्ञान हा एक अतिशय करुण इतिहास आहे ! वेळोवेळी याची तेजस्वी उदाहरणे मी दिलेली आहेत. (अर्थात कधीमधी मी इतरांना आणि स्वत:लाही चकीत करतो.)

तर ह्या मूलभूत भौगोलिक अशक्तपणावर मात करण्यासाठी कुठेही गेले की त्या जागेसंबधी उपयुक्त माहिती लिहून ठेवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला कुणालाही याचा उपयोग झाला तर खूपच आनंद वाटेल.

टीप : 'खराब रस्ता', 'बरे हॉटेल' वगैरे व्याख्या व्यक्ती, वाहन, काळ, स्थळ, त्यादिवशीचे ग्रहमान वगैरेनुसार बदलत असतात ह्याची कृपया नोंद घ्यावी (आयला, पुण्यात राहिल्यावर हे अस का होतं सर्वसामान्य माणसाचं ?)

तर,


पुणे ते दिवे आगर :


मार्ग :

पुणे - पिरंगुट - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - दिवे आगर



अंतर व टप्पे :


क्र.
अंतर (कोथरुडपासून)
Kms
स्थळ नोंद
1.8.2BP Petrol pump (opp. daulat hotel, after ‘windmill’)
2.10.5मानस रिझोर्ट
3.11.7Shell Petrol Pump
4.12.7BP Petrol Pump
5.15.6Buninda Resort & BP Petrol Pump
6.15.8पिरंगुट सुरू
7.32.1जामगाव
8. 34.9‘माले’ खराब रस्ता
9.36.9Tata power – Mulshi (Camp booth)
10.45.1"Quick Bite" हॉटेलsnacks व जेवण
11.75.5ताम्हिणी घाट सुरु
12.86.6माणगाव फाटा माणगावापर्यंत खराब रस्ता
13.109.5माणगावमाणगाव गावात शिरल्यावर मुंबई गोवा हायवे (बहुदा!)आडवा लागतो (हायवे वगैरे अजिबात वाटत नाही. कारण वाहनांचा मंद वेग, बाजारची गर्दी वगैरे.) तिथे डावीकडे वळणे, मग बाजारपेठ.. काही अंतरावर ‘मोर्बा’ पाटी दिसली की उजवीकडे वळणे
14.129.5म्हसळा 8 km. वर.घोणसे घाट सुरु.
15.135.5चेक पोस्टआडव्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट. तिकडे उजवीकडे वळणे. वळल्यावर लगेच ५ मिनिटावर petrol pump
16.137.5म्हसळा गाव बाजार. २ मिनिटावर रायगड जिल्हा परिषद चे office डावीकडे दिसेल. तिथून पुढे गेल्यावर ‘सुवर्णगणेश दिवेआगर’ अशी पाटी, तिथे उजवीकडे वळणे. (इथून दिवेआगर 20 km)
17.140दांडगिरी फाटा (इथून दिवेआगर 16 km)
18.155दिवे आगर ! गावात शिरताना 'सहर्ष' कमान. सरळ जाऊन 'T junction' ला गणेश मंदीराकडे जायला उजवीकडे वळणे. त्या रस्त्यावर सुमारे २-३ मिनिटावर मंदिर डावीकडे लागते. तसेच सरळ गेल्यावर उजवीकडे सुहास बापट यांचे घर (जेवणाची सोय). तसेच सरळ गेल्यावर रस्ता जवळजवळ संपतो तिथे डावीकडे woodland hotel.


अधिक माहिती :

  • अंतर एम. आय. टी. कॉलेज, कोथरुड पासून
  • जाता येता 'Quick Byte' हॉटेल मधे बरेच पदार्थ चांगले. पोहे, बटाटा वडा, सा. वडा, भजी, आलू पराठे व झुणका भाकर.
  • शेवटपर्यंत समुद्र दिसत नाही. गावात शिरल्यावरही नाही ! तेव्हा गोंधळून जाऊ नये :)

प्रवासासाठी शुभेच्छा !!!
http://rahulphatak.blogspot.com




Aug 29, 2008

विडंबन: गझल - चकणा ! (मूळ गझल - वणवा)

मूळ गझल 'वणवा'  इथे   आहे

(किंवा ते ह्याच्या आधीचेच पोस्ट असल्याने सध्या ह्याच पानावर खाली पहावयास मिळेल :) )




'चकणा ' !



बियर ठेव रे नीचा, जरा गोठवून आता

ढोसतोस कुठे वेड्या ह्या श्रावणात आता



हाक मारिता त्याना, घोरती आत सर्व

घ्यायचे ना पहाटे का, मज घरात आता



जिव्हा केव्हाच भिजल्या, आत्म्यास ओल आत

तरीही कोरडे अजूनी, वाटे घशात आता



ओरडण्याचीच खोड, जडली जी जनांस

'टाईट' होता टीका, करिती फुकात आता



गांजले घरचे जरीही, तुझ्या दशेस रात्री

पड निवांत जरासा, त्या कोप-यात आता



- राहुल फाटक

Aug 18, 2008

गझल - वणवा !

बहर ठेव मनीचा, जरा गोठवून आता

फुलतोस कुठे वेड्या ह्या वणव्यात आता


हुंकारिता वेदना, डोलती येथ माना

आक्रोशही करावा मग सूरात आता


जाणीवा सर्व विझल्या केव्हाच खोल आत

तरी धुगधुगे अजूनी काही उरात आता


खुरटण्याचीच खोड, जडली जनुकांस

उंचावयाची उमेद नाही अंकुरात आता


बांधले मोर्चे जरीही, एकेक दिशेस त्यांनी

काढ तुफान जे जपलेस अंतरात आता


- राहुल फाटक

Jul 6, 2008

चित्रकला: प्रफुल्लित !

थेट संगणकावर, साध्या 'माऊस' ने काढलेले चित्र.


अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.










Jun 13, 2008

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक - १



१. सरकारी नोकरीत चिकटलेला क्लार्क :

अब यही से मेरी अर्थी उठेगी !



२. काम न मिळालेला रोजंदारीवरचा कामगार :

अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना ?



३. सरकारी नोकर बाप व 'IT' मधला मुलगा :

बाप: बेटा, तुम्हारी इतनी उमरभी नही, जितना मेरा तजुर्बा है !
मुलगा: बापू, आपका इतना प्रॉविडंट फंड भी नही, जितनी मेरी सॅलरी है !




४. "माझी चूक नाही ! अमेरिकेतून स्पेसिफिकेशन्सच चुकीची.. " - भारतातील एक डेव्हलपर

मेरा खयाल है की जरुर इसमें किसी गैर मुल्क का हाथ लग रहा है !



५. मॅनेजर व ऑडिटर :

ऑडीटर : गुनाह कभी छुपता नही. हालात चिल्ला चिल्ला कर कह रहे है की खून हुवा है !
मॅनेजर : लगता है, तुम्हे गडे मुडदे उखाडने का बडा शौक है !




६. टीम लीडर सोडून चालल्याने खूष झालेला सिनियर मेम्बर :

उसके बाद, अब मैही कबिले का सरदार बनूंगा (और जग्गा से बदला लूंगा) !



७. फाकडू रिसेप्शनिस्टशी अयशस्वी फ्लर्ट करणारा नवीन कर्मचारी :

तो: हम खूद नही आए, किसीके बदनकी खुशबू हमे यहा खींच लायी है !
ती: कोई बात नही. जहा चंदन का पेड हो, वहा सापोंका आना जाना तो रहता ही है !




- राफा

Jun 2, 2008

तिसरा हल्ला ! - भाग ३ (अंतिम)

भाग १


भाग २




संथामच्या किल्ल्याजवळील देवता.. संथामच्या लोकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान !

त्या देवतेला घट अर्पण करण्याचा उत्सव रंगात आला होता.

सर्वत्र फुलापानांनी सजावट केली होती. आकर्षक पोशाख घातलेल्या नर्तकांचे नृत्य चालले होते. नानाविध वाद्ये वाजत होती. संथामचे सर्व सरदार तिथे उपस्थित होते. संथामच्या लोकांनी तो सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. देवतेभोवती काही अंतर रिकामे ठेवून वर्तुळाकार गर्दी जमली होती. उन्हात मधेच लखकन चमकणारे भाले घेऊन लोकाना आवरण्यासाठी रक्षक वर्तुळाच्या आतील बाजूस तैनात होते.

अचानक, वाद्यांचा आवाज अजूनच वाढला. लोक उत्सुकतेने पाहत होते. स्थिर पावले टाकत सम्राट देवतेच्या शिळेकडे निघाला होता.. त्याच्या अंगावर अत्यंत उंची वस्त्रे व आभुषणे होती. तो पूर्ण नि:शस्त्र होता. आपल्या दोन्ही हाताने त्याने तो जड घट धरला होता. तो पवित्र घट सुगंधी द्रव्यांनी व निरनिराळ्या दुर्मिळ जिन्नसांनी भरला होता.

सैनिकांच्या सुचनेवरून काहीश्या अनिच्छेनेच लोक सम्राटाचा जयजयकार करु लागले. पण काही वेळापूर्वी नाचणा-या नर्तकांसारखेच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न नाचत होते... आता त्या पवित्र घटाने तृप्त होऊन देवता संथामचे रक्षण करणार.. पण संथामचे रक्षण म्हणजेच सम्राटाचेही रक्षण असे का ? त्या क्रूरकर्म्याच्या राजवटीपासून लोकांची कधी सुटका होणारच नाही का ? देवतेला सम्राटाचे राज्य पसंत आहे का ?

