Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Jun 2, 2008

तिसरा हल्ला ! - भाग ३ (अंतिम)

भाग १


भाग २




संथामच्या किल्ल्याजवळील देवता.. संथामच्या लोकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान !

त्या देवतेला घट अर्पण करण्याचा उत्सव रंगात आला होता.

सर्वत्र फुलापानांनी सजावट केली होती. आकर्षक पोशाख घातलेल्या नर्तकांचे नृत्य चालले होते. नानाविध वाद्ये वाजत होती. संथामचे सर्व सरदार तिथे उपस्थित होते. संथामच्या लोकांनी तो सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. देवतेभोवती काही अंतर रिकामे ठेवून वर्तुळाकार गर्दी जमली होती. उन्हात मधेच लखकन चमकणारे भाले घेऊन लोकाना आवरण्यासाठी रक्षक वर्तुळाच्या आतील बाजूस तैनात होते.

अचानक, वाद्यांचा आवाज अजूनच वाढला. लोक उत्सुकतेने पाहत होते. स्थिर पावले टाकत सम्राट देवतेच्या शिळेकडे निघाला होता.. त्याच्या अंगावर अत्यंत उंची वस्त्रे व आभुषणे होती. तो पूर्ण नि:शस्त्र होता. आपल्या दोन्ही हाताने त्याने तो जड घट धरला होता. तो पवित्र घट सुगंधी द्रव्यांनी व निरनिराळ्या दुर्मिळ जिन्नसांनी भरला होता.

सैनिकांच्या सुचनेवरून काहीश्या अनिच्छेनेच लोक सम्राटाचा जयजयकार करु लागले. पण काही वेळापूर्वी नाचणा-या नर्तकांसारखेच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न नाचत होते... आता त्या पवित्र घटाने तृप्त होऊन देवता संथामचे रक्षण करणार.. पण संथामचे रक्षण म्हणजेच सम्राटाचेही रक्षण असे का ? त्या क्रूरकर्म्याच्या राजवटीपासून लोकांची कधी सुटका होणारच नाही का ? देवतेला सम्राटाचे राज्य पसंत आहे का ?

आता काही पावलेच राहिली होती.. सम्राटाच्या चेह-यावर समाधान पसरले होते. देवतेला घट अर्पण केला की ताबडतोब किल्ल्यात परतण्याची व्यवस्था शासकाने केली होती. घट अर्पण करताना चालत येण्याची परंपरा असली तरी परत जाताना त्याच्या खास अश्वपथकासह त्वरेने किल्ल्यात परतायचे होते..

आता काहीच क्षण..

सम्राट शिळेच्या पायथ्याशी पोचला.. एकवार त्याने तो पवित्र घट मस्तकाला लावला..

आता.. शेवटच्या क्षणी.. सम्राट तो घट शिळेला अर्पण करणार एवढ्यात...

कुठून तरी वेगाने एक बाण सरसरत सम्राटाच्या दिशेने आला.. आणि दुस-याच क्षणी त्याने नेमका वेध घेतला..

त्या पवित्र घटाचा !

प्रथम काय झाले ते कुणालाच समजले नाही.. एका क्षणातच त्या घटाचे लहान तुकडे होऊन त्यातील पदार्थ चारी दिशांना फेकले गेले. सम्राटाचा चेहरा आणि त्याचा पोषाख पूर्णपणे माखला गेला !

एकच गोंधळ झाला. लोक भितीने पळू लागले. सम्राटाच्या रक्षकांना बाण आला त्या दिशेचा निश्चित अंदाज येईना, त्यांनी गर्दीच्या दिशेने अंदाधुंद बाण व भाले सोडायला सुरुवात केली...

एका लयीत चाललेल्या संथामच्या उत्सवात हलकल्लोळ माजला व समारंभाचा पूर्ण विचका झाला..

काही क्षण गेले.. सम्राट अजूनही अपमानाने थरथरत होता. घडलेल्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. शासकाची संरक्षण व्यवस्था, खास सुरक्षा पथक, सशस्त्र रक्षक, शिवाय प्रचंड गर्दीत मिसळलेले हेर .. कशाचाच उपयोग झाला नव्हता !

शासकाने प्रसंगावधान राखून तातडीने सम्राटाचा अश्व मागवला.. आणि काही क्षणातच विलक्षण वेगाने तो सम्राटाबरोबर किल्ल्याच्या दिशेने दौड करु लागला. सम्राटाचा चेहरा घटातून उडलेल्या द्रव्यांमुळे व संतापतिरेकाने विकृत दिसत होता.

झाली होती ती हानी दिसत होती त्यापेक्षाही भयंकर होती.. सम्राटाच्या अपमानापेक्षाही जास्त ! कदाचित कधीही भरून न निघणारी !

ज्या अर्थी सम्राट पवित्र घट देवतेला वाहू शकला नव्हता त्या अर्थी संथामच्या प्रजेच्या दृष्टीने तो अपशकून होता. काही कारणामुळे सम्राट देवतेच्या रोषाला बळी पडला होता आणि म्हणूनच घट स्वीकारण्यास किंवा सम्राटाचे रक्षण करण्यास देवता प्रतिकूल होती.. आता तिच्या कोपामुळे सम्राट कदाचित लवकरच .. ?

राजधानीतून गावागावात ही बातमी पोचणार होती. सर्वत्र हाच निष्कर्ष लोक काढणार होते.

........

........

काही बोलायची आवश्यकताच नव्हती.

किल्ल्यात शिरल्यावर शासक व सम्राट त्या खास दालनाच्या दिशेने जाऊ लागले.. कुठल्याही आणिबाणीच्या प्रसंगासाठीच त्या दालनाची व्यवस्था शासकाने केली होती.

दालनात शिरल्यावर, डिवचलेल्या हिंस्र पशूसारखा संतापलेला सम्राट आपल्या स्थानावर जाऊन बसला. त्याच्या डोक्यात प्रचंड स्फोट होत होते. आपला राग काढायला समोर जर कुणी दोषी मिळाला असता तर त्याने आजवर दिलेल्या क्रूर शिक्षांना लाजवेल असे हाल केले असते त्याचे !

पण आज त्याच्यासमोर कुणीच अपराधी नव्हता, आणि हीच गोष्ट त्याच्या संतापात अजूनच भर टाकत होती.

त्याच्या नंतर दालनात प्रवेश केलेल्या शासकाने तिथला एकमेव दीप प्रज्वलित केला. त्या दिव्याच्या अपु-या प्रकाशात सम्राटाचा चेहरा अजूनच अक्राळविक्राळ दिसू लागला.

मग शासकाने त्या दालनाच्या रुंद अशा भिंतीतली बेमालूमपणे मिसळून गेलेली एक कळ सर्व शक्तिनिशी आत सरकवली. त्याबरोबर त्या दालनाचा एकमेव अवजड दरवाजा बंद होऊ लागला. त्या विशिष्ट धातूंच्या मिश्रणातून बनलेल्या दरवाजाला भेदणे बाहेरच्या कुठल्याही मानवाला वा शस्त्राला शक्य नव्हते.

दरवाजा पूर्ण बंद झाल्याची खात्री करुन शासक सम्राटासमोर आपल्या आसनावर बसला. झालेल्या घटनेनंतर लगेचच त्याने आपल्या भावनांवर ताबा मिळवलेला दिसत होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच अतिशय शांत होता. एखाद्या निश्चल जलायशासारखा. पण त्या शांत पाण्यात खोल कुठल्या कारस्थानांचे सर्प फिरत असतील ते पहाणा-याच्या लक्षात यायचे नाही !

त्याच्या समोर बसलेला सम्राट अजूनही झालेला अपमान पचवायचा प्रयत्न करत होता.. एकीकडे तो संतापला होता आणि दुसरीकडे आत्तापर्यंत कधीही न आलेली विलक्षण भिती आणि अस्थैर्याची भावना त्याचं मन पोखरत होती ! शासकाचे अनुभवी डोळे सम्राटाकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याचा शांतपणा पाहून सम्राट अजूनच बिथरला.. अंगाला आलेले कापरे अजूनही कमी झाले नव्हते.

"शासक, मला आजचा अपराधी हवा आहे " शांतता असह्य होत सम्राट बरळल्यासारखा ओरडला

सम्राट, मला तुमच्याशी तीन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत" शासक म्हणाला.

"पण आजच्या घटनेशी.. "

"संबंध आहे ! त्या तीनही गोष्टींचा आजच्या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे !" शासक ठामपणे म्हणाला... "तुम्हाला आठवतं ? तुमच्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा तुमच्या सुरक्षा पथकाच्या प्रमुखाला, 'तेजराज'ला, तुम्ही द्रोही ठरवलंत.. आणि मग.. सर्वांदेखत हाल हाल करून मारलंत ! ... नंतर केलेल्या चौकशीत असं आढळलं की तेजराज प्रामाणिक होता, शूर होता, आपल्या सहका-यात अतिशय लोकप्रिय होता.. आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे निर्दोष होता. हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता "

"अशा शुल्लक गोष्टींची चर्चा आपण कधीपासून करु लागलो शासक ?" सम्राट ओरडला " त्याच्या मृत्यूचा आजच्या.."

