May 15, 2007

समुद्र !

मुंबई !

हे शहर म्हणजे एक समुद्र आहे !

माणसांच्या लाटालाटांनी रस्त्यांवर फुटणारा समुद्र.
बसेसमधून भरभरून फेसाळणारा समुद्र.
लोकल्समधे तुंबणारा समुद्र !

रोज उगवतात संपत्तीचे नवे सूर्य ह्या समुद्रातून. आपापल्या परीने काळोख शोषून घेत चकाकतात.. काही वेळा त्या चकचकाटामागेही असतात काळोखात चाललेली काळी कृत्ये. दिवसभर काळोख पिऊन झिंगल्यावर पुन्हा समुद्रात बुडतात ते सूर्य... तरी त्यांचे अंश राहतात रात्रभर चमचमाट करत !

त्यावेळी बराचश्या कोपऱ्यात काळोख कण्हत असतो. त्या चमचमटाने तो दिवसभर दिपून गेलेला असतो... त्या प्रकाशाला आपलं अस्तित्व नको आहे हे त्याला माहित असतं.. नवे नवे कोपरे शोधून तो टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो.

हा प्रकाश काळोखाचा खेळ पाहताना समुद्र मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहे, कारण त्याची कुणालाच पर्वा नाहीये. इथे प्रत्येकाचे स्वत:चे मंथन अहोरात्र चालू आहे, समुद्रात आपापले अमृत शोधण्यासाठी ! ह्या सततच्या मतलबी मंथनामुळे समुद्र तळमळत असतो

पण तसं आत्ता तरी सगळ ठीक चाललय !

वरवर पाहता ह्या अशांत समुद्रातले उद्रेक कुणालाच कळत नाहीत… सुनामी झाल्याशिवाय !

आज तरी समुद्र शांत वाटतोय.. माशाच्या जन्माला आल्यामुळे न बुडता पोहताहेत सगळे.. कुणी समुद्रातच जन्मला आहे तर कुणी ओढ्यानद्यातून वाहत, भरकटत आलाय, तर कुणी अळणी जीवनाला कंटाळून खाऱ्या पाण्याच्या ओढीने आलाय..

लहान मासे.. मोठे मासे.. अजूनच मोठे, अगदी अजस्त्र मासे.. गिळताहेत एकमेकाना.
अर्थात इथला निसर्गनियमच आहे तो : मोठ्यानी छोट्याना गिळायचं आणि अजून मोठं व्हायच !

ह्या समुद्रापासून दूर पाहिलतं कधी ?

आसपास आहेत तळी, तलाव आणि डबकी ! त्याच गढूळ पाण्यात पोहत आहेत सगळे ! समोरचं दिसत नसले तरीही.. काहीना ओढ लागली आहे समुद्राची.

ते... ते तळं बघा… कोणे एके काळी, कुठल्या तरी देवतेने त्या तळ्यात स्नान केले होते म्हणे… फार प्रसिद्ध आहे ते तळं. आज सगळे तिथे स्नान करतात. एकमेकांची पापं धुतलेलं दूषित पाणी अंगावर घेऊन पुण्य मिळवल्याचा आनंद घेतात !

बाकी अजून लहान लहान डबक्यात शेवाळी माजली आहेत.. पण त्यातच डुंबत आहेत काही आत्ममग्न. त्यालाच समुद्र समजून ! तिथे सर्वांची धडपड चाललेली आहे ती डबक्यातला सर्वात मोठा मासा होण्याची !

आणि ह्या इथे समुद्रात ?

लटपटत जगणारे मासे. त्या समुद्राच्या अवाढव्य आकाराने भेदरलेले.. काय करणार ? पाण्यात जगण आलं नशिबी.. त्यांचे अश्रू कोणाला दिसणार ? का ह्या सगळ्यांच्या अश्रूंचाच बनलाय हा समुद्र ? सगळे पोहत आहेत चवीचवीने एकमेकांची दु:ख चाखत ! ह्याच्यापेक्षा तो बरा. आणि त्याच्यापेक्षा तो. सगळेच पोहताहेत एकमेकाना पाण्यात पाहत.

काही आयुष्यभर समुद्रात राहतात नि गोड्या पाण्याची तहान घेउन जगतात.. तर काही नुसतेच राहतात सगळ्या इच्छा मेल्यासारखे.. पाण्यात अजून गुदमरून जीव गेला नाही म्हणून जगत राहतात..

पण काही झालं तरी समुद्र सोडवत नाही आहे कुणाला !

पोहताना एकमेकाना धडकत रोज नव्या जखमा होतात. त्या अंगावर घेउनच जगत आहेत सगळे. हे खारं पाणीही आजकाल त्यांच्या जखमांना झोंबत नाही… त्याना फक्त पोहायच आहे एव्हढच माहिती. कुठेही, दिशाहीन पोहत रहायचं ! मोठा मासा गिळेपर्यंत, किंवा त्या ‘शेवटच्या जाळ्या’त अडकेपर्यंत..

पण घाई पाहिलीत का ? प्रत्येकाला पोचायचय आहे कुठ तरी… समुद्राचा किनारा नाही आहे सापडत.. खर म्हणजे स्वत:ला कुठला किनारा हवाय हे कुणालाच नाही माहीत !


अशाने समुद्रही कंटाळेल मग एक दिवस..

आणि..

आणि एका सुनामीच निमित्त होऊन फेकून देईल सगळ्यांना … दूर कुठल्याशा किनाऱ्यावर !


***

7 comments:

Tulip said...

Rahul:D slightly morbid. pan khar tar ahech:).
tujhya nehmichya shaili peksha agadi hat ke lihil ahes ani chhan lihil ahes.

Yogesh said...

Too Good

Vidya Bhutkar said...

Quite is a good one. I remembered the days when i was one of them and how much I hated it. I wanted to get out of the sea desparately, but its so huge, doesnt let me get out easily as well. You have to either fight till u drop or leave everything behind and come out of it.
-Vidya.

राफा said...

Tulip, Yogesh, Vidya : Thanx a lot !

Nils Photography said...

Lyk it, as usual...
mast ahe...

राफा said...

Thanx again Nilesh.
Btw, i sent you test mails also.. now really curious why they are not getting delivered.. did you check your spam folder?

अपर्णा said...

काही झालं तरी समुद्र सोडवत नाही आहे कुणाला !

100 takka...:)