आता काही पावलेच राहिली होती.. सम्राटाच्या चेह-यावर समाधान पसरले होते. देवतेला घट अर्पण केला की ताबडतोब किल्ल्यात परतण्याची व्यवस्था शासकाने केली होती. घट अर्पण करताना चालत येण्याची परंपरा असली तरी परत जाताना त्याच्या खास अश्वपथकासह त्वरेने किल्ल्यात परतायचे होते..

आता काहीच क्षण..

सम्राट शिळेच्या पायथ्याशी पोचला.. एकवार त्याने तो पवित्र घट मस्तकाला लावला..

आता.. शेवटच्या क्षणी.. सम्राट तो घट शिळेला अर्पण करणार एवढ्यात...

कुठून तरी वेगाने एक बाण सरसरत सम्राटाच्या दिशेने आला.. आणि दुस-याच क्षणी त्याने नेमका वेध घेतला..

त्या पवित्र घटाचा !

प्रथम काय झाले ते कुणालाच समजले नाही.. एका क्षणातच त्या घटाचे लहान तुकडे होऊन त्यातील पदार्थ चारी दिशांना फेकले गेले. सम्राटाचा चेहरा आणि त्याचा पोषाख पूर्णपणे माखला गेला !

एकच गोंधळ झाला. लोक भितीने पळू लागले. सम्राटाच्या रक्षकांना बाण आला त्या दिशेचा निश्चित अंदाज येईना, त्यांनी गर्दीच्या दिशेने अंदाधुंद बाण व भाले सोडायला सुरुवात केली...

एका लयीत चाललेल्या संथामच्या उत्सवात हलकल्लोळ माजला व समारंभाचा पूर्ण विचका झाला..

काही क्षण गेले.. सम्राट अजूनही अपमानाने थरथरत होता. घडलेल्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. शासकाची संरक्षण व्यवस्था, खास सुरक्षा पथक, सशस्त्र रक्षक, शिवाय प्रचंड गर्दीत मिसळलेले हेर .. कशाचाच उपयोग झाला नव्हता !

शासकाने प्रसंगावधान राखून तातडीने सम्राटाचा अश्व मागवला.. आणि काही क्षणातच विलक्षण वेगाने तो सम्राटाबरोबर किल्ल्याच्या दिशेने दौड करु लागला. सम्राटाचा चेहरा घटातून उडलेल्या द्रव्यांमुळे व संतापतिरेकाने विकृत दिसत होता.

झाली होती ती हानी दिसत होती त्यापेक्षाही भयंकर होती.. सम्राटाच्या अपमानापेक्षाही जास्त ! कदाचित कधीही भरून न निघणारी !

ज्या अर्थी सम्राट पवित्र घट देवतेला वाहू शकला नव्हता त्या अर्थी संथामच्या प्रजेच्या दृष्टीने तो अपशकून होता. काही कारणामुळे सम्राट देवतेच्या रोषाला बळी पडला होता आणि म्हणूनच घट स्वीकारण्यास किंवा सम्राटाचे रक्षण करण्यास देवता प्रतिकूल होती.. आता तिच्या कोपामुळे सम्राट कदाचित लवकरच .. ?

राजधानीतून गावागावात ही बातमी पोचणार होती. सर्वत्र हाच निष्कर्ष लोक काढणार होते.

........

........

काही बोलायची आवश्यकताच नव्हती.

किल्ल्यात शिरल्यावर शासक व सम्राट त्या खास दालनाच्या दिशेने जाऊ लागले.. कुठल्याही आणिबाणीच्या प्रसंगासाठीच त्या दालनाची व्यवस्था शासकाने केली होती.

दालनात शिरल्यावर, डिवचलेल्या हिंस्र पशूसारखा संतापलेला सम्राट आपल्या स्थानावर जाऊन बसला. त्याच्या डोक्यात प्रचंड स्फोट होत होते. आपला राग काढायला समोर जर कुणी दोषी मिळाला असता तर त्याने आजवर दिलेल्या क्रूर शिक्षांना लाजवेल असे हाल केले असते त्याचे !

पण आज त्याच्यासमोर कुणीच अपराधी नव्हता, आणि हीच गोष्ट त्याच्या संतापात अजूनच भर टाकत होती.

त्याच्या नंतर दालनात प्रवेश केलेल्या शासकाने तिथला एकमेव दीप प्रज्वलित केला. त्या दिव्याच्या अपु-या प्रकाशात सम्राटाचा चेहरा अजूनच अक्राळविक्राळ दिसू लागला.

मग शासकाने त्या दालनाच्या रुंद अशा भिंतीतली बेमालूमपणे मिसळून गेलेली एक कळ सर्व शक्तिनिशी आत सरकवली. त्याबरोबर त्या दालनाचा एकमेव अवजड दरवाजा बंद होऊ लागला. त्या विशिष्ट धातूंच्या मिश्रणातून बनलेल्या दरवाजाला भेदणे बाहेरच्या कुठल्याही मानवाला वा शस्त्राला शक्य नव्हते.

दरवाजा पूर्ण बंद झाल्याची खात्री करुन शासक सम्राटासमोर आपल्या आसनावर बसला. झालेल्या घटनेनंतर लगेचच त्याने आपल्या भावनांवर ताबा मिळवलेला दिसत होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच अतिशय शांत होता. एखाद्या निश्चल जलायशासारखा. पण त्या शांत पाण्यात खोल कुठल्या कारस्थानांचे सर्प फिरत असतील ते पहाणा-याच्या लक्षात यायचे नाही !

त्याच्या समोर बसलेला सम्राट अजूनही झालेला अपमान पचवायचा प्रयत्न करत होता.. एकीकडे तो संतापला होता आणि दुसरीकडे आत्तापर्यंत कधीही न आलेली विलक्षण भिती आणि अस्थैर्याची भावना त्याचं मन पोखरत होती ! शासकाचे अनुभवी डोळे सम्राटाकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याचा शांतपणा पाहून सम्राट अजूनच बिथरला.. अंगाला आलेले कापरे अजूनही कमी झाले नव्हते.

"शासक, मला आजचा अपराधी हवा आहे " शांतता असह्य होत सम्राट बरळल्यासारखा ओरडला

सम्राट, मला तुमच्याशी तीन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत" शासक म्हणाला.

"पण आजच्या घटनेशी.. "

"संबंध आहे ! त्या तीनही गोष्टींचा आजच्या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे !" शासक ठामपणे म्हणाला... "तुम्हाला आठवतं ? तुमच्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा तुमच्या सुरक्षा पथकाच्या प्रमुखाला, 'तेजराज'ला, तुम्ही द्रोही ठरवलंत.. आणि मग.. सर्वांदेखत हाल हाल करून मारलंत ! ... नंतर केलेल्या चौकशीत असं आढळलं की तेजराज प्रामाणिक होता, शूर होता, आपल्या सहका-यात अतिशय लोकप्रिय होता.. आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे निर्दोष होता. हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता "

"अशा शुल्लक गोष्टींची चर्चा आपण कधीपासून करु लागलो शासक ?" सम्राट ओरडला " त्याच्या मृत्यूचा आजच्या.."

"सम्राट, ही शक्यता तुम्ही लक्षात घेतली आहे का की लोकप्रिय तेजराजच्या कुणा आप्ताने सूड म्हणून आज..."

"असे दु:साहस कोण करेल तर त्याची काय अवस्था होईल हे सर्वाना माहित आहे.. तरीही शंकानिरसन म्हणून त्याच्या सर्व आप्तजनांना पकडून.. " बोलता बोलता सम्राटाला एकदम दम लागला. " ते जाऊ दे. शासक ! तू सांगणार असलेली दुसरी गोष्ट महत्वाची असेल अशी मी आशा करतो".

सम्राटाच्या उद्गारांनी शासक दुखावल्यासारखा वाटला.

पण तरीही सावरून तो पुढे सांगू लागला " ठीक ! आता दुसरी गोष्ट. तुम्हाला माहित आहेच की तुमच्या आधी सेवकाने तुमच्या अन्नातील भाग सेवन करण्याची योजना माझीच आहे !... तो सेवक आपल्या मातापित्यांचा एकुलता एक पुत्र नाही !"

सम्राटाचे मस्तक विलक्षण वेदनेने ठणकू लागले.. तो ओरडला " शासक ! आज तुला काय झाले आहे. ह्या आणिबाणीच्या क्षणी तू काय निरर्थक..'

त्याचे वाक्य तोडत शासक म्हणाला " त्या सेवकाला जुळा भाऊ आहे. आणि ह्या वयातही दोघे तंतोतंत सारखे दिसतात.. ज्याला तुम्ही सध्या पाहत आहात तो जुळा भाऊ आहे"

शासकाने आपले भेदक डोळे सम्राटावर रोखले. सम्राटाचा पार शक्तिपात झाला होता. शासकाची तीक्ष्ण नजर सम्राटामधले अपेक्षित बदल टिपू लागली. ती नजर पाहूनच सम्राटाच्या अंत:र्मनात कुठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली.

आणि एखाद्या वीजेसारखे शासकाचे वाक्य त्याच्यावर कोसळले : "सम्राट, तो सेवक मृत्यू पावून आता पंधरा दिवस झाले आहेत"

"काय ??" सम्राट हडबडला.. त्या वाक्याचा अनर्थ हळूहळू त्याच्या लक्षात येत होता !