"सम्राट, ही शक्यता तुम्ही लक्षात घेतली आहे का की लोकप्रिय तेजराजच्या कुणा आप्ताने सूड म्हणून आज..."

"असे दु:साहस कोण करेल तर त्याची काय अवस्था होईल हे सर्वाना माहित आहे.. तरीही शंकानिरसन म्हणून त्याच्या सर्व आप्तजनांना पकडून.. " बोलता बोलता सम्राटाला एकदम दम लागला. " ते जाऊ दे. शासक ! तू सांगणार असलेली दुसरी गोष्ट महत्वाची असेल अशी मी आशा करतो".

सम्राटाच्या उद्गारांनी शासक दुखावल्यासारखा वाटला.

पण तरीही सावरून तो पुढे सांगू लागला " ठीक ! आता दुसरी गोष्ट. तुम्हाला माहित आहेच की तुमच्या आधी सेवकाने तुमच्या अन्नातील भाग सेवन करण्याची योजना माझीच आहे !... तो सेवक आपल्या मातापित्यांचा एकुलता एक पुत्र नाही !"

सम्राटाचे मस्तक विलक्षण वेदनेने ठणकू लागले.. तो ओरडला " शासक ! आज तुला काय झाले आहे. ह्या आणिबाणीच्या क्षणी तू काय निरर्थक..'

त्याचे वाक्य तोडत शासक म्हणाला " त्या सेवकाला जुळा भाऊ आहे. आणि ह्या वयातही दोघे तंतोतंत सारखे दिसतात.. ज्याला तुम्ही सध्या पाहत आहात तो जुळा भाऊ आहे"

शासकाने आपले भेदक डोळे सम्राटावर रोखले. सम्राटाचा पार शक्तिपात झाला होता. शासकाची तीक्ष्ण नजर सम्राटामधले अपेक्षित बदल टिपू लागली. ती नजर पाहूनच सम्राटाच्या अंत:र्मनात कुठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली.

आणि एखाद्या वीजेसारखे शासकाचे वाक्य त्याच्यावर कोसळले : "सम्राट, तो सेवक मृत्यू पावून आता पंधरा दिवस झाले आहेत"

"काय ??" सम्राट हडबडला.. त्या वाक्याचा अनर्थ हळूहळू त्याच्या लक्षात येत होता !

"होय. त्याचे राहण्याचे ठिकाणही गुप्त असल्याने कुणालाच सुगावा लागला नाही. मी लागू दिला नाही ! तेव्हापासून त्याचा जुळा भाऊ संरक्षक सेवक बनून तुमचे अन्न सेवन करत आहे !"

"शा.. शासक " सम्राटाने चवताळून उठायचा प्रयत्न केला पण तो मागेच आसनावर कलंडला..

"ह्या सगळ्याचे उत्तर तिस-या गोष्टीत आहे सम्राट ! पण त्या आधी तुम्हाला काही दाखवायचे आहे " शासकाने काळजीपूर्वक आपल्या पोशाखातील एका कप्प्यात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. ब-याचशा पारदर्शक पदार्थाने बनलेली ती एक छोटी कुपी होती. जवळ जवळ रिकामीच.. फक्त तिच्या तळाशी विचित्र निळ्या रंगाचे चिकट द्रावण दिसत होते.

सम्राटाचा चेहरा पांढराफटक पडला होता.. त्याने थरथरत हात उचलला आणि त्या कुपीकडे बोट केले

"हे... "

"अगदी बरोबर.. हेच रोज थोडं थोडं ! अन्नामधून ! ... त्या सेवकाचा मृत्यू झाला आणि तुमच्यावर चालू असलेल्या प्रयोगाचा शेवटचा भाग चालू झाल्याची खात्रीच मला पटली ! होय, अत्यंत मंद गतीने होणारा विषप्रयोग !"

"तू ? मला ... ? का !" सम्राट बरळला.

"होय. मी तूलाच !" शासकाच्या बदललेल्या आवेशाने सम्राट दचकला. "मीच अत्यंत योजनापूर्वक तुझ्यावर विषप्रयोग केला ! ह्या दुर्मिळ विषाची हीच खासियत आहे. अगदी नैसर्गिक वाटतो मृत्यू ! हा जुळा भाऊ असलेला सेवकही मीच निवडला होता.. कारण अतिशय सुदृढ व निरोगी असा तो सेवकही तुझ्या आधी मृत्यू पावण्याची शक्यता मी गृहीत धरली असती. आणि झालंही तसंच ! पण त्याच्या बदली त्याच्या भावाला मी किल्ल्यात गुप्तपणे आणल्यामुळेच... त्या सेवकाच्या अचानक तेजस्वी झालेल्या कांतीचे रह्स्य तुला कळलेच असेल.. "

"पण शा... का...? का ?"

शासकाचे निखारे ओकणारे डोळे एकदम निवले.. पाण्याने डबडबल्यासारखे झाले..

"ते माझे प्रायश्चित्त आहे.. आणि एका दुर्दैवी पित्याचा सूडही !" शासकाचे अश्रू ओघळले पण त्याला पर्वा नव्हती "होय सम्राट ! तेजराज माझा पुत्र होता !! ही गोष्ट त्याच्या मातेशिवाय कुणालाही माहित नव्हती. त्याचा भयानक मृत्यू माझ्या ह्या डोळ्यानी पाहताना... " शासकाने डोळे हातानी झाकून घेतले..

सम्राटाला आभाळ कोसळल्यासारखे वाटत होता. सर्वांगास वेदना सुरु झाल्या होत्या.

डोळे पुसून शासक सांगू लागला "मला प्रथमच त्या असंख्य लोकांच्या वेदना जाणवल्या ज्यांना मी निर्दयपणे मृत्यू दिला. केवळ तुझे साम्राज्य टिकावे आणि सदैव तुझेच रहावे म्हणून ! खूप कट कपटकारस्थाने केली केवळ तुझी आणि संथामची सत्ता वाढावी म्हणून... माझ्या पुत्राला मी त्याचा हक्क देऊ शकलो नाही.. पण त्याचा असा मृत्यूही मला टाळता येऊ नये.. ?" शासकाचे डोळे पुन्हा एकवार कठोर झाले. " त्या क्षणापासून सूडाग्नीमधे माझे अ:तकरण जळत आहे. त्या क्षणापासून स्वामीनिष्ठेचा मी फक्त अभिनय करतो आहे"

"शा..." सम्राटाने क्षीण प्रयत्न केला, आणि तो तसाच हताश पडून राहिला.

ते पाहिल्यावर शासक अत्यंत समाधानाने हसला. कमरेचे धारदार शस्त्र काढून त्याने सहज हाताला येईल असे ठेवले.. "ही फक्त खबरदारी आहे सम्राट ! तू आता उठूही शकणार नाहीस. तूला माहीतच आहे माझी प्रत्येक योजना निर्दोष राहील अशी काळजी मी घेतो!"

सम्राटाने सर्व शक्ती लावली पण त्याला बोटही उचलता येईना.. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.. हृदय मंद होत चालल्याचा भास होऊ लागला.

शासक आता शून्यात पाहून समाधानाने बोलू लागला "आज माझा सूड पूर्ण होईल ! थोड्याच वेळात शत्रूराज्यांचे एकत्रित सैन्य किल्ल्यात प्रवेश करेल. तशी व्यवस्था मी केली आहे. त्यांच्या पहिल्या हल्ल्यानंतर मीच त्यांच्या प्रमुखाशी गुप्त भेटी घेतल्या. त्याच तेजस्वी वीराने मी सांगितल्याप्रमाणे पवित्र घटाचा वेध घेतला ! ह्या राज्याला आता प्रजाजनांची काळजी घेणारा न्यायप्रिय सम्राट लाभेल.. पण त्या आधी.. स्वामीनिष्ठेचा शेवटचा अभिनय मला करायचा आहे. आता थोड्याच वेळात तुझी पूर्ण वाचा जाईल. . मग मी दालनाचा दरवाजा उघडून धावाधाव करेन. अचूक सांगायचे तर अजून एक प्रहरानी तू मृत्यू पावशील ! "

सम्राट असहाय्यपणे ऐकत होता..

"तुझे निष्ठावान सरदारही काही करू शकणार नाहीत ! त्याना शंकाही येणार नाही ! कारण संथामची देवता तुझ्यावर कोपली आहे असाच सर्वत्र समज आत्तापर्यंत पसरला असेल. तिनेच तुझा बळी घेतला अशीच सा-यांची समजूत होईल... आता फक्त काही क्षणच मला प्रतिक्षा करायची आहे"

एव्हढे बोलून, काहीश्या थकव्याने, शासक त्याच्या आसनावर पहुडला आणि त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले.. थोड्याच वेळात गुप्त कळ पुन्हा दाबून तो अजस्त्र दरवाजा त्याला उघडायचा होता. शिवाय अजून काही वेळाने, किल्ल्यावर ताबा मिळवायला इतर राज्यांच्या सैन्याला मार्गदर्शन करायचे होते !

...

सम्राट आता निश्चेष्ट पडला होता..

त्या दालनात आता फक्त शांतता मंद वाहत होती... त्या शांततेच्या डोहात सावकाश पावले टाकत येत असलेला आपला मृत्यू सम्राटाला ऐकू येत होता.

सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी झाला होता !





