May 28, 2008

तिसरा हल्ला ! - भाग २

भाग १


त्याच वेळी...

त्याच वेळी संथामच्या किल्ल्याजवळच्या त्या अरण्यात, एक अश्वधारी पथक विशिष्ट दिशेने दौड करत होते.

दाट झाडीची, काटेरी झुड्पांची पर्वा न करता ते पुढे सरकत होते. सूर्य पूर्ण बुडायच्या आधीच त्या ठिकाणी पूर्ण अंधार पसरला होता. दूर खोल कुठेतरी सूक्ष्म प्रकाश मधूनच दिसत होता. त्या दिशेने ते पंधरा वीस अश्व सावधपणे वाट काढत होते. त्या निबीड वनात साधारण दिशा कळायला त्याना तोच एक मार्गदर्शक होता.

.. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला.. काही मशाली दिसू लागल्या आणि ते अश्वपथक इच्छीत स्थळी पोहोचले. कुणा पूर्वजांनी बांधलेले ते महाकाय मंदिर होते. एकेकाळी भव्य असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष वृक्षवेलींच्या गर्दीत चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. त्या जागी काही लोक आधीच जमले होते. मंदिराच्या राक्षसी आकाराच्या पन्नास एक पाय-यांपैकी एक दोनच एकसंध अवस्थेत होत्या.

त्यात सर्वात वरच्या पायरीवर एक विशेष लक्ष वेधून घेणारा एक वीर होता. त्याच्या जवळच असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या बलवान शरीरावरील युद्धपोषाख उजळून टाकत होता. त्या पोषाखावरील धातूची कलाकुसर मधेच चमकत होती. आधीच ते:जपुन्ज असलेला तो वीर भोवतालच्या काळ्या तमसागरात मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे भासत होता !

त्याच्या आजूबाजूला चिंताक्रांत चेह-यानी जमलेले लोक म्हणजे संथामच्या भोवतालच्या लहान राज्यांतील महत्वाच्या व्यक्ती होत्या. कुणी सेनानी होता, कुणी मुत्सद्दी होता तर कुणी त्या राज्याचा सर्व अधिकार दिलेला खास दूत. संथामचा कुठलाही पहारेकरी किंवा हेर त्या ठिकाणी फिरकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच अशा निर्जन ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते.

त्यांना नुकत्याच येऊन मिळालेल्या अश्वपथकास विसावण्याची संधी देऊन तो वीर धीर गंभीर आवाजात बोलू लागला :

"मित्रहो, पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून इथे जमल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. नुकतेच आतिस्म राज्याचे योद्धे आपल्याला सामील झाले आहेत, त्यामुळे आपल्या सर्व राज्यांच्या एकत्रित सैन्याची ताकद अजूनच वाढली आहे. "

आतिस्म योद्धयांच्या नेत्याने उठून त्याला अभिवादन केले. त्याचा स्वीकार करून तो वीर पुढे बोलू लागला :

"त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा काही गोष्टींचा आढावा घेतो. आपण सर्व जाणताच की संथामच्या सम्राटाची क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. संथामची प्रजा त्याच्या लहरी कारभाराला, उन्मत्त रंगेलपणाला कसेबसे तोंड देत एकेक दिवस काढत आहे. आपल्या दुर्दैवाने संथाम अतिशय बलशाली राज्य आहे. त्या विशाल सैन्याचा पराभव करणे आपल्याला शक्य नाही ! परंतु त्यांचे राज्य सहन करणे आता तेव्हढेच अशक्य झाले आहे. आपल्या संथाममधल्या सग्यासोय-यांची दौलत अब्रू कधी लुटली जाईल ह्याचा भरवसा नाही... आणि कधी आपल्या राज्यांवर ते सैन्य वावटळीसारखे कोसळेल सांगता येत नाही.."

उपस्थित लोकांपैकी अनेकांनी खेदाने माना हलवल्या.