"होय. त्याचे राहण्याचे ठिकाणही गुप्त असल्याने कुणालाच सुगावा लागला नाही. मी लागू दिला नाही ! तेव्हापासून त्याचा जुळा भाऊ संरक्षक सेवक बनून तुमचे अन्न सेवन करत आहे !"

"शा.. शासक " सम्राटाने चवताळून उठायचा प्रयत्न केला पण तो मागेच आसनावर कलंडला..

"ह्या सगळ्याचे उत्तर तिस-या गोष्टीत आहे सम्राट ! पण त्या आधी तुम्हाला काही दाखवायचे आहे " शासकाने काळजीपूर्वक आपल्या पोशाखातील एका कप्प्यात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. ब-याचशा पारदर्शक पदार्थाने बनलेली ती एक छोटी कुपी होती. जवळ जवळ रिकामीच.. फक्त तिच्या तळाशी विचित्र निळ्या रंगाचे चिकट द्रावण दिसत होते.

सम्राटाचा चेहरा पांढराफटक पडला होता.. त्याने थरथरत हात उचलला आणि त्या कुपीकडे बोट केले

"हे... "

"अगदी बरोबर.. हेच रोज थोडं थोडं ! अन्नामधून ! ... त्या सेवकाचा मृत्यू झाला आणि तुमच्यावर चालू असलेल्या प्रयोगाचा शेवटचा भाग चालू झाल्याची खात्रीच मला पटली ! होय, अत्यंत मंद गतीने होणारा विषप्रयोग !"

"तू ? मला ... ? का !" सम्राट बरळला.

"होय. मी तूलाच !" शासकाच्या बदललेल्या आवेशाने सम्राट दचकला. "मीच अत्यंत योजनापूर्वक तुझ्यावर विषप्रयोग केला ! ह्या दुर्मिळ विषाची हीच खासियत आहे. अगदी नैसर्गिक वाटतो मृत्यू ! हा जुळा भाऊ असलेला सेवकही मीच निवडला होता.. कारण अतिशय सुदृढ व निरोगी असा तो सेवकही तुझ्या आधी मृत्यू पावण्याची शक्यता मी गृहीत धरली असती. आणि झालंही तसंच ! पण त्याच्या बदली त्याच्या भावाला मी किल्ल्यात गुप्तपणे आणल्यामुळेच... त्या सेवकाच्या अचानक तेजस्वी झालेल्या कांतीचे रह्स्य तुला कळलेच असेल.. "

"पण शा... का...? का ?"

शासकाचे निखारे ओकणारे डोळे एकदम निवले.. पाण्याने डबडबल्यासारखे झाले..

"ते माझे प्रायश्चित्त आहे.. आणि एका दुर्दैवी पित्याचा सूडही !" शासकाचे अश्रू ओघळले पण त्याला पर्वा नव्हती "होय सम्राट ! तेजराज माझा पुत्र होता !! ही गोष्ट त्याच्या मातेशिवाय कुणालाही माहित नव्हती. त्याचा भयानक मृत्यू माझ्या ह्या डोळ्यानी पाहताना... " शासकाने डोळे हातानी झाकून घेतले..

सम्राटाला आभाळ कोसळल्यासारखे वाटत होता. सर्वांगास वेदना सुरु झाल्या होत्या.

डोळे पुसून शासक सांगू लागला "मला प्रथमच त्या असंख्य लोकांच्या वेदना जाणवल्या ज्यांना मी निर्दयपणे मृत्यू दिला. केवळ तुझे साम्राज्य टिकावे आणि सदैव तुझेच रहावे म्हणून ! खूप कट कपटकारस्थाने केली केवळ तुझी आणि संथामची सत्ता वाढावी म्हणून... माझ्या पुत्राला मी त्याचा हक्क देऊ शकलो नाही.. पण त्याचा असा मृत्यूही मला टाळता येऊ नये.. ?" शासकाचे डोळे पुन्हा एकवार कठोर झाले. " त्या क्षणापासून सूडाग्नीमधे माझे अ:तकरण जळत आहे. त्या क्षणापासून स्वामीनिष्ठेचा मी फक्त अभिनय करतो आहे"

"शा..." सम्राटाने क्षीण प्रयत्न केला, आणि तो तसाच हताश पडून राहिला.

ते पाहिल्यावर शासक अत्यंत समाधानाने हसला. कमरेचे धारदार शस्त्र काढून त्याने सहज हाताला येईल असे ठेवले.. "ही फक्त खबरदारी आहे सम्राट ! तू आता उठूही शकणार नाहीस. तूला माहीतच आहे माझी प्रत्येक योजना निर्दोष राहील अशी काळजी मी घेतो!"

सम्राटाने सर्व शक्ती लावली पण त्याला बोटही उचलता येईना.. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.. हृदय मंद होत चालल्याचा भास होऊ लागला.

शासक आता शून्यात पाहून समाधानाने बोलू लागला "आज माझा सूड पूर्ण होईल ! थोड्याच वेळात शत्रूराज्यांचे एकत्रित सैन्य किल्ल्यात प्रवेश करेल. तशी व्यवस्था मी केली आहे. त्यांच्या पहिल्या हल्ल्यानंतर मीच त्यांच्या प्रमुखाशी गुप्त भेटी घेतल्या. त्याच तेजस्वी वीराने मी सांगितल्याप्रमाणे पवित्र घटाचा वेध घेतला ! ह्या राज्याला आता प्रजाजनांची काळजी घेणारा न्यायप्रिय सम्राट लाभेल.. पण त्या आधी.. स्वामीनिष्ठेचा शेवटचा अभिनय मला करायचा आहे. आता थोड्याच वेळात तुझी पूर्ण वाचा जाईल. . मग मी दालनाचा दरवाजा उघडून धावाधाव करेन. अचूक सांगायचे तर अजून एक प्रहरानी तू मृत्यू पावशील ! "

सम्राट असहाय्यपणे ऐकत होता..

"तुझे निष्ठावान सरदारही काही करू शकणार नाहीत ! त्याना शंकाही येणार नाही ! कारण संथामची देवता तुझ्यावर कोपली आहे असाच सर्वत्र समज आत्तापर्यंत पसरला असेल. तिनेच तुझा बळी घेतला अशीच सा-यांची समजूत होईल... आता फक्त काही क्षणच मला प्रतिक्षा करायची आहे"

एव्हढे बोलून, काहीश्या थकव्याने, शासक त्याच्या आसनावर पहुडला आणि त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले.. थोड्याच वेळात गुप्त कळ पुन्हा दाबून तो अजस्त्र दरवाजा त्याला उघडायचा होता. शिवाय अजून काही वेळाने, किल्ल्यावर ताबा मिळवायला इतर राज्यांच्या सैन्याला मार्गदर्शन करायचे होते !

...

सम्राट आता निश्चेष्ट पडला होता..

त्या दालनात आता फक्त शांतता मंद वाहत होती... त्या शांततेच्या डोहात सावकाश पावले टाकत येत असलेला आपला मृत्यू सम्राटाला ऐकू येत होता.

सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी झाला होता !





***

May 28, 2008

तिसरा हल्ला ! - भाग २

भाग १


त्याच वेळी...

त्याच वेळी संथामच्या किल्ल्याजवळच्या त्या अरण्यात, एक अश्वधारी पथक विशिष्ट दिशेने दौड करत होते.

दाट झाडीची, काटेरी झुड्पांची पर्वा न करता ते पुढे सरकत होते. सूर्य पूर्ण बुडायच्या आधीच त्या ठिकाणी पूर्ण अंधार पसरला होता. दूर खोल कुठेतरी सूक्ष्म प्रकाश मधूनच दिसत होता. त्या दिशेने ते पंधरा वीस अश्व सावधपणे वाट काढत होते. त्या निबीड वनात साधारण दिशा कळायला त्याना तोच एक मार्गदर्शक होता.

.. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला.. काही मशाली दिसू लागल्या आणि ते अश्वपथक इच्छीत स्थळी पोहोचले. कुणा पूर्वजांनी बांधलेले ते महाकाय मंदिर होते. एकेकाळी भव्य असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष वृक्षवेलींच्या गर्दीत चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. त्या जागी काही लोक आधीच जमले होते. मंदिराच्या राक्षसी आकाराच्या पन्नास एक पाय-यांपैकी एक दोनच एकसंध अवस्थेत होत्या.

त्यात सर्वात वरच्या पायरीवर एक विशेष लक्ष वेधून घेणारा एक वीर होता. त्याच्या जवळच असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या बलवान शरीरावरील युद्धपोषाख उजळून टाकत होता. त्या पोषाखावरील धातूची कलाकुसर मधेच चमकत होती. आधीच ते:जपुन्ज असलेला तो वीर भोवतालच्या काळ्या तमसागरात मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे भासत होता !

त्याच्या आजूबाजूला चिंताक्रांत चेह-यानी जमलेले लोक म्हणजे संथामच्या भोवतालच्या लहान राज्यांतील महत्वाच्या व्यक्ती होत्या. कुणी सेनानी होता, कुणी मुत्सद्दी होता तर कुणी त्या राज्याचा सर्व अधिकार दिलेला खास दूत. संथामचा कुठलाही पहारेकरी किंवा हेर त्या ठिकाणी फिरकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच अशा निर्जन ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते.