***

May 28, 2008

तिसरा हल्ला ! - भाग २

भाग १


त्याच वेळी...

त्याच वेळी संथामच्या किल्ल्याजवळच्या त्या अरण्यात, एक अश्वधारी पथक विशिष्ट दिशेने दौड करत होते.

दाट झाडीची, काटेरी झुड्पांची पर्वा न करता ते पुढे सरकत होते. सूर्य पूर्ण बुडायच्या आधीच त्या ठिकाणी पूर्ण अंधार पसरला होता. दूर खोल कुठेतरी सूक्ष्म प्रकाश मधूनच दिसत होता. त्या दिशेने ते पंधरा वीस अश्व सावधपणे वाट काढत होते. त्या निबीड वनात साधारण दिशा कळायला त्याना तोच एक मार्गदर्शक होता.

.. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला.. काही मशाली दिसू लागल्या आणि ते अश्वपथक इच्छीत स्थळी पोहोचले. कुणा पूर्वजांनी बांधलेले ते महाकाय मंदिर होते. एकेकाळी भव्य असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष वृक्षवेलींच्या गर्दीत चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. त्या जागी काही लोक आधीच जमले होते. मंदिराच्या राक्षसी आकाराच्या पन्नास एक पाय-यांपैकी एक दोनच एकसंध अवस्थेत होत्या.

त्यात सर्वात वरच्या पायरीवर एक विशेष लक्ष वेधून घेणारा एक वीर होता. त्याच्या जवळच असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या बलवान शरीरावरील युद्धपोषाख उजळून टाकत होता. त्या पोषाखावरील धातूची कलाकुसर मधेच चमकत होती. आधीच ते:जपुन्ज असलेला तो वीर भोवतालच्या काळ्या तमसागरात मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे भासत होता !

त्याच्या आजूबाजूला चिंताक्रांत चेह-यानी जमलेले लोक म्हणजे संथामच्या भोवतालच्या लहान राज्यांतील महत्वाच्या व्यक्ती होत्या. कुणी सेनानी होता, कुणी मुत्सद्दी होता तर कुणी त्या राज्याचा सर्व अधिकार दिलेला खास दूत. संथामचा कुठलाही पहारेकरी किंवा हेर त्या ठिकाणी फिरकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच अशा निर्जन ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते.

त्यांना नुकत्याच येऊन मिळालेल्या अश्वपथकास विसावण्याची संधी देऊन तो वीर धीर गंभीर आवाजात बोलू लागला :

"मित्रहो, पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून इथे जमल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. नुकतेच आतिस्म राज्याचे योद्धे आपल्याला सामील झाले आहेत, त्यामुळे आपल्या सर्व राज्यांच्या एकत्रित सैन्याची ताकद अजूनच वाढली आहे. "

आतिस्म योद्धयांच्या नेत्याने उठून त्याला अभिवादन केले. त्याचा स्वीकार करून तो वीर पुढे बोलू लागला :

"त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा काही गोष्टींचा आढावा घेतो. आपण सर्व जाणताच की संथामच्या सम्राटाची क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. संथामची प्रजा त्याच्या लहरी कारभाराला, उन्मत्त रंगेलपणाला कसेबसे तोंड देत एकेक दिवस काढत आहे. आपल्या दुर्दैवाने संथाम अतिशय बलशाली राज्य आहे. त्या विशाल सैन्याचा पराभव करणे आपल्याला शक्य नाही ! परंतु त्यांचे राज्य सहन करणे आता तेव्हढेच अशक्य झाले आहे. आपल्या संथाममधल्या सग्यासोय-यांची दौलत अब्रू कधी लुटली जाईल ह्याचा भरवसा नाही... आणि कधी आपल्या राज्यांवर ते सैन्य वावटळीसारखे कोसळेल सांगता येत नाही.."

उपस्थित लोकांपैकी अनेकांनी खेदाने माना हलवल्या.

"ह्यावर निर्वाणीचा उपाय आपण निवडला. थेट सम्राटावर हल्ला ! दुर्दैवाने आपले २ ही हल्ले अयशस्वी ठरले. दोन्ही हल्ल्यांचे सूत्र एकच होते : धाडसी आणि अत्यंत शूर अशा निवडक योद्ध्यांबरोबर मी किल्ल्यातील आपल्या हेरांच्या मदतीने आत प्रवेश मिळवायचा. अचानक हल्ला करुन थेट सम्राटापर्यंत पोचायचे. आणि मग मी त्याला पारंपारिक द्वंद्वाचे आव्हान द्यायचे !... माझे द्वंद्वयुद्धातील नैपुण्य तुम्हाला माहित असले तरी सम्राटही अतिशय बलशाली नि कुशल योद्धा आहे, त्यामुळे ह्या योजनेत धोका जरुर होता. सम्राटास दूर करायचा तो एकच वैध मार्ग होता. "

"सदैव कपटनिती करणा-या सम्राटास मारायचे मात्र नितीमत्ता सांभाळून ? " एक तरूण संतापून म्हणाला..

त्याला थांबायची खूण करून वीर पुढे बोलू लागला : "एकदा सम्राट मृत्यूमुखी पडला असता की त्या गोंधळाचा फायदा घेऊन किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही पुढची योजना होती. सम्राटाची जुलमी राजवट नापसंत असलेल्या लोकांची मदतही त्या मोक्याच्या क्षणी अपेक्षित होती.. पण.. पण सम्राटापर्यंत पोचण्याआधीच आपले दोन्ही प्रयत्न फसले !"

"होय" दुसरा एक योद्धा म्हणाला "दुस-या हल्ल्यामधे तर ह्या अरण्यापर्यंत येणारे एकमेव गुप्त भुयार वापरून जखमी अवस्थेत माघार घ्यावी लागली. आपला किल्ल्यातील शेवटचा हेरही पकडला गेला आणि ती गुप्त वाटही शत्रूला ज्ञात होऊन बंद केली गेली आहे"

हे भाषण ऐकून सर्व योद्धयांवर निराशेचे अदृश्य मळभ पसरले ! आजूबाजून अंधार मनात शिरला नि अजून गडद झाल्यासारखा वाटू लागला. मशालींच्या ज्योतीही अस्वस्थपणे फरफरू लागल्याचा भास होऊ लागला.

थोडी उसंत घेऊन तो वीर निग्रहाने पुढे म्हणाला "आता सर्व मार्ग संपले आहेत. त्यामुळे त्या राक्षसाचा थेट वध करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही !"

हे ऐकल्यावर काही आश्चर्योद्गार निघाले.

शेवटी, ब-याच जणांच्या मनातील शंका एका सरदाराने बोलून दाखवली "पण आपण ठरवले जरी तरी हे शक्य वाटत नाही. किल्ल्याच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. किल्ल्यात आपला एकही हेर उरलेला नाही. शासकाच्या देखरिखीखाली निष्णात योद्धे सम्राटाचे अहोरात्र संरक्षण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे दोन फसलेल्या हल्ल्यांमुळे शत्रू अधिकच सावध झालेला आहे !"

"होय ! मला कल्पना आहे" वीर म्हणाला "ह्यासाठीच मी अंतिम योजना तयार केली आहे.. सम्राटावर तिसरा आणि शेवटचा हल्ला !!"

वीराच्या ह्या उद्गारांनंतर तिथे एकच खळबळ माजली. पुन्हा हात वर करुन सर्वांना शांत करत वीर पुढे सांगू लागला :

"सम्राट शक्यतो किल्ल्यात राहूनच कारभार करत असला तरी दरवर्षी हमखास एका दिवशी किल्ल्याबाहेर येतोच येतो. तुम्हा सर्वांना माहित असेलच की संथाममधे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे किल्ल्याबाहेरच्या शिळेला म्हणजेच त्यांच्या देवतेला विविध वस्तूंनी भरलेला घट सम्राटाने अर्पण करणे... ती शिळा म्हणजेच संथामची संरक्षक देवता आहे असा लोकसमज आहे.. एरवी लोकांना तुच्छ लेखणा-या सम्राटालाही त्या लोकश्रद्धेचा अनादर करुन चालत नाही एव्हढे त्या समारंभाला पारंपारिक महत्व आहे. तर त्या समारंभाच्याच दिवशी... "

"व्यत्ययाबद्दल क्षमा असावी " वीराच्याच समोर उभा असलेला एक कृश वृद्ध म्हणाला "पण तुम्ही योजना सांगण्याआधीच माझी एक शंका आहे"

वीराने मान डोलावून संमत्ती देताच तो अनुभवी मुत्सद्दी पुढे बोलू लागला " संथामचा राज्यकर्ता जरी सम्राट असला तरी सर्व कारभार व कारस्थानांमागील चातुर्य आणि योजना मात्र शासकाची असते असाच समज आहे.. आणि तो बराच खराही आहे. मला वाटते, आपण जर निकराचा हल्ला करणारच असू तर तो शासकावरच करावा !"

पुन्हा एकदा तिथल्या लोकात कुजबूज सुरु झाली... उलटसुलट मते आपसात मांडली जाऊ लागली..