"ह्यावर निर्वाणीचा उपाय आपण निवडला. थेट सम्राटावर हल्ला ! दुर्दैवाने आपले २ ही हल्ले अयशस्वी ठरले. दोन्ही हल्ल्यांचे सूत्र एकच होते : धाडसी आणि अत्यंत शूर अशा निवडक योद्ध्यांबरोबर मी किल्ल्यातील आपल्या हेरांच्या मदतीने आत प्रवेश मिळवायचा. अचानक हल्ला करुन थेट सम्राटापर्यंत पोचायचे. आणि मग मी त्याला पारंपारिक द्वंद्वाचे आव्हान द्यायचे !... माझे द्वंद्वयुद्धातील नैपुण्य तुम्हाला माहित असले तरी सम्राटही अतिशय बलशाली नि कुशल योद्धा आहे, त्यामुळे ह्या योजनेत धोका जरुर होता. सम्राटास दूर करायचा तो एकच वैध मार्ग होता. "

"सदैव कपटनिती करणा-या सम्राटास मारायचे मात्र नितीमत्ता सांभाळून ? " एक तरूण संतापून म्हणाला..

त्याला थांबायची खूण करून वीर पुढे बोलू लागला : "एकदा सम्राट मृत्यूमुखी पडला असता की त्या गोंधळाचा फायदा घेऊन किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही पुढची योजना होती. सम्राटाची जुलमी राजवट नापसंत असलेल्या लोकांची मदतही त्या मोक्याच्या क्षणी अपेक्षित होती.. पण.. पण सम्राटापर्यंत पोचण्याआधीच आपले दोन्ही प्रयत्न फसले !"

"होय" दुसरा एक योद्धा म्हणाला "दुस-या हल्ल्यामधे तर ह्या अरण्यापर्यंत येणारे एकमेव गुप्त भुयार वापरून जखमी अवस्थेत माघार घ्यावी लागली. आपला किल्ल्यातील शेवटचा हेरही पकडला गेला आणि ती गुप्त वाटही शत्रूला ज्ञात होऊन बंद केली गेली आहे"

हे भाषण ऐकून सर्व योद्धयांवर निराशेचे अदृश्य मळभ पसरले ! आजूबाजून अंधार मनात शिरला नि अजून गडद झाल्यासारखा वाटू लागला. मशालींच्या ज्योतीही अस्वस्थपणे फरफरू लागल्याचा भास होऊ लागला.

थोडी उसंत घेऊन तो वीर निग्रहाने पुढे म्हणाला "आता सर्व मार्ग संपले आहेत. त्यामुळे त्या राक्षसाचा थेट वध करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही !"

हे ऐकल्यावर काही आश्चर्योद्गार निघाले.

शेवटी, ब-याच जणांच्या मनातील शंका एका सरदाराने बोलून दाखवली "पण आपण ठरवले जरी तरी हे शक्य वाटत नाही. किल्ल्याच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. किल्ल्यात आपला एकही हेर उरलेला नाही. शासकाच्या देखरिखीखाली निष्णात योद्धे सम्राटाचे अहोरात्र संरक्षण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे दोन फसलेल्या हल्ल्यांमुळे शत्रू अधिकच सावध झालेला आहे !"

"होय ! मला कल्पना आहे" वीर म्हणाला "ह्यासाठीच मी अंतिम योजना तयार केली आहे.. सम्राटावर तिसरा आणि शेवटचा हल्ला !!"

वीराच्या ह्या उद्गारांनंतर तिथे एकच खळबळ माजली. पुन्हा हात वर करुन सर्वांना शांत करत वीर पुढे सांगू लागला :

"सम्राट शक्यतो किल्ल्यात राहूनच कारभार करत असला तरी दरवर्षी हमखास एका दिवशी किल्ल्याबाहेर येतोच येतो. तुम्हा सर्वांना माहित असेलच की संथाममधे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे किल्ल्याबाहेरच्या शिळेला म्हणजेच त्यांच्या देवतेला विविध वस्तूंनी भरलेला घट सम्राटाने अर्पण करणे... ती शिळा म्हणजेच संथामची संरक्षक देवता आहे असा लोकसमज आहे.. एरवी लोकांना तुच्छ लेखणा-या सम्राटालाही त्या लोकश्रद्धेचा अनादर करुन चालत नाही एव्हढे त्या समारंभाला पारंपारिक महत्व आहे. तर त्या समारंभाच्याच दिवशी... "