त्यांना नुकत्याच येऊन मिळालेल्या अश्वपथकास विसावण्याची संधी देऊन तो वीर धीर गंभीर आवाजात बोलू लागला :

"मित्रहो, पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून इथे जमल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. नुकतेच आतिस्म राज्याचे योद्धे आपल्याला सामील झाले आहेत, त्यामुळे आपल्या सर्व राज्यांच्या एकत्रित सैन्याची ताकद अजूनच वाढली आहे. "

आतिस्म योद्धयांच्या नेत्याने उठून त्याला अभिवादन केले. त्याचा स्वीकार करून तो वीर पुढे बोलू लागला :

"त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा काही गोष्टींचा आढावा घेतो. आपण सर्व जाणताच की संथामच्या सम्राटाची क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. संथामची प्रजा त्याच्या लहरी कारभाराला, उन्मत्त रंगेलपणाला कसेबसे तोंड देत एकेक दिवस काढत आहे. आपल्या दुर्दैवाने संथाम अतिशय बलशाली राज्य आहे. त्या विशाल सैन्याचा पराभव करणे आपल्याला शक्य नाही ! परंतु त्यांचे राज्य सहन करणे आता तेव्हढेच अशक्य झाले आहे. आपल्या संथाममधल्या सग्यासोय-यांची दौलत अब्रू कधी लुटली जाईल ह्याचा भरवसा नाही... आणि कधी आपल्या राज्यांवर ते सैन्य वावटळीसारखे कोसळेल सांगता येत नाही.."

उपस्थित लोकांपैकी अनेकांनी खेदाने माना हलवल्या.

"ह्यावर निर्वाणीचा उपाय आपण निवडला. थेट सम्राटावर हल्ला ! दुर्दैवाने आपले २ ही हल्ले अयशस्वी ठरले. दोन्ही हल्ल्यांचे सूत्र एकच होते : धाडसी आणि अत्यंत शूर अशा निवडक योद्ध्यांबरोबर मी किल्ल्यातील आपल्या हेरांच्या मदतीने आत प्रवेश मिळवायचा. अचानक हल्ला करुन थेट सम्राटापर्यंत पोचायचे. आणि मग मी त्याला पारंपारिक द्वंद्वाचे आव्हान द्यायचे !... माझे द्वंद्वयुद्धातील नैपुण्य तुम्हाला माहित असले तरी सम्राटही अतिशय बलशाली नि कुशल योद्धा आहे, त्यामुळे ह्या योजनेत धोका जरुर होता. सम्राटास दूर करायचा तो एकच वैध मार्ग होता. "

"सदैव कपटनिती करणा-या सम्राटास मारायचे मात्र नितीमत्ता सांभाळून ? " एक तरूण संतापून म्हणाला..

त्याला थांबायची खूण करून वीर पुढे बोलू लागला : "एकदा सम्राट मृत्यूमुखी पडला असता की त्या गोंधळाचा फायदा घेऊन किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही पुढची योजना होती. सम्राटाची जुलमी राजवट नापसंत असलेल्या लोकांची मदतही त्या मोक्याच्या क्षणी अपेक्षित होती.. पण.. पण सम्राटापर्यंत पोचण्याआधीच आपले दोन्ही प्रयत्न फसले !"

"होय" दुसरा एक योद्धा म्हणाला "दुस-या हल्ल्यामधे तर ह्या अरण्यापर्यंत येणारे एकमेव गुप्त भुयार वापरून जखमी अवस्थेत माघार घ्यावी लागली. आपला किल्ल्यातील शेवटचा हेरही पकडला गेला आणि ती गुप्त वाटही शत्रूला ज्ञात होऊन बंद केली गेली आहे"

हे भाषण ऐकून सर्व योद्धयांवर निराशेचे अदृश्य मळभ पसरले ! आजूबाजून अंधार मनात शिरला नि अजून गडद झाल्यासारखा वाटू लागला. मशालींच्या ज्योतीही अस्वस्थपणे फरफरू लागल्याचा भास होऊ लागला.

थोडी उसंत घेऊन तो वीर निग्रहाने पुढे म्हणाला "आता सर्व मार्ग संपले आहेत. त्यामुळे त्या राक्षसाचा थेट वध करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही !"

हे ऐकल्यावर काही आश्चर्योद्गार निघाले.

शेवटी, ब-याच जणांच्या मनातील शंका एका सरदाराने बोलून दाखवली "पण आपण ठरवले जरी तरी हे शक्य वाटत नाही. किल्ल्याच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. किल्ल्यात आपला एकही हेर उरलेला नाही. शासकाच्या देखरिखीखाली निष्णात योद्धे सम्राटाचे अहोरात्र संरक्षण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे दोन फसलेल्या हल्ल्यांमुळे शत्रू अधिकच सावध झालेला आहे !"

"होय ! मला कल्पना आहे" वीर म्हणाला "ह्यासाठीच मी अंतिम योजना तयार केली आहे.. सम्राटावर तिसरा आणि शेवटचा हल्ला !!"

वीराच्या ह्या उद्गारांनंतर तिथे एकच खळबळ माजली. पुन्हा हात वर करुन सर्वांना शांत करत वीर पुढे सांगू लागला :

"सम्राट शक्यतो किल्ल्यात राहूनच कारभार करत असला तरी दरवर्षी हमखास एका दिवशी किल्ल्याबाहेर येतोच येतो. तुम्हा सर्वांना माहित असेलच की संथाममधे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे किल्ल्याबाहेरच्या शिळेला म्हणजेच त्यांच्या देवतेला विविध वस्तूंनी भरलेला घट सम्राटाने अर्पण करणे... ती शिळा म्हणजेच संथामची संरक्षक देवता आहे असा लोकसमज आहे.. एरवी लोकांना तुच्छ लेखणा-या सम्राटालाही त्या लोकश्रद्धेचा अनादर करुन चालत नाही एव्हढे त्या समारंभाला पारंपारिक महत्व आहे. तर त्या समारंभाच्याच दिवशी... "

"व्यत्ययाबद्दल क्षमा असावी " वीराच्याच समोर उभा असलेला एक कृश वृद्ध म्हणाला "पण तुम्ही योजना सांगण्याआधीच माझी एक शंका आहे"

वीराने मान डोलावून संमत्ती देताच तो अनुभवी मुत्सद्दी पुढे बोलू लागला " संथामचा राज्यकर्ता जरी सम्राट असला तरी सर्व कारभार व कारस्थानांमागील चातुर्य आणि योजना मात्र शासकाची असते असाच समज आहे.. आणि तो बराच खराही आहे. मला वाटते, आपण जर निकराचा हल्ला करणारच असू तर तो शासकावरच करावा !"

पुन्हा एकदा तिथल्या लोकात कुजबूज सुरु झाली... उलटसुलट मते आपसात मांडली जाऊ लागली..

आपल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ तो वृद्ध सांगू लागला "हत्तीवरील अंबारीतील योद्ध्याशी लढायला जर आपल्या सैन्याला जड जात असेल तर, त्या हत्तीच्या माहुतालाच कंठस्नान घालावे ! ... तसे केल्यास अंकुश न राहिल्याने हत्ती अंदाधुंद होतो आणि मग अंबारीतला योद्धाही निष्प्रभ होतो.. अशा वेळी त्याचा पराभव करणे खूपच सोपे जाते ! मला काय म्हणायचे आहे ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच ! "


वृद्धाचे बोलणे ऐकून वीराने क्षणभर विचार केला आणि त्याच्या चेह-यावर स्मित पसरले..

तो म्हणाला "महाशय, तुमचा मुद्दा अतिशय तर्कशुद्ध आहे ह्यात शंकाच नाही. पण युद्धशास्त्रातल्या ह्या डावपेचाचा ह्या परिस्थितीत थेट उपयोग होईल असे वाटत नाही ! शासकाचा मृत्यू घडवला तरी सम्राटाची दहशत एव्हढी आहे की तो जिवंत असेपर्यंत, त्याच्या विरोधात असणारे पण नाईलाजाने त्याच्या बाजून लढणारे सरदार आपल्याला मदत करणार नाहीत. अशा परिस्थिती सम्राटाचे निष्ठावान सरदार आपला सहज पराभव करतील.. परंतु ह्यापेक्षाही महत्वाचे कारण आपल्याला माझी पूर्ण योजना ऐकल्यावर कळेलच... "

.. मध्यरात्र उलटून गेली होती.. वीर शांतपणे योजना सांगत राहिला.

त्याच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर कुणाचाच अविश्वास नव्हता. पण...

शांततेने व सन्मानाने जगण्याची ती शेवटची संधी होती. सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी होणे आता अत्यंत आवश्यक बनले होते !

क्रमश:


भाग १





May 25, 2008

तिसरा हल्ला ! - भाग १

तो काळ कुठला होता.. कोण जाणे.

मनाच्या वेगाने भूतकाळात प्रवास केलात किंचीत तर त्या आसपासच केव्हातरी.

पण तेव्हाही मानव असाच होता. आजच्यासारखाच. महत्वाकांक्षी, पराक्रमी, उपद्व्यापी, लोभी, तामसी. देहाने थोडा मोठा पण आकार तोच. आणि विकारही तेच.. आणि त्या देहात गुणावगुणांचा विसंगत संगम घडवणारे मानवी मनही तसेच !

...

त्या दिवशी सायंकाळी...