आपल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ तो वृद्ध सांगू लागला "हत्तीवरील अंबारीतील योद्ध्याशी लढायला जर आपल्या सैन्याला जड जात असेल तर, त्या हत्तीच्या माहुतालाच कंठस्नान घालावे ! ... तसे केल्यास अंकुश न राहिल्याने हत्ती अंदाधुंद होतो आणि मग अंबारीतला योद्धाही निष्प्रभ होतो.. अशा वेळी त्याचा पराभव करणे खूपच सोपे जाते ! मला काय म्हणायचे आहे ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच ! "


वृद्धाचे बोलणे ऐकून वीराने क्षणभर विचार केला आणि त्याच्या चेह-यावर स्मित पसरले..

तो म्हणाला "महाशय, तुमचा मुद्दा अतिशय तर्कशुद्ध आहे ह्यात शंकाच नाही. पण युद्धशास्त्रातल्या ह्या डावपेचाचा ह्या परिस्थितीत थेट उपयोग होईल असे वाटत नाही ! शासकाचा मृत्यू घडवला तरी सम्राटाची दहशत एव्हढी आहे की तो जिवंत असेपर्यंत, त्याच्या विरोधात असणारे पण नाईलाजाने त्याच्या बाजून लढणारे सरदार आपल्याला मदत करणार नाहीत. अशा परिस्थिती सम्राटाचे निष्ठावान सरदार आपला सहज पराभव करतील.. परंतु ह्यापेक्षाही महत्वाचे कारण आपल्याला माझी पूर्ण योजना ऐकल्यावर कळेलच... "

.. मध्यरात्र उलटून गेली होती.. वीर शांतपणे योजना सांगत राहिला.

त्याच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर कुणाचाच अविश्वास नव्हता. पण...

शांततेने व सन्मानाने जगण्याची ती शेवटची संधी होती. सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी होणे आता अत्यंत आवश्यक बनले होते !

क्रमश:


भाग १





May 25, 2008

तिसरा हल्ला ! - भाग १

तो काळ कुठला होता.. कोण जाणे.

मनाच्या वेगाने भूतकाळात प्रवास केलात किंचीत तर त्या आसपासच केव्हातरी.

पण तेव्हाही मानव असाच होता. आजच्यासारखाच. महत्वाकांक्षी, पराक्रमी, उपद्व्यापी, लोभी, तामसी. देहाने थोडा मोठा पण आकार तोच. आणि विकारही तेच.. आणि त्या देहात गुणावगुणांचा विसंगत संगम घडवणारे मानवी मनही तसेच !

...

त्या दिवशी सायंकाळी...


बेभान वारा भयाण आवाज करत होता, बेफाम वेगाने धुळीचे लोटच्या लोट उठवत होता.. त्या वा-याच्या वेगाला न जुमानणारा 'संथाम' च्या राजधानीचा प्रचंड किल्ला बुलंद दिसत होता. गेली कित्येक वर्षे अंगावर ओरखडाही उठता तो तसाच ठामपणे उभा होता. रोजच्याप्रमाणे आजही त्याच्या राक्षसी भिंती तापवून सूर्याची किरणे आता निवत चालली होती. खंदकातल्या तापलेल्या पाण्यात राहून खवळलेल्या मगरीही काहीश्या शांत होत होत्या.

किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने विस्तिर्ण असे मोकळे पटांगण होते. उत्तरेकडे किल्ल्याजवळ बाणाचा मारा पोचेल इतक्या अंतरावर कुठल्यातरी देवतेची मूर्ती होती. मूर्ती कसली, निसर्गाच्या चमत्काराने मानवी आकार प्राप्त झालेली एक मोठी शिळाच. किल्ल्याच्या एकूण आकाराच्या मानाने ती दगडी मूर्ती अगदीच नगण्य दिसे. परंतु, उत्सवाच्या दिवशी किल्ल्याइतकेच किंबहुना जास्तच महत्व त्या दगडाला येत असे.

पूर्वेकडे काही अंतरावरच एक भयंकर अरण्य सुरु होत होते, आणि तिथेच संथामचे अतिसामर्थ्यशाली राज्य संपत होते.

त्या सायंकाळी.. त्या अरण्याच्या दिशेला किल्ल्याच्या एका झरोक्यातून पाहत एक व्यक्ती उभी होती..

सम्राट !

संथामचा सर्वेसर्वा सम्राट ! घोर पराक्रमी सम्राट. कुशल सेनानी सम्राट.. आणि दुर्दैवाने अत्यंत क्रूर सम्राट !

आता काही वेळातच अंधाराचे साम्राज्य सुरु होणार होते.. पण, दिवसा मात्र त्या विशाल भूमीवर फक्त सम्राटाचे राज्य असायचे. संथामच्या म्हणजेच सम्राटाच्या आक्रमणापासून आत्तापर्यंत वाचलेली, तुरळक छोटी राज्ये होती पण अगदीच नगण्य. दुर्गम भुगोलामुळे थोडी अधिक सुरक्षित राहिलेली. पण सम्राटाच्या राज्याच्या विषारी छायेत भयग्रस्त. कधी आक्रमणाचा सर्प सीमा ओलांडून त्यांना गिळंकृत करेल ते सांगता येत नव्हते.

किल्ल्याच्या पूर्वेला अरण्य असल्याने त्या सीमेच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे तिथे संरक्षणासाठी अगदीच कमी सैन्य तैनात असे. अर्थात संथाम वर हल्ला करून आपल्याच मृत्यूला आमंत्रण कोण देणार !

त्या भयंकर अरण्याच्या आतील काही भागात सूर्यप्रकाशही पोचू शकत नसे. हिंस्र पशूंचा मुक्त वावर, आणि वाट चुकल्यावर जन्मभर त्या अरण्यातच फिरत रहाण्याची भिती अशा कारणांमुळे त्या बिकट रानात पाऊलही टाकण्याची कुणाची छाती होत नसे.

अगदी सुरवातीच्या भागात लाकूडतोड चाले.. तीही दिवसाच.

त्या सायंकाळी किल्ल्यातल्या त्या सर्वात उंच दालनातल्या झरोक्यातून, अरण्याच्या दिशेहून परतणारे काही लाकूडतोडे पाहत सम्राट उभा होता. त्याच्या मजबूत देहावरची अत्यंत उंची राजवस्त्रे आत पोचणा-या वा-याने फडफडत होती. शांतपणे बाहेर बघणा-या सम्राटाच्या मनात मात्र खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विलक्षण घटनांचा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी येऊन उभे राहिल्याचे सम्राटाला जाणवले.

सम्राटाने मागे वळून बघितले आणि त्या व्यक्तीला पाहून ब-याच वेळाने त्याच्या मुखावर स्मित उमलले.

"शासक ! वेळ झाली का ?"

"होय सम्राट ! भोजनाची वेळ झाली आहे. सेवक तयार आहे" नेहमीच्या शांत धीरगंभीर आवाजात शासक म्हणाला.

सम्राटाने क्षणभर समाधानाने शासकाकडे पाहिले.

शासक. संथामचा प्रधान ! सम्राटाच्या सर्व कटकारस्थानांमागचा मेंदू. सम्राटाच्या अनेक क्रूरकृत्यांचा साक्षीदार. अत्यंत धूर्त, कारस्थानी. तितकाच संशयी. पण त्याच्या ह्याच गुणामुळे इतर अनेक महत्वाच्या जबाबदा-यांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सम्राटाने त्याच्याकडे दिली होती : सम्राटाच्या सुरक्षेची !

शासकानेही त्या कामी सर्व बुद्धी पणाला लावली होती. सम्राटाचा संपूर्ण दिनक्रम जास्तीत जास्त वेळ किल्ल्यात सुरक्षित बसून कसा व्यतीत होईल अशी योजना शासकाने तयार केली होती. सम्राटावर हल्ला होण्याच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन खास सुरक्षित दालने आणि वेगवेगळी शस्त्रे असलेल्या निष्णात योद्ध्यांची खास पथके तयार करण्यात आली होती. सम्राटाचे संरक्षण ही एकमेव कामगिरी त्यांच्यावर होती.

एव्हढ्या योजनेनंतरही, याशिवाय अजून एका प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होतीच... आणि ती म्हणजे सम्राटाला कपटाने होऊ शकणारा विषप्रयोग !

पण ह्यावरही शासकाने एक युक्ती केली होती : सम्राटाच्या भोजनाआधी एक विशिष्ट सेवक त्या अन्नातील भाग वेगळा काढून त्याचे सेवन करत असे. दररोज तोच सेवक ! खुद्द सम्राटाने त्या सेवकाला धडधाकट पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. ही सर्व बुद्धी शासकाचीच. संशयाला जागा नको म्हणून त्या विश्वासू सेवकाची निवडही खुद्द त्यानेच केली होती.

इतकी काळजी घेऊनही, कडेकोट बंदोबस्त असूनही गेल्या काही दिवसांत सम्राटावर दोन हल्ले झाले होते !!

सम्राटाच्या सुदैवाने.. दोन्ही वेळेला ते साफ फसले होते. पण त्या घटनांनी सम्राटाची जणू झोप उडाली होती. क्षुल्लक कारणांवरून लोकांना अतिशय सहजपणे क्रूर शिक्षा देणारा सम्राट स्वत:च्या जीवावर बेतल्यावर अत्यंत अस्वस्थ बनला होता. मृत्यूच्या कल्पनेने त्याच्या कठोर ह्रुदयाचे ठोके जलद होत होते. स्वत: शूर असूनही अचानक होऊ शकणा-या हल्ल्याच्या कल्पनेने त्याचे सर्वांग घामात भिजत होते. त्याचा एकमेव आधार होता शासक !