"व्यत्ययाबद्दल क्षमा असावी " वीराच्याच समोर उभा असलेला एक कृश वृद्ध म्हणाला "पण तुम्ही योजना सांगण्याआधीच माझी एक शंका आहे"

वीराने मान डोलावून संमत्ती देताच तो अनुभवी मुत्सद्दी पुढे बोलू लागला " संथामचा राज्यकर्ता जरी सम्राट असला तरी सर्व कारभार व कारस्थानांमागील चातुर्य आणि योजना मात्र शासकाची असते असाच समज आहे.. आणि तो बराच खराही आहे. मला वाटते, आपण जर निकराचा हल्ला करणारच असू तर तो शासकावरच करावा !"

पुन्हा एकदा तिथल्या लोकात कुजबूज सुरु झाली... उलटसुलट मते आपसात मांडली जाऊ लागली..

आपल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ तो वृद्ध सांगू लागला "हत्तीवरील अंबारीतील योद्ध्याशी लढायला जर आपल्या सैन्याला जड जात असेल तर, त्या हत्तीच्या माहुतालाच कंठस्नान घालावे ! ... तसे केल्यास अंकुश न राहिल्याने हत्ती अंदाधुंद होतो आणि मग अंबारीतला योद्धाही निष्प्रभ होतो.. अशा वेळी त्याचा पराभव करणे खूपच सोपे जाते ! मला काय म्हणायचे आहे ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच ! "


वृद्धाचे बोलणे ऐकून वीराने क्षणभर विचार केला आणि त्याच्या चेह-यावर स्मित पसरले..

तो म्हणाला "महाशय, तुमचा मुद्दा अतिशय तर्कशुद्ध आहे ह्यात शंकाच नाही. पण युद्धशास्त्रातल्या ह्या डावपेचाचा ह्या परिस्थितीत थेट उपयोग होईल असे वाटत नाही ! शासकाचा मृत्यू घडवला तरी सम्राटाची दहशत एव्हढी आहे की तो जिवंत असेपर्यंत, त्याच्या विरोधात असणारे पण नाईलाजाने त्याच्या बाजून लढणारे सरदार आपल्याला मदत करणार नाहीत. अशा परिस्थिती सम्राटाचे निष्ठावान सरदार आपला सहज पराभव करतील.. परंतु ह्यापेक्षाही महत्वाचे कारण आपल्याला माझी पूर्ण योजना ऐकल्यावर कळेलच... "

.. मध्यरात्र उलटून गेली होती.. वीर शांतपणे योजना सांगत राहिला.

त्याच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर कुणाचाच अविश्वास नव्हता. पण...

शांततेने व सन्मानाने जगण्याची ती शेवटची संधी होती. सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी होणे आता अत्यंत आवश्यक बनले होते !

क्रमश:


भाग १





May 25, 2008

तिसरा हल्ला ! - भाग १

तो काळ कुठला होता.. कोण जाणे.

मनाच्या वेगाने भूतकाळात प्रवास केलात किंचीत तर त्या आसपासच केव्हातरी.

पण तेव्हाही मानव असाच होता. आजच्यासारखाच. महत्वाकांक्षी, पराक्रमी, उपद्व्यापी, लोभी, तामसी. देहाने थोडा मोठा पण आकार तोच. आणि विकारही तेच.. आणि त्या देहात गुणावगुणांचा विसंगत संगम घडवणारे मानवी मनही तसेच !

...

त्या दिवशी सायंकाळी...


बेभान वारा भयाण आवाज करत होता, बेफाम वेगाने धुळीचे लोटच्या लोट उठवत होता.. त्या वा-याच्या वेगाला न जुमानणारा 'संथाम' च्या राजधानीचा प्रचंड किल्ला बुलंद दिसत होता. गेली कित्येक वर्षे अंगावर ओरखडाही उठता तो तसाच ठामपणे उभा होता. रोजच्याप्रमाणे आजही त्याच्या राक्षसी भिंती तापवून सूर्याची किरणे आता निवत चालली होती. खंदकातल्या तापलेल्या पाण्यात राहून खवळलेल्या मगरीही काहीश्या शांत होत होत्या.

किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने विस्तिर्ण असे मोकळे पटांगण होते. उत्तरेकडे किल्ल्याजवळ बाणाचा मारा पोचेल इतक्या अंतरावर कुठल्यातरी देवतेची मूर्ती होती. मूर्ती कसली, निसर्गाच्या चमत्काराने मानवी आकार प्राप्त झालेली एक मोठी शिळाच. किल्ल्याच्या एकूण आकाराच्या मानाने ती दगडी मूर्ती अगदीच नगण्य दिसे. परंतु, उत्सवाच्या दिवशी किल्ल्याइतकेच किंबहुना जास्तच महत्व त्या दगडाला येत असे.

पूर्वेकडे काही अंतरावरच एक भयंकर अरण्य सुरु होत होते, आणि तिथेच संथामचे अतिसामर्थ्यशाली राज्य संपत होते.

त्या सायंकाळी.. त्या अरण्याच्या दिशेला किल्ल्याच्या एका झरोक्यातून पाहत एक व्यक्ती उभी होती..

सम्राट !

संथामचा सर्वेसर्वा सम्राट ! घोर पराक्रमी सम्राट. कुशल सेनानी सम्राट.. आणि दुर्दैवाने अत्यंत क्रूर सम्राट !

आता काही वेळातच अंधाराचे साम्राज्य सुरु होणार होते.. पण, दिवसा मात्र त्या विशाल भूमीवर फक्त सम्राटाचे राज्य असायचे. संथामच्या म्हणजेच सम्राटाच्या आक्रमणापासून आत्तापर्यंत वाचलेली, तुरळक छोटी राज्ये होती पण अगदीच नगण्य. दुर्गम भुगोलामुळे थोडी अधिक सुरक्षित राहिलेली. पण सम्राटाच्या राज्याच्या विषारी छायेत भयग्रस्त. कधी आक्रमणाचा सर्प सीमा ओलांडून त्यांना गिळंकृत करेल ते सांगता येत नव्हते.

किल्ल्याच्या पूर्वेला अरण्य असल्याने त्या सीमेच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे तिथे संरक्षणासाठी अगदीच कमी सैन्य तैनात असे. अर्थात संथाम वर हल्ला करून आपल्याच मृत्यूला आमंत्रण कोण देणार !

त्या भयंकर अरण्याच्या आतील काही भागात सूर्यप्रकाशही पोचू शकत नसे. हिंस्र पशूंचा मुक्त वावर, आणि वाट चुकल्यावर जन्मभर त्या अरण्यातच फिरत रहाण्याची भिती अशा कारणांमुळे त्या बिकट रानात पाऊलही टाकण्याची कुणाची छाती होत नसे.

अगदी सुरवातीच्या भागात लाकूडतोड चाले.. तीही दिवसाच.

त्या सायंकाळी किल्ल्यातल्या त्या सर्वात उंच दालनातल्या झरोक्यातून, अरण्याच्या दिशेहून परतणारे काही लाकूडतोडे पाहत सम्राट उभा होता. त्याच्या मजबूत देहावरची अत्यंत उंची राजवस्त्रे आत पोचणा-या वा-याने फडफडत होती. शांतपणे बाहेर बघणा-या सम्राटाच्या मनात मात्र खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विलक्षण घटनांचा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी येऊन उभे राहिल्याचे सम्राटाला जाणवले.

सम्राटाने मागे वळून बघितले आणि त्या व्यक्तीला पाहून ब-याच वेळाने त्याच्या मुखावर स्मित उमलले.

"शासक ! वेळ झाली का ?"

"होय सम्राट ! भोजनाची वेळ झाली आहे. सेवक तयार आहे" नेहमीच्या शांत धीरगंभीर आवाजात शासक म्हणाला.

सम्राटाने क्षणभर समाधानाने शासकाकडे पाहिले.