बेभान वारा भयाण आवाज करत होता, बेफाम वेगाने धुळीचे लोटच्या लोट उठवत होता.. त्या वा-याच्या वेगाला न जुमानणारा 'संथाम' च्या राजधानीचा प्रचंड किल्ला बुलंद दिसत होता. गेली कित्येक वर्षे अंगावर ओरखडाही उठता तो तसाच ठामपणे उभा होता. रोजच्याप्रमाणे आजही त्याच्या राक्षसी भिंती तापवून सूर्याची किरणे आता निवत चालली होती. खंदकातल्या तापलेल्या पाण्यात राहून खवळलेल्या मगरीही काहीश्या शांत होत होत्या.

किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने विस्तिर्ण असे मोकळे पटांगण होते. उत्तरेकडे किल्ल्याजवळ बाणाचा मारा पोचेल इतक्या अंतरावर कुठल्यातरी देवतेची मूर्ती होती. मूर्ती कसली, निसर्गाच्या चमत्काराने मानवी आकार प्राप्त झालेली एक मोठी शिळाच. किल्ल्याच्या एकूण आकाराच्या मानाने ती दगडी मूर्ती अगदीच नगण्य दिसे. परंतु, उत्सवाच्या दिवशी किल्ल्याइतकेच किंबहुना जास्तच महत्व त्या दगडाला येत असे.

पूर्वेकडे काही अंतरावरच एक भयंकर अरण्य सुरु होत होते, आणि तिथेच संथामचे अतिसामर्थ्यशाली राज्य संपत होते.

त्या सायंकाळी.. त्या अरण्याच्या दिशेला किल्ल्याच्या एका झरोक्यातून पाहत एक व्यक्ती उभी होती..

सम्राट !

संथामचा सर्वेसर्वा सम्राट ! घोर पराक्रमी सम्राट. कुशल सेनानी सम्राट.. आणि दुर्दैवाने अत्यंत क्रूर सम्राट !

आता काही वेळातच अंधाराचे साम्राज्य सुरु होणार होते.. पण, दिवसा मात्र त्या विशाल भूमीवर फक्त सम्राटाचे राज्य असायचे. संथामच्या म्हणजेच सम्राटाच्या आक्रमणापासून आत्तापर्यंत वाचलेली, तुरळक छोटी राज्ये होती पण अगदीच नगण्य. दुर्गम भुगोलामुळे थोडी अधिक सुरक्षित राहिलेली. पण सम्राटाच्या राज्याच्या विषारी छायेत भयग्रस्त. कधी आक्रमणाचा सर्प सीमा ओलांडून त्यांना गिळंकृत करेल ते सांगता येत नव्हते.

किल्ल्याच्या पूर्वेला अरण्य असल्याने त्या सीमेच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे तिथे संरक्षणासाठी अगदीच कमी सैन्य तैनात असे. अर्थात संथाम वर हल्ला करून आपल्याच मृत्यूला आमंत्रण कोण देणार !

त्या भयंकर अरण्याच्या आतील काही भागात सूर्यप्रकाशही पोचू शकत नसे. हिंस्र पशूंचा मुक्त वावर, आणि वाट चुकल्यावर जन्मभर त्या अरण्यातच फिरत रहाण्याची भिती अशा कारणांमुळे त्या बिकट रानात पाऊलही टाकण्याची कुणाची छाती होत नसे.

अगदी सुरवातीच्या भागात लाकूडतोड चाले.. तीही दिवसाच.

त्या सायंकाळी किल्ल्यातल्या त्या सर्वात उंच दालनातल्या झरोक्यातून, अरण्याच्या दिशेहून परतणारे काही लाकूडतोडे पाहत सम्राट उभा होता. त्याच्या मजबूत देहावरची अत्यंत उंची राजवस्त्रे आत पोचणा-या वा-याने फडफडत होती. शांतपणे बाहेर बघणा-या सम्राटाच्या मनात मात्र खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विलक्षण घटनांचा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी येऊन उभे राहिल्याचे सम्राटाला जाणवले.

सम्राटाने मागे वळून बघितले आणि त्या व्यक्तीला पाहून ब-याच वेळाने त्याच्या मुखावर स्मित उमलले.

"शासक ! वेळ झाली का ?"

"होय सम्राट ! भोजनाची वेळ झाली आहे. सेवक तयार आहे" नेहमीच्या शांत धीरगंभीर आवाजात शासक म्हणाला.

सम्राटाने क्षणभर समाधानाने शासकाकडे पाहिले.

शासक. संथामचा प्रधान ! सम्राटाच्या सर्व कटकारस्थानांमागचा मेंदू. सम्राटाच्या अनेक क्रूरकृत्यांचा साक्षीदार. अत्यंत धूर्त, कारस्थानी. तितकाच संशयी. पण त्याच्या ह्याच गुणामुळे इतर अनेक महत्वाच्या जबाबदा-यांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सम्राटाने त्याच्याकडे दिली होती : सम्राटाच्या सुरक्षेची !

शासकानेही त्या कामी सर्व बुद्धी पणाला लावली होती. सम्राटाचा संपूर्ण दिनक्रम जास्तीत जास्त वेळ किल्ल्यात सुरक्षित बसून कसा व्यतीत होईल अशी योजना शासकाने तयार केली होती. सम्राटावर हल्ला होण्याच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन खास सुरक्षित दालने आणि वेगवेगळी शस्त्रे असलेल्या निष्णात योद्ध्यांची खास पथके तयार करण्यात आली होती. सम्राटाचे संरक्षण ही एकमेव कामगिरी त्यांच्यावर होती.

एव्हढ्या योजनेनंतरही, याशिवाय अजून एका प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होतीच... आणि ती म्हणजे सम्राटाला कपटाने होऊ शकणारा विषप्रयोग !

पण ह्यावरही शासकाने एक युक्ती केली होती : सम्राटाच्या भोजनाआधी एक विशिष्ट सेवक त्या अन्नातील भाग वेगळा काढून त्याचे सेवन करत असे. दररोज तोच सेवक ! खुद्द सम्राटाने त्या सेवकाला धडधाकट पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. ही सर्व बुद्धी शासकाचीच. संशयाला जागा नको म्हणून त्या विश्वासू सेवकाची निवडही खुद्द त्यानेच केली होती.

इतकी काळजी घेऊनही, कडेकोट बंदोबस्त असूनही गेल्या काही दिवसांत सम्राटावर दोन हल्ले झाले होते !!

सम्राटाच्या सुदैवाने.. दोन्ही वेळेला ते साफ फसले होते. पण त्या घटनांनी सम्राटाची जणू झोप उडाली होती. क्षुल्लक कारणांवरून लोकांना अतिशय सहजपणे क्रूर शिक्षा देणारा सम्राट स्वत:च्या जीवावर बेतल्यावर अत्यंत अस्वस्थ बनला होता. मृत्यूच्या कल्पनेने त्याच्या कठोर ह्रुदयाचे ठोके जलद होत होते. स्वत: शूर असूनही अचानक होऊ शकणा-या हल्ल्याच्या कल्पनेने त्याचे सर्वांग घामात भिजत होते. त्याचा एकमेव आधार होता शासक !

त्या परिस्थितही विचलित न होता शासक काम करत होता. आणि म्हणूनच शासकाकडे पाहत सम्राट त्या सायंकाळी सम्राट काहीसा निर्धास्त झाला.. धीम्या गतीने पावले टाकत तो दालनाकडे जाऊ लागला. शासकही अदबीने त्याच्या मागे चालू लागला.

...

सम्राटासमोर आता तो सेवक उभा होता. त्याने अन्न ग्रहण केल्यानंतर आता बरोबर दोन प्रहर उलटून गेले होते. सेवकाने दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून सम्राटाला अभिवादन केले. त्याही मन:स्थितीत सम्राटाची मग्रूरी काहीशी उफाळून आली आणि काहीश्या थट्टेच्या सुरात तो सेवकाला म्हणाला "आमचे खास भोजन तुझ्या देहाला अगदी मानवलेले दिसत आहे. तुझी कांती आता अगदी सतेज झाली आहे."

शासकाने मंद स्मित करुन त्या सेवकास जायची आज्ञा केली. तो धिप्पाड सेवक नम्रपणे मागे सरत दालनातून निघून गेला. तो जाताच शासक अदबीने म्हणाला "सम्राट ! आपण भोजन घ्या. त्यानंतर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचे आहे ! ".


त्याच वेळी...


(क्रमश:)


Feb 20, 2008

चाकाखालचा रस्ता !

आज रस्ता पहायचा मूड आहे. रस्ता काही खास नाही. नेहमीचाच अयशस्वी !

चित्रातले रस्ते असतात तसा सुबक वगैरे तर अजिबात नाही. काही काही रस्त्यावर आकर्षक कपड्यात सुंदर चित्रे चालतात, लखलखणारी दुकाने असतात.. तसाही नाही. एकेका रस्त्याचे भाग्य असते बहुतेक.

खरं म्हणजे मी चाललोय तो रस्ता काही एकच नाही. 'नेहमीचा रस्ता' म्हणजे अनेक रस्त्यांची साखळी आहे.. जॉइंट फॅमिली असल्यासारखी. पण कळत नकळत सगळ्या मेम्बरांचा एकमेकांवर प्रभाव पडतो आहे असं वाटत राहतं..

हा पूर्ण रस्ता तसा मध्यमवर्गीय आहे. म्हणजे अगदी गंजलेल्या सामानाची दुकानं, फुटकळ खोपटी, देशी दारुचे दुकान वगैरे गोष्टी नाहीत.. तशीच गुळगुळीतपणा, बाजूला बंगल्यांची रांग, दिव्यांचे नवीन खांब, रम्य झाडे वगैरेही नाहीत.