त्या परिस्थितही विचलित न होता शासक काम करत होता. आणि म्हणूनच शासकाकडे पाहत सम्राट त्या सायंकाळी सम्राट काहीसा निर्धास्त झाला.. धीम्या गतीने पावले टाकत तो दालनाकडे जाऊ लागला. शासकही अदबीने त्याच्या मागे चालू लागला.

...

सम्राटासमोर आता तो सेवक उभा होता. त्याने अन्न ग्रहण केल्यानंतर आता बरोबर दोन प्रहर उलटून गेले होते. सेवकाने दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून सम्राटाला अभिवादन केले. त्याही मन:स्थितीत सम्राटाची मग्रूरी काहीशी उफाळून आली आणि काहीश्या थट्टेच्या सुरात तो सेवकाला म्हणाला "आमचे खास भोजन तुझ्या देहाला अगदी मानवलेले दिसत आहे. तुझी कांती आता अगदी सतेज झाली आहे."

शासकाने मंद स्मित करुन त्या सेवकास जायची आज्ञा केली. तो धिप्पाड सेवक नम्रपणे मागे सरत दालनातून निघून गेला. तो जाताच शासक अदबीने म्हणाला "सम्राट ! आपण भोजन घ्या. त्यानंतर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचे आहे ! ".


त्याच वेळी...


(क्रमश:)


Dec 16, 2007

अघटित ! (कथा)

“Love people, use things.. Not vice versa !” - Kelly Ann Rothaus

माणसांवर प्रेम करा नि वस्तू वापरा. माणसांना वापरू नका !

तुम्हाला आवडतात अशी वाक्यं ? ब-याच लोकाना आवडतात ! मग लक्षात ठेवून अशी वाक्य ते डायरीत टिपून ठेवतात. कधी सहज उघडून वाचण्यासाठी.

शिवाय एखाद वेळी, एखाद्या विशेष संभाषणात ही अशी वाक्य मिसळायला छानंच वाटतं. काहीना अशी वाक्य नुसती वाचून, लिहूनही समाधान वाटतं एक प्रकारचं... म्हणजे माणूस म्हणून आपली वाढ झाली आहे, एक प्रकारची परिपक्वता आली आहे... असंच काहितरी !



***

राजेशचा मूड आजकाल सकाळी सकाळी पार बिघडलेला असायचा..

आजही तेच झालं.

त्याचा चेहरा त्रासलेला.. आक्रसलेला असा. दातओठ खात त्याच्या कॉटलगतच्या भिंतीकडे बघत होता.

भिंतीवरच्या त्या घड्याळाकडे !

राजेश जितका चिडला होता तितक्याच शांतपणे भिंतीवरचं ते घड्याळ वेळ दाखवत होतं.. टिक टिक.. त्याचे निरस, निष्प्राण तास नि मिनिट काटे.. संथ लयीत काम करणारा सेकंद काटा.. त्याचा टिक टिक आवाज… तो आवाज शांत वेळी रुममधे स्पष्ट ऐकू यायचा, मोठा वाटायचा. …

टिक टिक टिक टिक.. आवर्तन चालूच होती..

साडेसात ! ठण्ण…

का ? का होतात रोज साडेसात? होतात तर होतात, हे घड्याळ का दाखवतं बरोबर वेळ?

राजेश झोपायचा त्या लोखंडी कॉटला लागून असलेली भिंत इतर भिंतीसारखीच खरबरीत पोपडे उडालेली.. तिच्यावर साधारण चारएक फुटावर एक आडवी फळी ठोकलेली होती. त्यावर काही फुटकळ सामान होतं.. आणि त्या फळीच्या थोडं वर दोन फुटावर ते जुनाट घड्याळ !

त्याने रुम भाड्याने घेतली तेव्हा जुजबी फर्निचरशिवाय फक्त हे घड्याळ होतं तिथं. अर्थातच घरमालकाच्या दृष्टीने अगदीच टाकाऊ. असून नसल्यासारखं.. म्हणूनच त्याने काढून नेलं नव्हतं बहुतेक.

ते एव्हढं जुनं अजूनही मागे पडत नव्हतं, म्हणून टाकून दिलं नव्हतं एव्हढंच. बरं एखादा सुंदर नमुना असता तर ऍंटीक पीस म्हणून तरी किंमत आली असती कदाचित, पण हे होतं अगदीच मामुली. त्यावर कसलीही कलाकुसर नाही कि रंगसंगती नाही. अगदी रेल्वे प्लॅटफॊर्मवरच्या घडयाळासारखं दिसणारं. पांढ-या वर्तुळावर काळे बोजड आकडे नि भाल्यांचे पाते वाटावेत असे मोठे टोकदार काटे…

त्या घड्याळाचा निर्जीव तटस्थपणा राजेशला आवडायचा नाही.

आपली कंटाळवाणी नोकरी, रोज सकाळी लोकल पकडून वेळेत पोचताना होणारी आपली तारांबळ, ऑफिसमधलं मलूल वातावरण.. हे असं वेळापत्रकात अडकलेलं आपलं आयुष्य.. आहे ह्या मद्दड घड्याळाला ह्याचं काही ?

आपल्या मजबूरीची ते घड्याळ जणू मजा बघतं अस राजेशला राहून राहून वाटायचं.. एखाद्या गुलामाला भाले टोचून त्याला पुन्हा एखाद्या अतिश्रमाच्या कामावर लावावं तसं ते घड्याळ आपले काटे टोचून टोचून आपल्याला हैराण करतं आहे अशी स्वप्नही कधी त्याला पडायची ! मग त्या टिकटिकीतून त्याला ते जणू ऐकू यायचं : ‘उठ ! आवर भराभर. साडेसात झाले. चल ! हात उचल.. आठ दहाला डबा भरून तयार नसेल तर गेली आठ सव्वीस ची लोकल !’ असंच काहीसं.

आजही राजेश आपल्या भकास आयुष्यावर चरफडला.. जणू सगळी त्या घड्याळाचीच सगळी चूक असल्यासारखं त्याने पुन्हा एकवार त्याकडे बघितलं… ..

आणि काहितरी पुटपुटत पांघरूण बाजूला भिरकावून तो उठला..


***

त्याच दिवशी दुपारी..

मुंबईतल्या एका पॉश एरियातली एक चकचकीत इमारत.

तळमजल्याला जाड काचेचं दार असलेलं ऑफिस. आत थंडगार वातावरण. बाहेरच्या उन्हाच्या झळा, रहदारी, गर्दी ह्यापासून सुरक्षित नि अलिप्त.

त्या थंड वातावरणात गुबगुबीत खुर्चीत आपला सुटलेला अवाढव्य देह कोंबून एक माणूस बसला होता. बरंच टक्कल पडलेला.. पण त्याची भरपाई म्हणून की काय मागे बरेच लांब केस वाढवलेला.. त्याने लावलेल्या महागड्या सेंटचा उग्र वास त्या कृत्रीम थंडीत मिसळत होता… त्याचा तो केशरी कलरचा भडक शर्ट जेमतेम त्याच्या पोटाचा घेर झाकू शकत होता.

पुन्हा एकदा त्याने फोन टेबलावर आपटलान आणि एक शिवी हासडलीन.. गेल्या एका मिनिटात तिस-यांदा अस होत होतं बहुतेक.

त्याच्या समोर टेबलापलिकडे बसलेला एक किरकोळ माणूस हसून म्हणाला “अरे केसव भाई, कायको अश्रफ का गुस्सा फोन पे निकालता है. पैसे तर त्याला द्यावेच लागतात ना..”

पण त्या टकलू माणसाचं तिथे फारसं लक्ष नव्हतं.. हातातल्या मोबाईल फोनकडे पुन्हा खुन्नस देऊन तो म्हणाला “इसकी तो.. साला चालीस हज्जार चा फोन चालत नाही. रेंजच येत नाही. हे बघ.. बघ ! आता अश्रफचा फोन आला तर त्याला वाटेल मी मुद्दाम कट करतोय..”

“केसव अरे रेंज नाही तर फोनची मिस्टेक काय त्यात ? वो कंपनी को बोलो ना..”

तेव्हढ्यात मोबाईल वाजतो. कुठ्ल्यातरी नवीन पिक्चरमधलं सवंग ‘आयटम सॉंग’ रिंगटोन म्हणून वाजू लागतं. त्या लहान ऑफिसमधे तो आवाज खूपच मोठा वाटतो. पण तो माणूस उत्तर देणार एव्हढ्यात फोन बंद पडतो !

पुन्हा एकदा तो चरफडतो. चिडून अजून दोन चार वेळा फोन आपटतो !

त्या फोनच्या कडा आपटून आपटून घासल्या गेल्या आहेत.. कडांच्या रंगाचं कोटींगही निघाले आहे. पण त्या माणसाला त्याची विशेष पर्वा नाही..

‘xxx की ! अब गया मै ! आता अश्रफचा मगज सरकला असणार.. मीच त्याला सांगितल होतं की मी कदाचित ऑफिसमधे नसेन, तर लेंड लाईन मधे नको.. मोबाईलवरच कर फोन..”