शासक. संथामचा प्रधान ! सम्राटाच्या सर्व कटकारस्थानांमागचा मेंदू. सम्राटाच्या अनेक क्रूरकृत्यांचा साक्षीदार. अत्यंत धूर्त, कारस्थानी. तितकाच संशयी. पण त्याच्या ह्याच गुणामुळे इतर अनेक महत्वाच्या जबाबदा-यांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सम्राटाने त्याच्याकडे दिली होती : सम्राटाच्या सुरक्षेची !

शासकानेही त्या कामी सर्व बुद्धी पणाला लावली होती. सम्राटाचा संपूर्ण दिनक्रम जास्तीत जास्त वेळ किल्ल्यात सुरक्षित बसून कसा व्यतीत होईल अशी योजना शासकाने तयार केली होती. सम्राटावर हल्ला होण्याच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन खास सुरक्षित दालने आणि वेगवेगळी शस्त्रे असलेल्या निष्णात योद्ध्यांची खास पथके तयार करण्यात आली होती. सम्राटाचे संरक्षण ही एकमेव कामगिरी त्यांच्यावर होती.

एव्हढ्या योजनेनंतरही, याशिवाय अजून एका प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होतीच... आणि ती म्हणजे सम्राटाला कपटाने होऊ शकणारा विषप्रयोग !

पण ह्यावरही शासकाने एक युक्ती केली होती : सम्राटाच्या भोजनाआधी एक विशिष्ट सेवक त्या अन्नातील भाग वेगळा काढून त्याचे सेवन करत असे. दररोज तोच सेवक ! खुद्द सम्राटाने त्या सेवकाला धडधाकट पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. ही सर्व बुद्धी शासकाचीच. संशयाला जागा नको म्हणून त्या विश्वासू सेवकाची निवडही खुद्द त्यानेच केली होती.

इतकी काळजी घेऊनही, कडेकोट बंदोबस्त असूनही गेल्या काही दिवसांत सम्राटावर दोन हल्ले झाले होते !!

सम्राटाच्या सुदैवाने.. दोन्ही वेळेला ते साफ फसले होते. पण त्या घटनांनी सम्राटाची जणू झोप उडाली होती. क्षुल्लक कारणांवरून लोकांना अतिशय सहजपणे क्रूर शिक्षा देणारा सम्राट स्वत:च्या जीवावर बेतल्यावर अत्यंत अस्वस्थ बनला होता. मृत्यूच्या कल्पनेने त्याच्या कठोर ह्रुदयाचे ठोके जलद होत होते. स्वत: शूर असूनही अचानक होऊ शकणा-या हल्ल्याच्या कल्पनेने त्याचे सर्वांग घामात भिजत होते. त्याचा एकमेव आधार होता शासक !

त्या परिस्थितही विचलित न होता शासक काम करत होता. आणि म्हणूनच शासकाकडे पाहत सम्राट त्या सायंकाळी सम्राट काहीसा निर्धास्त झाला.. धीम्या गतीने पावले टाकत तो दालनाकडे जाऊ लागला. शासकही अदबीने त्याच्या मागे चालू लागला.

...

सम्राटासमोर आता तो सेवक उभा होता. त्याने अन्न ग्रहण केल्यानंतर आता बरोबर दोन प्रहर उलटून गेले होते. सेवकाने दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून सम्राटाला अभिवादन केले. त्याही मन:स्थितीत सम्राटाची मग्रूरी काहीशी उफाळून आली आणि काहीश्या थट्टेच्या सुरात तो सेवकाला म्हणाला "आमचे खास भोजन तुझ्या देहाला अगदी मानवलेले दिसत आहे. तुझी कांती आता अगदी सतेज झाली आहे."

शासकाने मंद स्मित करुन त्या सेवकास जायची आज्ञा केली. तो धिप्पाड सेवक नम्रपणे मागे सरत दालनातून निघून गेला. तो जाताच शासक अदबीने म्हणाला "सम्राट ! आपण भोजन घ्या. त्यानंतर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचे आहे ! ".


त्याच वेळी...


(क्रमश:)