हा तसा ब-याच ठिकाणी ओबडधोबडच आहे. मधेच कधीतरी काही अज्ञात माणसे येउन त्याला जरा डागडुजी करतात. त्यांच्यातला मजूर, मुकादम आणि मालक जवळजवळ सारखेच दिसतात. उकळणारा लाव्हा भरकटत वाहत जावा तसे ते डांबर कसेही पसरवले जाते. मग त्यावर अजस्त्र लाटणी फिरवली जातात. पोळी करणारा शिकाऊ असेल तर कडांना रेखीवपणा न येता वेडेवाकडे आकार होतात तसेच ह्या रस्त्याच्या कडेला पसरलेले डांबर दिसते. दोनेक दिवस रस्त्याचा तो तकाकलेला मेक-अप राहतो. मग पुन्हा तो पार धुळकतो.

ह्या रस्त्यावरचा गोंधळही मेथड इन मॅडनेस असल्यासारखा.. अनेक तालमी घेऊन बसवल्याप्रमाणे चालू असतो... पण त्या चित्रातल्या रस्त्यांपेक्षाही ह्या नेहमीच्या रस्त्यातली चित्रे आज ठाशीव नि सुंदर दिसतात. अगदी आत्ता पुढे असलेली कच-याची गाडीसुद्धा !

ठीक. मग आज गाड्याच पाहू !

तशी खिडकीत बसून माणसांचे नमुने पाहण्याची मौज औरच आहे. पण एव्हढ्या रिकामटेकडेपणाची चंगळ परवडत नाही. त्या बाबतीत लहान सहान दुकानांचे मालक एकदम 'तयार' असतात. बरणीतला जिन्नस झपाझप कागदात बांधून देताना आणि 'कट'कन पुडीचा दोरा तोडतानाही अशा दुकानदारांचे रस्त्यावर अगदी बारिक लक्ष असते.

पण गाड्यांचे स्वभाव नि मूड्स माणसांपेक्षा लवकर वाचता येतात आणि ब-याचदा दिसतात तसेच असतात.

ही समोरची कच-याची गाडी निवांत खडखडत चालली आहे.. एखाद्या गरिबीने मळलेल्या लहानग्या मुलीसारखी ती वाटते. तिला दुनियेची नि तिच्या चकचकीत प्रगतीची काही पडलेली नाही. तिच्यातला काहीबाही जिन्नस मधे मधे खुशाल रस्त्यावर सांडतो आहे. कच-यातल्याच प्लॅस्टीकच्या पांढ-या पिशव्यांमधे भसदिशी हवा शिरली की त्याचे फुगे होऊन त्या उडत आहेत आणि अल्लद तरंगत तरंगत खाली येत आहेत. ती मुलगीच जणू फुंकरी मारून साबणाचे फुगे उडवत मजेत चालल्यासारखी वाटते.

त्या जुनाट गाडीत कच-याची पिवळी पेटी आहे. साखळीने बांधलेली. धूळ कचरा, घाणीने लडबडलेली. मूळचा पिवळा रंग जवळजवळ दिसतच नाहीये इतकी ती माखली आहे. पण तीही निवांत कांगारूच्या पिल्लासारखी गाडीच्या पोटात पहुडली आहे. आत्ता गेलं त्या वळणावर ती एका बाजूला सरकली. कुशीवर वळल्यासारखी... सिमेट्री जराशी बिघडलीच.. पण त्यामुळे तिचं काही बिघडत नाही. पुढच्या वळणावर ती पुन्हा कूस बदलेल कदाचित. पण वळणावर फक्त मीच वळलो. ती कच-याची पेटी ठेवलेली गाडी सरळच गेली...

आता एक लालभडक ट्रक आलाय समोर. ट्रक आणि लॉरी मधला लिंगभेद कसा ठरवतात कोण जाणे ? त्याच्या मागच्या बाजूला छान वेलबुट्टी, मोर वगैरे काढले आहेत. मागे दोन्ही बाजूला लटवलेल्या साखळ्यांची टोकं हिंदकळत आहेत. कानातल्या डूलांसारखी. त्यामुळेही त्या ट्रकमागे लिहीलेले 'चल मेरी रानी' अगदी शोभतयं. त्या खाली लिहीलेल्या 'सुरक्षित अंतर ठेवा' ला आता मजेदार अर्थ येतोय. त्या 'रानी'चा मर्यादाभंग होणार नाही ह्या बेताने मग जरा अंतर ठेवून मागे रहावेसे वाटते. ही डूल घातलेली रानी डुलत डुलत 'देश महान' असल्याचा संदेश देत गावोगाव फिरत्ये आपली.

एक मर्सिडीज घरंगळल्यासारखी पुढे गेली... रस्त्याला अजिबात न दुखावता. जणू रस्ता अदृश्य आहे आणि तिच्यासाठी उलगडतो आहे आयत्या वेळी ! ती आहे अगदी काळीशार. स्पॉटलेस ब्लॅक ! काळ्या साडीत अतिशय देखणी हिरॉईन असावी तशी. आपलं सौष्ठव सगळे नीट पहात आहेत ह्याची कल्पना असलेली तरीही खानदान मोठं असल्यामुळे आपला आब राखून जाणारी. पावसात भिजलेली अशी काळी मर्सिडीज पहाणं म्हणजे... पण आज पाऊस नाही.

पण ही विशिष्ट मर्सिडीज जरा फारच अलिप्तपणे चालली आहे. गूढ आणि काहीसे निष्ठूर तिच्या पोटात आहे असं वाटत राहतं. बाकीच्याना न कळू दिल्यासारखं सावध ती एका पांढुरक्या जीर्ण बंगलीसमोर थांबली. एखाद्या संपन्न जीवन जगलेल्या वृद्धाला शांत, हळूवार मृत्यू यावा तशी ती काळी मर्सिडीज वाटते.. जणू 'काळ'च त्यात बसून आला आहे.. कोण रहात असेल त्या बंगलीत ?

डावीकडून एक 'एसयूव्ही' उन्मत्त सांडासारखी जाते. काही तरल विचार यायला लागले की अशी उधळलेली वाहने जणू त्या विचारांनाच घासत, ठिणग्या उडवत गेल्यासारखी जातात. अंधूकसं दिसलं पण तिच्यातला चक्रधारी बहुतेक एक किरकोळ इसम होता. त्या प्रचंड धूडामधे तो अगदीच सूक्ष्म वाटला. एकंदर त्याला पाहून त्या जगत नियंत्याची आठवण होते. परिस्थिती त्या माणसाच्या कधीही हाताबाहेर जाईल असे वाटत राहते. कदाचित गेलीही असेल ! त्या एसय़ूव्ही चे चक्र योग्य वेळी वळवणे त्याला जमेल का ? ब्रेक पर्यंत त्याचे पाय तरी पोचत आहेत का सहजी ? मग का तो एव्हढ्या जोरात चालवतो आहे? जगाचा अंत जवळ आला आहे का ?

अशी अनेक चित्रे दिसतात... गाड्यांचे स्वभावधर्म त्या जाता जाता दाखवून जातात, कधी त्यांच्या मनातले ऐकवून जातात.

ती बसला करकचून थांबायला लावणारी आडमुठी संथ सायकल..
रिटायर्ड स्मग्लरची वाटावी अशी एक अवाढव्य पसरलेली जुनी गाडी..
ती तेलपाणी खाउन पिउन सुखी असणारी पापभीरु चारचाकी...
एखाद्या बोजड सफारीवाल्याला कशीबशी रेटणारी, थकलेली दुचाकी...
पोटात माणसे कोंबून तृप्त झालेली 'लाल पिवळी'..

गाड्यांची हलती चित्रे बघता बघता गुंग होत मी इच्छीतस्थळी पोचतो !

Feb 11, 2008

कोण आहे रे तिकडे - २

महाराज: कोण आहे रे तिकडे ?

प्रधानजी: मी महाराज ! अजून तरी आहे मी ! हा घ्या पुन्हा एकदा मुजरा करतो !

महाराज: मुजरा ? प्रधानजी, काय तवायफ आहात की बारबाला ? पण कुठे उलथला होतात ? तुम्हाला कधीपासून हाक मारतो आहे.

प्रधानजी: अहो चौथ्यांदा सांगतोय महाराज ! मी इथेच आहे ! प्रश्न असा की माझं उत्तर तुम्हाला ऐकू का येत नाहीये..

महाराज: हं.. काय सांगू...मला जरा आजकाल कमीच ऐकू येतंय !

प्रधानजी: का महाराज ?


महाराज: अहो आमच्या महालाच्या पाठीमागच्या साईडलाच कुणीतरी कसलातरी मांडव घातलाय आणि स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या केल्या आहेत ! गेले दोन दिवस कुणी काही बोललं तरी मला नुसतं ‘ढपाक टपाक’, ‘ढपाक टपाक’... ‘ढपाक टपाक’ च ऐकू येतं ! काय त्रास आहे ह्यांचा !

प्रधानजी: अच्छा म्हणून तुम्ही कानाडोळा केलात होय माझ्याकडे .. पण काय त्रास झाला महाराज ? वर्गणी जास्त मागितली का या वर्षी ? काय करणार महाराज.. चंदा है पर धंदा है ये ! पण मग मांडववाल्यांबरोबर मांडवली करायचीत ना !