हताश होऊन तो मोबाईल पुन्हा जोरात आपटतो आणि टेबलावर भिरकावतो.

त्या फोनच्या सुंदर मॉडेलची आपटून आपटून पार रया गेली आहे. तो मोबाईल बिचारा निपचित पडून रहातो. पुन्हा उचलून आपटले जाण्याची वाट पहात..

त्या दोघांचे संभाषण चालूच रहाते…



***


राजेश पहिल्यापासून त्याच्या रुमवर एकटाच राहतो.

म्हणजे आईवडील सोलापूरला असतात. कुणी रुममेटही नाही. आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे बरोबर कुणी टिकणं शक्यही नव्हतं.. शिक्षण चालू असताना हॊस्टेलवर रहात असताना त्याच्याच लक्षात आलं होतं की आपलं सहज कुणाशी पटणार नाही. त्यामुळे पैसे वाचण्याची शक्यता असूनही त्याने भाड्याची रुम शेअर करण्याविषयी विचार केला नव्हता.

आपण चिडचिड करतो म्हणून एकटं रहाव लागतयं, का एकटं रहातोय म्हणून जास्तच चिडचिड करतो हे कधीकधी त्यालाच कळेनासं व्ह्यायच !

एकटाच रहात असल्याने बोलायला कुणी नाही. कोणाशी बोलणार ?

रुमवर भकास शांतता. फक्त डोक्यावर ते घड्याळ आणि त्याची ती अव्याहतपणे चाललेली टिकटिक !

आपण इतके धुसफुसतो, चिडून बोलतो.. एखादा माणूस असता तर आपलं काम थांबवून आपल्या बोलण्यावर काहीतरी तर प्रतिक्रिया दिली असती. अगदी उलट चिडून बोलला असता तो माणूस तरी परवडल असतं.. पण हे घड्याळ नको.

मालकाचं नसतं तर उचकटून फेकून दिलं असतन त्याने ते घड्याळ !

त्या दिवशी रात्री तो कामावरून परत आला.. त्याचं डोक पार उठलं होतं ऑफिसमधल्या कटकटीनी..

जेवून कॉटवर अंग टाकल्यावर त्या घड्याळ्याच्या टिकटिकीने हैराण झाला अगदी..

आणि मग एखाद्या भ्रमिष्टासारखा त्या घड्याळाला बोलू लागला तो.. एखाद्या माणसाशी भांडावं तसं.. अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली त्याने.. आणि मग एकदम निर्वाणीचं, निश्चयाने तो म्हणून गेला: “बास ! आता फार झालं.. उद्या सकाळी उचकटून फेकून देतो तुला.. पार गच्चीवर जाऊन खाली टाकतो.. तुकडे तुकडे होतील तुझे. तिच्यायला.. दिवसरात्र टिकटिक.. टिकटिक..”

आणि.. एकच सेकंद !

एकच सेकंद ते घड्याळ थबकल्याचा त्याला भास झाला.. अर्थात, भासच असणार ! कारण राजेशच्या धमकीने काळजाचा ठोका चुकायला ते घड्याळ काही जिवंत नव्हतं.

हे असंच काहीसं बरळत राजेश केव्हा तरी झोपून गेला…

अर्थात तो झोपला तरी घड्याळाचं काम चालूच होतं.

टिक टिक.. टिक टिक..



***


मुंबई असली तरी दोन वाजलेले असल्याने तुलनेने ब-यापैकी शांतता…

त्या आलिशान फ्लॅटची लिव्हींग रूममधे मंद झिरपणारा चंद्रप्रकाश. काचेच्या एका मोठ्या सेंटर टेबलवर पडलेला एक मोबाईल… मॉडेल नवीन आहे पण.. त्याच्या कडांचा रंग काहीसा घासला गेला आहे !

रात्रीच्या शांततेत तो मोबाईल एकदम किंचाळून वाजल्यासारखा वाजू लागतो.

तेच ते आयटम सॊंग ! तोच रिंगटोन. रात्रीच्या शांततेत तो अजूनच कर्कश वाटतो.

काही सेकंद जातात..

एक खूप जाडसा मनुष्य अडखळत लिव्हींग रुम मधे येतो. टक्कल पडलेला.. मानेवर लांब केस वाढवलेला. त्याच्या फुगलेल्या पोटावर ताणला गेलेला टीशर्ट आहे नि खाली शॉर्टस आहे. पोटापर्यंत आलेली गळ्यातली सोन्याची जाड साखळी मधेच अर्धवट प्रकाशात चमकते आहे.

तो काहीसा अडखळत चालतोय. बहुतेक तो अर्धा झोपेत आहे आणि अर्धा नशेत.

मोबाईल किंचाळतोच आहे.

शेवटी त्या आवाजाने किंचीत सावध होत तो माणूस मोबाईलपर्यंत पोचतो आणि एकदम त्याला धडधडायला लागतं…

अश्रफचा फोन असेल ?

तो नंबर बघतो.. आश्चर्य म्हणजे कुठलाच नंबर नाहीये. नुसताच फोन वाजतोय.

तो थरथरत्या हाताने फोन उचलतो.

‘हालो’ तो काप-या आवाजात म्हणतो.

‘केशव भगनानी !’

तो आवाज ऐकल्यावर भगनानी एकदम दचकतो. हा अश्रफचा आवाज नाही. त्याच्या गॅंगमधल्या कुणाचाही नाही. हा माणसाचा वाटतच नाहीये आवाज.. पण फार खतरनाक आहे. जणू मृत्यूनेच हाक मारली आहे !

पण तरीही… तरीही आपल्या ओळखीचा का वाटतोय ?

‘क.. कोण?’ भगनानीच्या तोंडाला कोरड पडलीये. आता छातीवर मणाचं ओझं ठेवल्यासारखं विलक्षण दडपण आलंय !

“मी बोलतोय !

कोण बोलतय ते कळत नाहीये. पण… तरीही थोडं लक्षात येतंय.
भगनानीला छातीत एकदम कळ आल्यासारखं होतं. हा.. हा आपल्या मोबाईलचा आवाज आहे ?

नो ! नॉट पॉसिबल !

हा आपला फक्त भास आहे. एक भयंकर भास.

तो छातीवर डाव्या बाजूला हात दाबतो..

“आता तू पुन्हा मला कधीच आपटू शकणार नाहीस ! फेकू शकणार नाहीस !”

आपण काय ऐकलं, बरोबर ऐकलं का ते भगनानीला कळत नाही.. पण तो हबकतो.. त्याच्या छातीतली कळ एकदम वाढते.. वाढतच जाते.

… आणि हळूहळू तो खाली कोसळतो.



***


तर.. आपण बोलत होतो त्या वाक्याबद्दल !

ह्या वाक्यातला साधा संदेश एव्हढाच की माणसांवर प्रेम करायच असतं. त्याना स्नेह, आदर, ममता, मित्रत्व अशा सुंदर भावनांनी जोडायच असत.. सुखाची आणि यशाची नवनवीन शिखरं गाठायला एखाद्या शिडीसारखी वापरायची नसतात माणसं !

कारण माणसं म्हणजे काही वस्तू नाहीत ! वापरायला नि वापरून फेकून द्यायला. ती आहेत जिवंत, हाडामासाची, भावभावना असलेली माणसं !

.. आणि वस्तू ?

वस्तूंचं काय ?


***


इन्स्पेक्टर मानकामे आज खूप चिंताग्रस्त चेह-याने बसले होते..

समोर असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची नजर फिरत होती. पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्टस वगैरे. त्यांच्या दहा वर्षांच्या अनुभवात एकाच दिवशी अशा विचित्र केसेस कधी आल्या नव्हत्या.

मानकामे त्या माहितीतली सुसूत्रता शोधण्याचा प्रयत्न करत होते..

नाव: राजेश चौबळ
वय : २९ वर्षे
मृत्यूची वेळ : रात्री सुमारे २.३०
मृत्यूचे कारण: ...


भयंकर ! रात्री कसल्यातरी धक्याने भिंतीवरचे घडयाळ खिळ्यापासून निसटले असावे. ते अगोदरच सैल झालेले असणार. आधी ते खिळा आणि कॉट यांच्यामधे असलेल्या फळीवर आदळले असणार. त्या जुन्या घड्याळाचे भाग तुटून वेगवेगळे झाले आणि मग ते काहीसे अवजड घड्याळ थेट राजेशच्या डोक्यात पडले. तरीही तो कदाचित वाचला असता पण विचित्र रितीने घड्याळाचे मोठे आणि अणकुचीदार दोन काटे एखाद्या हत्याराच्या पात्यासारखे त्याच्या गळ्यात आणि छातीत घुसले. तेच त्याच्या मृत्युचे कारण आहे.

विचित्र मृत्यू आहे अगदी !


नाही, म्हणजे घड्याळ पडू शकतं निसटून.. पण अगदी एखाद्याने मुद्दाम खुपसावेत तसे ते काटे त्याच्या शरीरात घुसणं म्हणजे... हॉरिबल !

जुजबी चौकशीत तरी राजेशची कुणाशी दुश्मनी असल्याचे काही समजले नव्हते.. त्यामुळे 'विचित्र अपघात' अशीच नोंद करावी लागणार बहुतेक..

