Dec 15, 2013

चित्रपट संवाद - भाग ३ (अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना...)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.

‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...

त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.

तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!

मैत्री आणि लेखनातील भागीदारी संपुष्टात आल्याला काही काळ लोटला असला तरी कडू चव अजूनही त्याच्या जीभेवर रेंगाळत होती. त्यामुळे शब्दही टोकाला विष लावलेल्या बाणांसारखे निघत होते.  

मुलाखतकाराचा थेट प्रश्न आला ‘आता तुम्ही वेगळे झालात.. जावेदना यश मिळत आहे तसे तुम्हाला मिळत नाहीये अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे.. काय म्हणणं आहे तुमचं?’
(खरं म्हणजे कुणी चर्चा करो वा ना करो, वास्तव तेच होतं. गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होती.)

सलीम निर्ढावलेपणाने व आत्मविश्वासाने उत्तर दिले:
“एक संस्कृत श्लोक आहे…”


Nov 16, 2013

चित्रपट संवाद - भाग २ (दहीबडा इत्यादी)

तसं म्हटल तर ह्या लेखमालेला (हाही शिंचा फार औपचारिक शब्द) काही ठराविक आकार देता आला असता. काही अभ्यासपूर्ण, मुद्देसूद लेखन करता आले असते. परंतु विस्कळीत गप्पा (एकतर्फी का होईना) मारताना हे मुद्दे गौण ठरतात. 

अभ्यास गप्पा मारताना दिसला पाहिजे. ‘दाखवायची’ गरज भासलई नाही पाहिजे. काय?

नाहीतर, 
संवादाने गोष्ट कशी पुढे जाते, 
त्या त्या पात्राला कसा उठाव व ठसठशीतपणा येतो, 
कमीत कमी  शब्दांचा संवादही कसा आशयगर्भ असू शकतो, 
संवादांमधे बोली भाषांचा वापर 
वगैरे इत्यादींची साधक-बाधक चर्चा करता आली असती आणि त्यात तुम्हाला बौद्धीक मसाज झाला असताही. पण मग मला मजा आली नसती! गप्पा ठोकायला!

तर ते असो. आपण विषयाकडे वळूयात.

आता एखाद्या गावगुंडाने जर रस्त्यावर कोणासोबत अश्लाघ्य भाषा वापरली किंवा ‘असंसदीय’ वर्तन केले तर आपण ते समजू शकतो. परंतु, एखाद्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय असलेल्या, सज्जन सात्विक प्राध्यापकाने जर भर वर्गात एखादा तरल विषय शिकवताना समजा पानाची पिचकारी टाकली किंवा तद्दन बाजारु नवीन फिल्मी गाण्याची ओळ गुणगुणली तर ऐकणा-या/बघणा-या विद्यार्थ्यांची जी अवस्था होईल, अशी अवस्था काही वेळा होते ती मातब्बर लोकांच्या काही अपवादात्मक कलाविष्कारामधून.

आता हिंदी चित्रपटातील घिसेपिटे ड्वायलॉक तर सर्वांनाच परिचीत आहे.

ह्या ब्लॉगवरच्या खालील लेखात त्याचा परामर्श घेतला आहे. (लेख विनोदी आहेत. हसू आल्यास हसावे.)


नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !


नोकरीआणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २


पण हे झाले सदाबहार घिसेपिटे अर्थातच चाकोरीबद्ध लेखकाने लिहीलेले चौकटीतल्या संहितेतले अनेक वेळा दळून झालेले 'ड्वायलॉक'!

पण अत्यंत लोकप्रिय चित्रपटातील अत्यंत अतर्क्य संवाद कुठले असा विचार मी करतो तेव्हा हटकून सुरुवातीला ‘गोलमाल’ चे उदाहरण डोळ्यासमोर येते. 


Nov 10, 2013

चित्रपट संवाद - भाग १

'चित्रपट संवाद', म्हणजेच देशी विदेशी चित्रपटांतील लोकप्रिय  पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे अत्युत्तम पण तुलनेने कमी माहीत असलेले संवाद ह्याविषयी लिहीण्याचे डोक्यात बरेच दिवस होते.

पण ते डोक्यात आल्यापासून दोन भित्या (भिती चे अनेकवचन) माझ्या डोक्यात आहेत

१. अनेकोत्तम चित्रपट अनेक वेळा बघितल्यावर ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होऊन अत्यंत प्रिय अश्या चित्रपटातले अत्यंत प्रिय संवाद जर मी लेखात अंतर्भूत करायचे विसरलो तर हे पोस्टल्यानंतर फक्त जीभ चावणे हेच हातात (खरं म्हणजे तोंडात) राहील.