महाराज: च्च च्च ! वर्गणीचं नाही हो काही एव्हढं ! त्यासाठी सरकारी अनुदान दिल आम्ही ! पण एकंदरच ध्वनीप्रदूषण किती वाढतय ! देशापुढील तो एक वाढता प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर कुणीच आवाज उठवत नाही !

प्रधानजी: महाराज ! आवाज कुणाचा !

महाराज: कुणाचा म्हणजे ??? अर्थातच आमचा !


प्रधानजी: तस नव्हे. एकदम तलवार काढू नका. आता निवडणूका एव्हढ्यात नाहीत अजून.. आवाज कुणाचा म्हणजे कुणाकुणाचा ! म्हणजे कुणाकुणाचा आवाज तुम्हाला त्रास देतो आहे अस विचारतोय मी !

महाराज: किती आवाज सांगू ! ह्या ध्वनीप्रदूषणाविषयी ऐकायला कान देण्याची कुणाची तयारी नसते ! पण आता ह्या प्रश्नाला कान नाही तर तोंड देण्याची वेळ आता आली आहे !

प्रधानजी: महाराज, बरोबर आहे तुमचं.. पण उत्सवाचे दिवस असेच असणार ! एखादा दिवस ..

महाराज: एक दिवस, एक आठवडा असं नसतं ते ! कधी ह्या धर्माचा उत्सव तर कधी त्या धर्माची प्रार्थना ! का तुमचा देव बहिरा आहे का लोकं बहिरी आहेत ! ह्याना कुणी थांबवायला गेलं की धर्म बुडाला म्हणून बोंब मारतात !

प्रधानजी: मी पण गेल्या वर्षी त्याना हेच सांगत होतो नाचता नाचता ! ए ढपाक टपाक ढपाक टपाक (नाचतो)

महाराज: प्रधानजी ! अहो तुम्ही तरी त्यांच्या तालावर नाचू नका ! प्रश्न फक्त एखाद्या उत्सवाचा नाहीये ! उदासपणे, मरगळल्यासारखा उत्सव साजरा करा अस कोण म्हणेल ? अहो हीच तर आमच्या जनतेसाठी आनंद लुटायची सुवर्णसंधी !

प्रधानजी: हो ना महाराज नाहीतरी आपल्या राज्यात अश्या संध्या फार कमी मिळतात !

महाराज: प्रधानजी ! हं.. पण अशा उत्सवात मोठ्या आवाजाने लोकाना त्रास होवू नये हा साधा विचार कुणाच्या मनात येत नाही ? त्याना त्यातून कसा मिळणार आनंद ? कधी थांबणार हे ध्वनीप्रदूषण ? कुणी आजारी माणूस असेल, म्हातारंकोतारं असेल, लहान मूलं असतील त्यांना किती तो त्रास ? माझ्या कानाचा पडदा गच्चीवर वाळत घातलेल्या पंच्यासारखा फडफडतोय !

प्रधानजी: पण महाराज.. आत्ता काय ह्याच एकदम ? सगळे उत्सव संपले आता.. तुमचं बोलणं म्हणजे आत्ता जुनाच एपिसोड चुकून दाखवल्यासारख वाटतंय !

महाराज: अहो, उत्सवाच्या काळात ऐकण्याच्या मनस्थितीत फार कमी लोक असतात म्हणून आत्ता बोलायचं ! बोललं तरी त्या स्पीकरच्या ‘भिंतींच्या’ आवाजात आमचाही आवाज ऐकू येईनासा झालाय !

प्रधानजी: खर आहे महाराज. मिरवणुकीतले काही लोक तर ऐकण्याच्याच काय तर चालण्याच्या परिस्थितीतही नसतात... पण ह्या विषयी जनजागृती व्ह्यायला पाहिजे !

महाराज: अगदी बरोबर म्हणालात !

प्रधानजी: झालं तर मग.. मी आत्ताच लाऊड स्पिकर लावून लोकाना जागृत करायचे आदेश देतो!

महाराज: प्रधानजी !!! तुम्ही... तुम्ही म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहात ! आत्ता मी तुम्हाला ध्वनीप्रदूषणाविषयी सांगितल आणि तुम्ही लाऊड स्पिकर लावायच्या गोष्टी करताय ?

प्रधानजी: महाराज टेक इट लाऊडली .. म्हणजे आपल ते, टेक इट लाईटली ! पण तुम्ही ध्वनीप्रदूषीत झालात म्हणजे काय ?

महाराज: (‘सांग सांग भोलानाथ’ च्या चालीवर )
कान कान गेला काऽऽन ! पडदा फाटेल का ?
कानामधे शिट्टी वाजून बहिरा होईन काय ?

कान कान गेला काऽऽन !

माझ्या घराशेजारी
भलामोठा स्पीकर
आवाज त्याचा आदळून
उठेल कारे डोकं..

गेला काऽऽऽन ! गेला काऽऽऽन !

प्रधानजी: बास बास महाराज.. कळला तुमचा मुददा ! ह्यांची आवाजी बंद करायला हवी आहे ! आपल्या लोकाना बेशिस्तीची सवय झाली आहे. कुठलाही नियम पाळायचा नाही हाच नियम झाला आहे हल्ली !

महाराज: म्हणजे काय ?

प्रधानजी: आता आपण शिस्तीत विचार करु. एकेक आयटम सॉंग घेउ आता !

महाराज: कायऽऽऽऽऽऽ ?

प्रधानजी: नाही एकेक आयटम घेउ अस म्हणायच होत. सवयीने…

महाराज: छान !

प्रधानजी: काय आहे महाराज लोकाना कळतंय पण वळत नाहीये. आता बघा, वनस्पतींवर सुद्धा कर्कश्य संगीताचा वाईट परिणाम होतो अस सिद्ध झालय !

महाराज: काय म्हणताय काय ?

प्रधानजी: खर आहे महाराज. आपले शास्त्रज्ञ वेळ जात नसला की अधून मधून प्रयोगही करतात. असाच त्यानी प्रयोग केला की काचेच्या दोन बंद खोल्यामधे प्रत्येकी एक अशा एकसारख्या वनस्पती ठेवल्या.

महाराज: हा कसला प्रयोग ?

प्रधानजी: ऐका तर खर ! मग त्यानी एका खोलीमधे मंद मधुर शास्त्रीय संगीत लावलं तर दुसऱ्या खोलीत कर्कश्य असे संगीत.

महाराज: कर्कश्य म्हणजे ?

प्रधानजी: म्हणजे ज्यात नुसते ढणाढणा बडवत असतात आणि शब्द काही माती का दगड काही कळत नाही !

महाराज: माती का दगड कळत नाही ? हां हां.. म्हणजे हार्ड रॉक ! बर मग काय झाल ?

प्रधानजी: काय आश्चर्य सांगायच महाराज. थोड्याच दिवसात त्या मधुर मंद संगीताकडे झेपावत पहिल्या खोलीतली वनस्पती वाढली आणि दुसऱ्या खोलीतली वनस्पती कर्कश्या संगीतापासून दूर विरुद्ध दिशेने वाढायचा प्रयत्न करत करत बिचारी कोमेजली !

महाराज: काय म्हणताय काय ? म्हणजे जे झाडांना कळतं ते आपल्यातल्या काही जुन्या खोडांना कळत नाही ?

प्रधानजी: कळत महाराज. पण मूळ मुद्दा हाच आहे की परंपरेच्या नावाखाली ते मनमानी करतात ! कुठलेही बंधन त्याना नको आहे. पण हे ध्वनिप्रदूषण उत्सवापुरतेच मर्यादित नाही महाराज ! ह्या गोंधळात सुजाण नागरिकांची मुस्काटदाबी होऊन त्यांचा आवाज बंद झाला आहे !

महाराज: ते काही नाही ह्या सगळ्यावर ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई करा.

प्रधानजी: ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई ? अवघड आहे महाराज !

महाराज: आता काय झालं ?

प्रधानजी: नाही, कारवाई कायदेशीर केली तर ती ताबडतोब असणार नाही ! आणि कडक केली तरी ती कायदेशीर असणार नाही !

महाराज: हं...

प्रधानजी: त्यापेक्षा तुम्ही जनहित याचिका दाखल करा.

महाराज: म्हणजे काय होईल.

प्रधानजी: म्हणजे मग पटापट कारवाई होईल महाराज.

महाराज: ते काही नाही ! मी महाराज आहे ना ? मीच जनहित याचिका दाखल करु ? एकेकाला कडक शिक्षा करा.

प्रधानजी: कुठली महाराज !

महाराज: एकेक गुन्हा सांगा, मी शिक्षा सांगतो.

प्रधानजी: ठीक मी आजच दवंडी पिटवतो

महाराज: ऑं ?

प्रधानजी: नाही, हळू आवाजात पिटवतो ! पहिला गुन्हा : वेळीअवेळी कर्कश्य गाणी लावणे विशेषत: अर्थहीन, अश्लील गाणी देवासमोर किंवा पुजेच्या ठिकाणी लावणे !

महाराज: अश्या लोकांच्या कानाखाली खुद्द आमच्या हातून आवाज काढण्यात येईल ! पुढचा गुन्हा सांगा …
प्रधानजी: गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभारुन देवाला इतक बहिरं करुन सोडणं की तो वैतागून सर्वसामान्यांची गा-हाणी ऐकेनासा होतो !

महाराज: ह्यावर एकच शिक्षा ! त्या लोकाना डोलबायच्या स्पिकरच्या भिंतीत चिणून मारले जाईल !