आणि ही दुसरी भगनानीची केस !

केशव भगनानी
वय : ४७ वर्षे..

पुढे वाचायची गरजच नाही.. माहिती आहे चांगलाच. बी ग्रेड पिक्चरचा हा फायनान्सर. त्यासोबत नाना धंदे आणि लफडी. दोन वेळा ह्याला आपणच वॉर्निंग दिलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची डिपार्टमेंटची खात्रीच आहे!

खर म्हणजे हा भगनानी एक दिवस जायचाच होता.. पण कसा ? तर त्याच्या ऑफिसवर भाडोत्री गुंडांचा अंदाधुंद गोळीबार.. त्याच्या ऑफिसच्या काचेच्या दरवाज्याचा चक्काचूर.. आणि रक्ताच्या थारोळ्यात आत पडलेला भगनानी.

हे असच काहीतरी होणार होतं एक दिवस..

काल भगनानी गेलाच… पण हार्ट फेलने !

रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर कॉल आला एव्हढंच आठवत त्याच्या बायकोला. तो उठून फोन घ्यायला गेला आणि ब-याच वेळाने तिला जाग आली. बाहेर येऊन पहाते तो जमिनीवर पडलेला. निष्प्राण ! जोरात ऍटॅक आला असणार त्याला. हाक मारायचीही संधी मिळाली नसणार.

आधी वाटलं की, त्याला धमकीचाच फोन आला असणार…

पण तेच फार विचित्र आहे ! कारण…


कारण त्याला रात्री अकरा नंतर कुणीच फोन केलेला नाही फोन कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे ! दोनदा रिपोर्ट मागवून खात्री केली आपण…

मग… त्याचा मोबाईल वाजलेला त्याच्या बायकोने ऐकला कसा ? त्याचा मोबाईल वाजलाच कसा ?

विचारात असतानाच मानकामेनी घडयाळात पाहिलं.. दोन सतरा ! बरीच रात्र झाली… आता घरी जायला हवं..

दुस-या ऑफिसरला चार्ज देऊन मानकामे बाहेर आले. दोन कॉन्स्टेबल बसून आपसात आरामात कुजबुजत होते ते एकदम सरळ झाले. मानकामेनी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलं करुन, पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या आपल्या जुन्या मोटरसायकलकडे पाहिलं..

आणि त्यांच्या चेह-यावर लगेच त्रासिकपणा आला.

..अगदी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोनचार किक्स मारुनही मोटरसायकल चालू होईना.

xxx तिच्या.. आता साताठ वर्ष झाली वापरतोय साली ही मोटरसायकल. आधी नीट चालायची.. आता गेल्या काही दिवसातच फार त्रास देते आहे. नवी घेऊ शकतो की आपण स्वत:च्या पैशातून.. अगदी सहज. पण मग डिपार्टमेंटच्या डोळ्यात लगेच येतं आजकाल ..

नेहमीप्रमाणे सुरू होईचना तेव्हा शेवटी तडकून त्यानी मोटरसायकलला दोन चार लाथा मारल्या !

.. अजून दहा मिनिटानंतर, मानकामे अगदी घामाघूम झाल्यावर, ती एकदाची चालू झाली..

मानकाम्यानी मग पुन्हा एकदा तिला एक शिवी हासडली… आणि रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानी ती जुनी मोटरसायकल अगदी भरधाव सोडली.



***

हं.. वस्तूंचं काय ?

दचकू नका.. बरोबरच आहे तुमचं ! वस्तूंचं काय एव्हढं ? त्या फक्त हव्या तश्या वापरायच्या. बिघडल्या, तर दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. ते शक्य नसेल तर सरळ फेकून द्यायच्या.. आणि त्या जागी नवीन वस्तू आणायच्या ! ..कदाचित अजूनच उपयोगी आणि वापरायला सोप्या.

फारतर एखाद-दुसरी वस्तू आठवण म्हणून जपून ठेवायची. बास ! एव्ह्ढाच काय तो अपवाद !

बरोबरच आहे अगदी.. वस्तूंचं त्यांचं आयुष्यच मुळी माणसांच्या उपयोगासाठी. अर्थात, आयुष्य कशाला म्हणायच म्हणा.. निर्जीव निष्प्राण वस्तू त्या !

पण तुम्ही एखाद्या वेळेस वैतागलात आणि..

अं.. समजा, तुमचा कॉम्प्युटर प्रतिसाद द्यायचा बंद झाला, म्हणून किबोर्डच्या किज रागारागाने आपटून आपटून वैताग व्यक्त केलात.. किंवा टिव्हीवर सगळीकडे नुसते भिकार कार्यक्रम आहेत असं पाहून, कंटाळून अक्षरश: रिमोट फेकून द्यावासा वाटला.. एखाद वेळी दिलातही फेकून !

फार कशाला, नीट ठिणगी न पाडणा-या स्वयंपाकघरातल्या साध्या लायटरवर भडकलात आणि दातओठ खात ओट्यावर आपटलात तो दोनचार वेळा ..

तर ?

तर काय ? त्या निर्जीव वस्तू काय करणार... निमूटपणे तुमचं वागणं सहन करण्यापलिकडे !

पण.. काही सांगता येत नाही ! आता कल्पना करा ना.. मानकामे भरधाव निघाले त्यांच्या मोटर सायकलला शिव्या घालत घालत..

पण समजा, मोटरसायकल १०० च्या स्पीडला असताना एखाद्या मोक्याच्या क्षणी अगदी अनपेक्षितपणे हॅंडल लॉक झालं .. किंवा त्यांनी दाबला नसतानाही जर अचानक करकचून ब्रेक लागला तर ?

.. तर काय होईल त्यांचं ? राजेश किंवा भगनानीसारखंच काहीतरी ??? नक्कीच !

छे ! कल्पनाही करवत नाही…

म्हणून आपलं सहज सांगावस वाटलं...

Love people.. and if possible, love things too !

माणसांवर प्रेम करा.. आणि जमलंच तर.. निर्जीव, निष्प्राण वस्तूंवरही !


*****


Sep 11, 2007

सोनेरी पाणी ! (कथा)

बाहेर अंधार...

रातकिड्यांची मंद किरकिर..

मधूनच प्रकाश मिचकावणारा एखादा काजवा.

घरातही तसा अंधारच. पलिकडल्या देवघरात निरंजनाची मधूनच फडफडणारी ज्योत.. चित्रविचित्र आकाराच्या हलत्या सावल्या तयार करणारी.

आणि इकडे माझ्यासमोर टकमक डोळे करुन माईंची गोष्ट ऐकणारी बच्चे कंपनी.


रोजच्यापेक्षा हे किती वेगळं आहे.

पण छान वाटतयं... भाऊकाकांच्या कोकणातल्या घरात मी सारखा तोच विचार करत होतो..बरं झालं आलो इथे ते..


नाहीतर... वीकेन्ड रमाणीच्या कॉकटेल पार्टीमधे गेला असता. आधी त्याचे शंभर वेळा फोन! त्याच त्या गप्पा. शेअर बाजारच्या आणि त्याला मिळालेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टच्या. आता फोनवर बोलायचे तेच पार्टीमधे ! मग फोन कशाला ?


मग 'हेजी, आपको तो आनाही है. पार्टीमे रौनक आत्ती हे' वगैरे. साला प्रत्येकाला हेच ऐकवत असेल. कंटाळा कसा येत नाही त्याला ? रौनक कसली लुच्च्या. आधी तुझे ते महागडे मंद दिवे बदलून टाक. मग येईल हवी तेव्हढी रौनक. साला बत्ती लावून उदबत्ती एव्हढा प्रकाश.


पण इथे.. ह्या अर्धवट अंधारातही चांगलं वाटत होतं.. मी वाचण्यापुरता लहान दिवा लावला होता. समोर माई पाचसहा मुलांना गोष्टी सांगण्यात तल्लीन झाल्या होत्या..

खरंच बरं झालं अविदादाला 'हो' म्हटल ते ! म्हणाला "कोकणात घेउन जातोय पोराना नाताळच्या सुट्टीत. गजाची फॅमिली पण आहे.. मग बॅचलर साहेब ? येताय का तुम्ही पण आमच्याबरोबर ? का निता बरोबर काही प्रोग्राम आहे ? नाहीतर पार्टी ठरलेली असेल कुणाकडेतरी.. " वगैरे वगैरे. मग थोडं सणकीतच हो म्हटलं.. नको तेव्हा कुटुंब वत्सल वगैरे असल्याचे दाखवतो.

पण आत्ता माईंची गोष्ट ऐकताना खरचं मस्त वाटत होतं.. ह्या माई म्हणजे भाईकाकांच्याच नात्यातल्या कुणीतरी... लग्नानंतर सहा एक महिन्यातच विधवा झालेल्या. तो आघात त्याना अगदी कोलमडून टाकणारा असणार ! असंख्य संकंट आणि दु:ख अपमानाचे चटके सोसले मग माईंनी.. काकूंनीच मला एका सगळं सांगितलं होतं.. मग शेवटी भाईकाका-काकूंनीच त्याना आधार दिला.

मी असाच कधी गेलो की अगदी मायेने चौकशी करायच्या माई.. कधी कधी तर मुलांबरोबर चक्क माझीही दृष्ट वगैरे काढायच्या. आयुष्यभर झळा सोसूनही त्यांचा चेहरा मात्र नेहमी हसतमुख असायचा .. चेष्टा करायची लहर आली की मिष्किल बोलून दोन्ही डोळे मिचकावायच्या आणि बोळक्या तोंडाने छान हसायच्या.

आताही गोष्ट सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.. मी आपला बसलो होतो आरामात पुस्तक घेऊन.. 'मुंबईत वाचायला वेळच मिळत नाही' वगैरे सांगून. पण अंथरुणात पसरलेली पोरं आणि रंगवून गोष्ट सांगणा-या माई बघून पुस्तकात काही लक्ष लागेना. अमाप दु:ख पचवलेल्या माई आजी आणि सुखाची तडस लागलेली ती त्यांची बिननात्याची नातवंडं !

ब-याच दिवसानी गोष्ट वगैरे ऐकायला छान वाटत होतं.. नाहीतर आत्ता त्या बोअरिंग पार्टीमधे असतो.. मला त्या कृत्रिम वातावरणाचा कंटाळा येतो अगदी. साले कॉन्टॅक्ट्स सांभाळायला पण इतकी लफडी. गुदमरायला होतं अगदी .. त्यातल्या त्यात मला आवडायची ती त्याची टेरेस.. गार मोकळा श्वास घेऊ देणारी. त्या उंचीवरून शहराचे असंख्या लुकलुकणारे दिवे दाखवणारी..

मी बरेच वेळा पार्टी सोडून दूर पाण्यात त्या दिव्यांची सोनेरी प्रतिबिंबे हलताना बघत राहतो..

... आत्ताही एक काजवा दिसला आणि मला त्या दिव्यांची नि टेरेसची आठवण झाली.. माईंची गोष्ट पुढे चालली होती...

"आणि बरं का.." माई पुढे सांगत होत्या "एव्हढं बोलून तो काळा पक्षी गेला उडून एकदम.. आला तसाच भुर्रकन ! आणि उडत उडत आकाशात गायब झाला.. थोडा वेळ सगळेच अवाक झाले ! मग त्या राजाच्या गुरुदेवानी सांगितलं.. अरु ! अभ्रा चोखू नाही बाळ.. हां.. तर काय सांगत होते ? हां.. राजाचे गुरु म्हणाले की त्या पक्ष्याची भविष्यवाणी खोटी ठरवायची असेल तर.. "

"वाणी म्हन्जे काय माई" कुणाचातरी पेन्गुळलेल्या आवाजात प्रश्न आला.

"अरे वाणी म्हन्जे तो मॅन नाय का रे आपल्या कॉर्नरच्या शॉपमधे असतो तो. होय की नाही माई?" एक उत्तरही आले मुलांमधूनच.

"हा‍त्तुझी !अरे सोन्या माझ्या.. वाणी म्हणजे तस नाही.. भविष्यवाणी म्हणजे.. उद्या काय होणार ते आजच सांगितलं नाही का त्या काळ्या पक्षाने ? त्या पक्ष्याचे बोलणे कधी खोटे व्ह्यायचे नाही... आणि त्यानं ते काय भयंकर सांगितलं माणसाच्या बोलीत ? की .. राजा ! तुझ्या राजकन्येच्या एका पायाला सहा बोटे आहेत. ते सहावं बोटं गायब केल्याशिवाय हिचं लग्न करु नका नाहीतर.. "

"नाहीतर काय माई.."

"नाहीतर... " माई अडखळल्या " नाहीतर खूप खूप वाईट होईल. लग्नानंतर काही दिवसातच हिचा पती.. "

.. आणि अचानक माई थबकल्या ! त्यांची नजर पार हरवली कुठे तरी.

त्या तशाच शून्यात काही क्षण बघत राहिल्या..

मुलंही गोंधळून त्यांच्याकडे पहात राहिली..

"मग काय झालं माई ?" ह्या प्रश्नाने माई एकदम भानावर आल्या... त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी तरारल्यासारख वाटलं मला..

मग गडबडीने एकदम हसून त्या पुढे सांगू लागल्या. जणू काही काही क्षणांपूर्वी त्यांची तंद्री लागलीच नव्हती.. जणू काही गोष्टीतला तो 'खूप खूप वाईट' होण्याचा भाग घडणारच नव्हता कधी..

" बरं का.. मग काय झालं.. राजाच्या दरबारात एक मोठा जादूगार होता ! तो म्हणतो कसा "महाराज, ह्यावर एक उपाय आहे. इथून खूप लांब, राज्याच्या उत्तरेला, जंगलापलिकडे ओळीने सात पर्वत आहेत. त्या प्रत्येक पर्वतात एक राक्षस राहतो. सगळे एकापेक्षा एक शक्तीशाली आणि महाचतुर ! त्या पर्वतांच्या पलिकडे एक जादूचं तळं आहे. त्या तळ्याचं पाणी आहे सोनेरी..

“आईशप्पत ! सोनेरी पाणी !!! ”

“मग.. जादूचं पाणी होतं ना ते.. “

माई अगदी रंगवून गोष्ट सांगत होत्या आणि पोरंही तल्लीन झाली होती. माझ्या डोळ्यावर हळूहळू झोप चढत होती, पण गोष्ट पूर्ण ऐकायची उत्सुकताही होती आणि तेही माई आणि पोरांच्या नकळत.. हातातल्या पुस्तकाची तर मी दोन पानंही उलटली नव्हती !

पोरांसाठी गोष्ट असल्याने ‘हॅपी एन्ड’ निश्चीत होता !

गोष्ट चालली होती भराभर पुढे.. मधेच मी पुस्तकात डोकं घालत होतो आणि काही वेळातच माझ्याही नकळत गोष्ट ऐकू लागत होतो. . गोष्ट खूप आवडत होती मुलांना त्यांच्या चेह-यांवरून.

गोष्टीतला तो सोनेरी पाणी आणायला गेलेला गरीब पण हुशार तरुण एकेक पर्वत पार करत होता... कुठला राक्षस त्याला युद्धाचे आव्हान देई, तर कुठला खूप अवघड कोडे घालत असे.. सगळे अडथळे पार करत तो तरुण पोचला सोनेरी पाण्यापर्यंत !!

... तहान लागल्यासारखी वाटली म्हणून मी आत गेलो स्वैंपाकघरात.. काही सेकंद फ्रीज शोधल्यावर खजील झालो थोडा.. माठातलं गार पाणी पिऊन परत येताना, काहीसा नवीन जागेचा अंदाज नसल्याने अंधारात काहीसा ठेचकाळत, बुटक्या दाराला डोक आपटंत असा परत आलो.. घरात निजानीज झाली होती केव्हाच..

मी परत येऊन बसलो तेव्हा माई गोष्टीचा शेवट सांगत होत्या.. आता त्यांचा स्वर मला काहिसा कापरा वाटला.

".. आणि ते सोनेरी पाणी घातल्यावर राजकन्येच्या पायाचं सहावं बोट झालं गायब ! मग राजाने त्या तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं ! राजाच्या गुरुदेवांनी दोघाना हजार वर्षं आयुष्याचा आशीर्वाद दिला... आणि मग ती दोघं खूप खूप सुखासमाधानात आणि आनंदात राहू लागली !!"

मध्यरात्र उलटून गेली होती.. तरिही कुणीतरी कुरकुरलेच "आज्जी, आजून एक गोष्ट.. "

"नाही रे बाळा.." थकलेल्या माई म्हणाल्या "उद्या सकाळी सगळे समुद्रावर जाणारात ना.. मग निजा आता"..

तशी एक दोन कच्चीबच्ची आधीच झोपली होती.. 'हॅपी एन्ड' न ऐकताच ! बाकीची मुलंही आडवी झाली.. त्याना सारखं करुन माईही लवंडल्या बाजूला.

त्यांचा थकलेला कृश देह पाहून कणव आली एकदम..

उठून विचारलं " माई, अंगावर काही घालू का पांघरायला ?"

"घालतोस ? घाल हो. आत्ता उकडतयं पण पहाटे कधी गार होतं.. झोप हो तूही आता"

"नाही.. बसतो जरा बाहेर दिवा घेऊन.."

"किती दिवसानी येता रे बाबानो.. आता पुढच्या वेळी येशील तेव्हा छान लग्न करुन ये हां .... निता ना रे नाव तिचं ? छान.. सुखी रहा " असचं काहीसं बोलत माईंचा डोळा लागलाही..

जवळचं पांघरुण उचलून त्याना घालायला गेलो.. आणि..

अचानक ते लक्षात आलं ! .. आज इतक्या वर्षानी ! सर्रकन काटा आला अंगावर !!

मी त्यांच्याकडे पाहिलं.. शांत चेह-याने निजलेल्या माई... ब-याच वर्षानी डोळे भरुन आले ते थांबेचनात..

त्याना घाईने पांघरुण घालून उठत होतो तरी डोळ्यातलं पाणी पडलंच खाली.. माईंच्या सहा बोटे असलेल्या डाव्या पावलावर ! .. कितीही इच्छा असली तरी ते सोनेरी मात्र असणार नव्हते !!

***