२. एव्हढ्या चित्रपटांतून नेमके संवाद स्मरणशक्तीला साक्षी ठेवून शोधायचे.. मग त्यातून हा सर्वसमावेशक असा लेख कसा काय तयार होईल?

ह्या भित्या (अनेकवचन) घालवायला मी खालील उत्तरे शोधली

१. चुकले तर चुकले.. आपण लेखाचे सिक्वेल लिहू ! (म्हणूनच हा भाग एक :) )

२. हा काही परिक्षण/समीक्षण इत्यादी प्रकारचा लेख नाही. त्यामुळे गप्पा मारताना आपण कुठे मुद्देसूद बोलतो? तर तसेच विस्कळीत स्वरूप राहू दे की. तात्पर्य, हे नुसते रसग्रहण, सौंदर्यास्वाद आहे असे समजावे.

तर मुद्दा आहे चित्रपटातील संवादांचा. त्या ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल त॔र सोन्याहून पिवळे.. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)

चित्रपटांच्या इतिहासाकडे पाहिले तर सुरुवातीला ते ‘मूक’ असत.. मग संगीत आले आणि मग संवाद. खरं म्हणजे चित्रभाषा कमीत कमी शब्दांमधे भावना व आशय पोहोचवत असेल तर ते दिग्दर्शक, नट (व संवादलेखकाचेही) यश म्हणायला हवे…संवादलेखकाचेही अशासाठी किती कुठे किती हवे आणि कुठे थांबायचे ह्याचे भान हवे त्याला, दिग्दर्शकाला आणि एडीटरलाही.

अशा परिस्थितीत, जर मॉडर्न चित्रपट जर संवादाशिवाय असेल तर ते अतुलनीय धाडस म्हणावे लागेल… ह्याचे एक अत्युत्तम उदाहरण म्हणजे 'ब्लॅक होल' हा लघुपट! 

एकही संवाद नसताना माणसाच्या हव्यास/लालसा ह्यावर यथोचित टिप्पणी करणारा हा लघुपट आहे.


Nov 9, 2013

झटक्यात...

हौस नव्हे अम्हास, उरातल्या अग्निची
पाऊल ना पडो वाकडे.. वाट ही अंधारी


- राफा

Aug 24, 2013

झटक्यात...

सफर है कठीन, रास्ता है टेढा
डगमगाकर खुदही संभलना होगा
अगर आस है किसी रोशनी की
तो प्यारे तुझे खुदही जलना होगा

- राफा

Aug 17, 2013

पानवाल्याचे गि-हाईक!

राजकारण हा धंदा झाला असेल तर… आणि असेल तर म्हणजे झाला आहेच! कोई शक? तर मग त्या न्यायाने आपण ग्राहक आहोत… म्हणजे ‘गि-हाईक’ !

उज्वल भवितव्य, खेड्यांचा विकास, शिक्षण व विज्ञानाचा प्रसार, आधुनिकता आणि प्रगती, पायाभूत सुविधा, शेती व उद्योग क्षेत्राची भरभराट, समान संधी वगैरे भावी प्रॉडक्ट्स आपल्या गळ्यात मारण्यात येतात. (ते सुद्धा ‘पाच वर्षांच्या’ वॉरंटीसहीत!)

प्रत्यक्षात आपल्याला काय मिळते? तर तोंडाला पुसलेली पाने आणि पद्धतशीरपणे लावलेला चुना ! जे सरकार पानवाल्याचे काम करते (आणि वर उद्दाम विधानांच्या पिचका-या आपल्यावरच मारते), त्यापासून 'ग्राहक संरक्षण कायद्या'नुसार संरक्षण मिळेल काय?

- राफा

Jul 21, 2013

'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!

आप्पा जोशी वसईवाले (वाचक, दैनिक 'परखड')
दिनांक: १६ ऑगस्ट १९७५

काल गावातल्या एकमेव टॉकिजमधे 'शोले' हा अप्रतिम बोलपट पाहिला. बाहेर डकवलेल्या पोस्टरावर ७० एमेम, सिनेमास्कोप असे काहीबाही लिहीले होते त्याचा अर्थ कळला नाही. बायोस्कोप पाहिला होता लहानपणी, पण हा सिनेमास्कोप काय हे कळायला काहीच स्कोप नव्हता. चित्रपटाची रिळं जास्त होती त्यामुळे पडदाही नेहमीपेक्षा मोठा लागला बहुतेक त्यांना. चित्रपट सुरु झाल्यावर पडद्यावर वर व खाली आडव्या पट्ट्या दिसत होत्या. झाकायचाच होता तर भव्य पडदा असे कशाला लिहायचे? असो. माझ्या बाजूच्या प्रेक्षकाचे आवाज डावीकडच्या का उजवीकडच्या स्पीकरमधून येतोय इथे जास्त लक्ष होते. 'श्टिर्यो' का कायसं म्हणत होता तो इसम. असो.

तरीही सामाजिक प्रश्नांना हात घालणारा 'शोले' हा अतिशय वास्तवदर्शी चित्रपट आहे असं माझं वैयक्तिक मत झालं आहे. 'विधवा विवाह' हा सामाजिक प्रश्न हाच चित्रपटाचा मुख्य विषय! बाकी डाकू-बिकू म्हणजे आपलं ताटातलं तोंडीलावणं आहे. ते जर नसतं तर 'ग्रामजीवन' व 'ग्रामोद्योग' ह्यावर एक अप्रतिम डॉक्युमेंटरी झाली असती.

'राधा' ही विधवा व 'जय'शी तिचा होऊ घातलेला विवाह हा मुख्य विषय आहे. खरं म्हणजे ह्याला विवाहबाह्य संबंध अशी कुणी दुषणे देईल. पण 'राधा'चा नवरा आधीच 'कालबाह्य' झाला असल्याने त्यांचे प्रेम 'विवाहबाह्य' होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.

अर्थात 'जय' चे पात्र जरी वरकरणी हुशार व चतुर वाटत असले तरी ते तसे नाही असही माझं वैयक्तिक मत आहे. आता ख-या आयुष्यात जी आपली बायको आहे ती चित्रपटात बदलायची सोन्यासारखी संधी मिळाल्यावरही पडद्यावर पुन्हा तीच बायको म्हणून मान्य करण्याचा मूर्खपणा जय करतो. मग काय होणार! 'आपले मरण पाहिले म्या डोळा' असे म्हणण्याची वेळ येते. एखादी 'भाग्यरेखा' एखाद्याच्या हातातच नसते. त्यामुळे तीच ती कंटाळवाणी बायको पदरी पडते. शिवाय आधीच्या सगळ्या पांढ-या साड्या असल्याने लग्नानंतर रंगीत साड्यांचा खर्च वाढणार! नशीब एकेकाचं…


Apr 17, 2013

झटक्यात

सुना है उम्मीद की रोशनी देख सारी दुनिया चलती है
लेकिन यह उम्मीद साली किस फ्युएल से जलती है ?

- राफा

Mar 27, 2013

झटक्यात


तकदीरमें थी वही पुरानी यारी
यह बात हमने तब जान ली
हम तो चले थे मुँह छुपछुपाये
मगर गम ने शक्ल पहचान ली

- राफा

Mar 18, 2013

गुटर्रर्रर्र‘गो’ !


पक्षी सहसा उडू शकतात.

कित्येक तासांच्या अथक सूक्ष्म निरिक्षणानंतर मी हे संपूर्ण वैज्ञानिक असे ठाम मत बनवले आहे. आता पक्षाने किमानपक्षी उडावे ही अपेक्षा विश्वसुंदरीने किमान नाकी डोळी नीटस असावे इतकी माफक नाही का ?

पक्ष्यांबद्दल मला साधारण तेव्हढीच माहिती आहे जेव्हढी त्यांना माझ्याबद्दल. उदाहरणार्थ, मी ‘सहसा उडत नाही’ हे त्यांना माहित आहे.

‘पक्षी उडू शकतात का?’ असा संशय येण्याइतके काही पक्षांचे पाय जमिनीवर असतात ! उदाहरणार्थ कबूतर !

कबूतर हा पक्षीविशेष रस्त्यावरच जास्त फिरत असतो, विशेषत: रस्त्याच्या अगदी मध्यावर. लहान शिकाऊ बालके कसे ‘चाला चाला’ (‘च’ चहातला) करत सराव करतात, तसे ते कबूतर डुलत डुलत, गुबगुबीत ढेरी सांभाळत चालत असते. एकतर रस्त्याच्या मध्यावर असते नाहीतर ‘लंच टाईम’ असेल, तेव्हा म्हणजे दुकानदार वाणी लोक दाणे टाकतात तेव्हा, किराणा धान्याच्या दुकानासमोर!

आता समजा, तुम्ही चारचाकी चालवत आहात आणि लांबूवरून रस्त्याच्या बरोबर मधे असलेले कबूतर तुम्हाला दिसले तर सहाजिकच तुमच्या मनात खळबळ माजते. खरं म्हणजे, झुरळ किंवा माशी वगैरे हवेत काही क्षण संचार करणारे वाह्यात नमुने सोडले तर एकदंर उडणा-या जीवांचे आणि तुमचे काही वाकडे नाही ! प्राण्यांबद्दल तुमच्या मनात असलेली भूतदया तुम्ही ‘एक्स्टेंडेड वॉरंटी’ सारखी पक्ष्यांपर्यंतसुद्धा ताणू शकता.. पण जर ते निमूटपणे उडत असतील तरच!


Mar 15, 2013

झटक्यात


गाठलेच त्यांनी मला, पण एव्हढा पोच होता
वार पहिला कुणाचा... हाच संकोच होता

कोरले शब्द खोटे, त्यांनी थडग्यावरीही
कोरावया पण टोकदार खंजीर तोच होता

- राफा

Mar 8, 2013

लोकल इश्यू !


आज एकदम दोन गोष्टी आठवल्या! 

दोन्ही आठवणी एकाच विषयाशी निगडीत: मुंबईमधील 'लोकल' सेवा !

आठवण क्र. एक :

काही वर्षांपूर्वी जनरल गप्पा मारत असताना एका मित्राशी माझी अचानक तात्विक चर्चा चालू झाली (म्हणजे वाद/उहापोह…जाज्वल्य मते व मतांतरे… कॉफी… पुन्हा उहापोह वगैरे वगैरे).

विषय होता : मुंबईमधला लोकल प्रवास, त्याचा दर्जा, सोयी व सुविधा वगैरे.

त्याचे म्हणणे असे की लोकसंख्याच इतकी आहे की काही पुरे पडत नाही. गाड्या किती वाढवणार ? शिवाय एक चतुर्थांश लोक अडाणी, अशिक्षीत (किंवा दोन्ही) असतात. ते सध्या असलेल्या व नव्याने दिलेल्या साधनांची वाट लावतात. रेल्वे प्रशासन तरी कुठे कुठे पुरे पडणार वगैरे.

त्याच्या ब-याच मुद्यांशी मी सहमत होतो. एक ठळक मुद्दा सोडला तर:

‘रेल्वे प्रशासन कुठे कुठे पुरे पडणार आहे?’

‘कुठे कुठे पुरे पडणार आहे’ म्हणजे काय ? रेल्वे म्हणजे सरकारी यंत्रणेचाच भाग आहे ना ?

तुम्ही केंद्र, राज्य, पालिका इथे सरकार व प्रशासन स्थापन करावे म्हणून कुणी उपोषणाला बसले होते काय ? का देव पाण्यात ठेवले होते ? ‘यंदा तुम्हीच व्हा गडे कारभारी’ असा गोड आग्रह केला होता का कुणी ?


Mar 2, 2013

झटक्यात दोन इनोद !

तर, येस, आय्याम गिल्टी ! सुमारे नऊ महिन्यात काहीही लिहीले नाहीये ब्लॉगवर.. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट (माझ्यासाठी) म्हणजे WIP (काम चालू म्हणून रस्ता बंद) असं अर्धवट लिखाण झालं आहे (अर्धवट हे लिखाणाचे विशेषण आहे, लेखकाचे नव्हे ) त्यामुळे ते पूर्णत्वास जाईलच कधीतरी...

तर, तोपर्यंत धुगधुगी रहावी म्हणून हे पोस्ट (फेसबुक वरच्या मित्रमैत्रिणींकडे 'अटकपूर्व जामीन' मागत आहे  त्यांनी हे आधी वाचले असेल तिथे तर ) :

तर,

प्रत्येकी सुमारे साडेतीन सेकंदात सुचलेले हे दोन इनोद (वाचून रडू फुटल्यास मला जबाबदार धरू नये :) ):

१)
तो जमाना ७० च्या दशकाच्या अगदी सुरुवातीचा ! जेव्हा डासांचा सुपरस्टार हिरो जवळजवळ प्रत्येक डासीणीच्या मनावर अधिराज्य करत होता. (सोयीसाठी आपण त्याला डासेश फन्नाम्हणू). 

अशाच एका रम्य रात्री, गाढ झोपलेल्या बंडोपंताच्या हातावर बसलेली एक नवतरुणी डासीण डासेशच्या विचाराने व्याकूळ झाली होती. न रहावून तिने निर्णय घेतला आणि बंडोपंताना चावून नुकत्याच बाहेर काढलेल्या रक्ताने ती डासेशला निर्वाणीचे प्रेमपत्र लिहू लागली. 

एव्हढ्यात, उडत उडत तिची भुकेली डासीण आई तिच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली कित्ती वेळा सांगितलयं तुला... अशी अन्नाची नासाडी करु नये !

२)
प्रथमच लहानश्या खेडेगावात आलेला चिमुकला पिंटू, एक गोठा पाहून आईला विचारतो "हे काय आहे?". 

त्यावर त्याची आई ('कित्ती कित्ती चौकस माझं शोंदड ते' छाप भाव चेह-यावर आणत) उत्तर देते "मघाशी नै का बैल नावाचा ऍनिमल पाहिलास... तो बैल दिवसा शेतात काम केल्यावर रात्री इथे गाई गाई करतो !"


(आमेन ! :) )



- राफा