प्रधानजी: महाराज पुढचा गुन्हा म्हणजे मोठ्मोठ्याने हॉर्न मारत गाडी चालवणे अथवा उभी करणे !

महाराज: त्याना हॉर्नवर सुळी द्या !

प्रधानजी: आ ?

महाराज: अहो बैलाच्या हॉर्नवर म्हणजे शिंगावर सुळी द्या !

प्रधानजी: शेवटचा गुन्हा जरा खाजगी आहे. राणीसाहेबांच्या..

महाराज: आ ? राणीसाहेबांच्या खाजगी गोष्टी तुम्हाला काय माहीत !

प्रधानजी: नाही तस नाही. राणीसाहेबांचे एक काका, भैय्यासाहेब त्यांच नाव.. ते आमच्या शेजारी रहातात. माझी बायको सांगते की ते आंघोळीच्या वेळी ..

महाराज: तुमच्या बायकोच्या ?

प्रधानजी: नाही हो ! भैय्यासाहेब त्यांच्याच आंघोळीच्या वेळी …

महाराज: काय करतात ?

प्रधानजी: आंघोळ करतात ! ते सोडा .. पण शिवाय मोठ्या भसाड्या आवाजात गातात हो ! तेसुद्धा क्लासिकल... म्हणजे आपण क्लासिकलच गातो असंच भैय्यासाहेबांना तरी वाटतं ! त्यांचे ते भिजलेले सूर ऐकून घशाला कोरड पडते हो आमच्या !

महाराज: मग जलमंत्र्यांना सांगून पाणी पुरवठा बंद करायचा त्यांचा ! एकदा नळाचं पाणी पळालं असतं की त्यांच्या तोंडचही पळालं असतं..

प्रधानजी: अहो तेही केलं .. तर नळाकडे पाहून त्यानी मेघमल्हार राग असा आळवायला सुरुवात केली की घाबरून आम्ही पाणीपुरवठा पूर्ववत केला ! आता तर त्यांचा स्वत:च्या गाण्यावर फारच विश्वास बसलाय.. गाता यावं म्हणून ते तीनतीनदा आंघोळ करतात ! महाराज आजूबाजूची प्रजा संत्रस्त झाली आहे हो !

महाराज: होय अशा तक्रारी फार येत आहेत आजकाल ! ह्यावर एकच शिक्षा, एकच उपाय !

प्रधानजी: कोणता महाराज ?

महाराज: त्यांना दहा दिवसाची मुदत द्या.. तेवढ्या अवधीत जर त्यांचे गाणे थांबले नाही तर भैय्यासाहेबांचे आंघोळीच्या बादलीत विसर्जन करा ! बोला गणपती बाप्पा …

प्रधानजी: मोरया !!!


***

Jan 1, 2008

आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

अहा हा ! एणार एणार म्हणताना सहलीचा दिवस आलाच. आक्शरशा सुवरणाच्या आक्शरानी लिहून ठेवून देण्याचा तो दिवस होता (आमच्या वर्गात सुवरणा चित्रेचे आक्शर सर्वात चांगले आहे).
सकाळच्या मंगल वेळी पक्शी कोकीलकूजन करत होते. मि व अंत्या एकत्र शाळेत पोचलो तेव्हा बसचा पत्ताच नव्हता. साखरदांडे सर नेहमीचसारखे रागीट दिसत होते (त्याना आम्ही उसाचं चिपाड म्हणतो कारण की ते काडीपेल्वान आहेत) . आज ते बसवाल्यांवर अतिचशय चिडले होते. आपल्या देशात वेळापत्रकातल्या वेळेचे महत्व लोकाना नेमी उशिरा कळते. पक्शी घड्याळ न घालताही योग्य वेळी किल्बी लाट करतात मग माणसे तसे का करत नाहीत बरे ? मी अंत्याला हे सांगितल्यावरती तो म्हणाला की घड्याळ घालावयास पक्शांना हात नसतात त्यामुळे त्यांचे घड्याळ अदरुश्य असते. मग शेवटी एकदाचे बसवाले आले.
बसमधे चढताना सरवाना रोमहर्शक वाटत होते. पण तेव्हढ्यामधे गायतोंडेच्या वेणीला कुणीतरी चुंगम चिक्टवण्याचे निन्दनीय क्रुत्त केल्याचे समजताच ती किंचाळली. मग साखरदांडे सरानी तिच्या जवळील एक दोन मुलाना झोडपून शासन केले. बसमधे मजल दरमजल करत अस्ताना आम्ही मुले विरुद्ध मुली अशा गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. मुलांवर चऊदावी भेंडी चढत असतानाच आम्ही शनिवार वाड्यापाशी पोचलो.
शनिवार वाडा हा आयतीहासिक किल्ला आहे. एका पेशवे आडनावाच्या राजांनी तो बांधला होता. ते घरचे श्रीमंत होते. ही मऊलिक माहिती अंत्याने आम्हाला दिली. अंत्याला आयतीहासिक गोष्टींची खूपच माहिती आहे (साखरदांडे सरांपेक्षाही जास्त).
वाड्यापाशी गुरे, गायी, म्हशी व रेडे इत्यादि पाळीव व उपयुक्त पशू होते. वाड्याची भिंत तीन पुरुष उंच आहे असे उपासने सर म्हणाले. अबब असे म्हणत आम्ही मनाशीच एकावर एक माणसे चढवून दहीहंडी करुन पाहिली तर ती ४ माणसे होवू लागली. कदाचित पुर्वीच्या पुरुषांपेक्शा आत्ताची माणसे बुटकी झाली असावीत. त्यामुळे थोडा गोंधळ उडत आसातानाच गुर नावाच्या एका पाळीव पशूने मला धक्का दिला. त्या धक्क्यातुन सावरल्यावर मी पुन्हा भिंतीचे निरिक्शण करु लागलो.
उपासने सरानीच आम्हाला जिदन्यासा हा एक मोठा गुण आहे हे शिकविले आस्ल्यामुळे मी लगेच ही एव्हढी उंचच उंच भिंत बांधली कशी आसेल आसं विचारलं. तर ते वसकिनी आमच्या अंगावर खेकसले. मग अंत्या हळूच म्हण्ला की एकावर एक उभे राहून तीन मजूरानी ती बांधली असेल तर माईणकर म्हणाला की त्यांनी शिडी वापरली असेल. पण आधी भिंतच नसेल तर शिडी टेकवणार कशावर ? असा प्रशन मला पडला होता तो पडूनच राहिला.
पण ह्या उदाहरणावरून आपल्याला अरवाचीन शिल्पकला किती प्रगतीशिल होती हेच दिसत नाही का ?
आत जाताच उपासने सर आम्हाला भराभर भराभर माहिती देवू लागले. ती काहीच कळत नसल्याने आम्हाला जणू काही त्यांच्या तासाला बसल्यासारखेच वाटले. पूरवी तिथे अरवाचिन बाग तसेच बगीचे वगेरे होते. (त्यावेळीही हरित क्रांति झाली होति काय असा प्रशन मला विचारायचा होता परन्तु सर पुन्हा वसकिनी ओरडावयाच्या भितिने मी मटकी गिळून गप्पच राहिलो) . तिथे एक मोड कळीस आलेले दगडी कारंजेही होते. एके काळी त्यात खालून वर पाणी उडावयाचे. पण आत्ता ते बंद होवुन नादुरुस्त पडले होते. ह्यावरून त्या काळचे पाण्याचे पंपही प्रगतीशिल होते हेच दिसत नाही का ?
इतका विचार करावयाची सवय नसल्याने आम्हाला कडाक्याची भुक लागली. बाजारु खाण्याने प्रक्रुतीवर हानिकारक व खोलवर परिणाम होतात त्यामुळे आम्ही आमचे घरुन आणलेले डबे उघडले व वदनिक वळ घेता म्हटले. जेवताना उपासने सरानी काका मला वाचवाची गोश्ट सांगितली. त्यात हिंसा व खुनाखुनी असल्याने आमची छाती आतिशय धडधडू लागली. पण ती रहस्यमय गोश्ट ऐकुन आमचे न्यान खूपच वाढले.
दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले. मग मात्र त्यानी माईणकरला बुकलायला सुरुवात केली. तेव्हा तो वेड्यासारखा काका मला वाचवा असे ओरडू लागला. मग आम्ही पर्तीच्या प्रवासासाठी बसमधे बसलो.
घरी आलो तेव्हा शेजारचे भिंगार्डे आजोबा आमच्याकडे आले होते. (ते खडूस आहेत. आम्ही त्याना डोमकावळा म्हणतो) त्यानी माज्यावर प्रशनांची सर बत्ती केली. मी आपली आठवून आठवून कशीबशी उत्तरे दिली. त्यावर त्यानी ' शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की ? ' असे विचारले. (ते मला अजिचबात आवडत नाहित)
रात्री झोपल्यावरती मला विचित्र विचित्र अशी स्वपने पडली. एका स्वपनात तर मला वाड्याच्या दरवाजात अडकलेली पिमटी बस दिसत होती व टपावर माईणकर बसला होता. दुसर्या स्वपनामधे साखरदांडे सर भिंतीला टेकविलेल्या शिडीवर बसून चुंगम खात होते.
तर मित्रानो व मैतिरिणीनो , अशी झाली आमची आयतीहासिक वाड्याची रोमहर्शक सहल !
- आयशॉट उरफ राफा - सहावी ड


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा