Aug 29, 2008

विडंबन: गझल - चकणा ! (मूळ गझल - वणवा)

मूळ गझल 'वणवा'  इथे   आहे

(किंवा ते ह्याच्या आधीचेच पोस्ट असल्याने सध्या ह्याच पानावर खाली पहावयास मिळेल :) )




'चकणा ' !



बियर ठेव रे नीचा, जरा गोठवून आता

ढोसतोस कुठे वेड्या ह्या श्रावणात आता



हाक मारिता त्याना, घोरती आत सर्व

घ्यायचे ना पहाटे का, मज घरात आता



जिव्हा केव्हाच भिजल्या, आत्म्यास ओल आत

तरीही कोरडे अजूनी, वाटे घशात आता



ओरडण्याचीच खोड, जडली जी जनांस

'टाईट' होता टीका, करिती फुकात आता



गांजले घरचे जरीही, तुझ्या दशेस रात्री

पड निवांत जरासा, त्या कोप-यात आता



- राहुल फाटक

Aug 18, 2008

गझल - वणवा !

बहर ठेव मनीचा, जरा गोठवून आता

फुलतोस कुठे वेड्या ह्या वणव्यात आता


हुंकारिता वेदना, डोलती येथ माना

आक्रोशही करावा मग सूरात आता


जाणीवा सर्व विझल्या केव्हाच खोल आत

तरी धुगधुगे अजूनी काही उरात आता


खुरटण्याचीच खोड, जडली जनुकांस

उंचावयाची उमेद नाही अंकुरात आता


बांधले मोर्चे जरीही, एकेक दिशेस त्यांनी

काढ तुफान जे जपलेस अंतरात आता


- राहुल फाटक

Jul 6, 2008

चित्रकला: प्रफुल्लित !

थेट संगणकावर, साध्या 'माऊस' ने काढलेले चित्र.


अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.










Jun 13, 2008

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक - १



१. सरकारी नोकरीत चिकटलेला क्लार्क :

अब यही से मेरी अर्थी उठेगी !



२. काम न मिळालेला रोजंदारीवरचा कामगार :

अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना ?



३. सरकारी नोकर बाप व 'IT' मधला मुलगा :

बाप: बेटा, तुम्हारी इतनी उमरभी नही, जितना मेरा तजुर्बा है !
मुलगा: बापू, आपका इतना प्रॉविडंट फंड भी नही, जितनी मेरी सॅलरी है !




४. "माझी चूक नाही ! अमेरिकेतून स्पेसिफिकेशन्सच चुकीची.. " - भारतातील एक डेव्हलपर

मेरा खयाल है की जरुर इसमें किसी गैर मुल्क का हाथ लग रहा है !



५. मॅनेजर व ऑडिटर :

ऑडीटर : गुनाह कभी छुपता नही. हालात चिल्ला चिल्ला कर कह रहे है की खून हुवा है !
मॅनेजर : लगता है, तुम्हे गडे मुडदे उखाडने का बडा शौक है !




६. टीम लीडर सोडून चालल्याने खूष झालेला सिनियर मेम्बर :

उसके बाद, अब मैही कबिले का सरदार बनूंगा (और जग्गा से बदला लूंगा) !



७. फाकडू रिसेप्शनिस्टशी अयशस्वी फ्लर्ट करणारा नवीन कर्मचारी :

तो: हम खूद नही आए, किसीके बदनकी खुशबू हमे यहा खींच लायी है !
ती: कोई बात नही. जहा चंदन का पेड हो, वहा सापोंका आना जाना तो रहता ही है !




- राफा

Jun 2, 2008

तिसरा हल्ला ! - भाग ३ (अंतिम)

भाग १


भाग २




संथामच्या किल्ल्याजवळील देवता.. संथामच्या लोकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान !

त्या देवतेला घट अर्पण करण्याचा उत्सव रंगात आला होता.

सर्वत्र फुलापानांनी सजावट केली होती. आकर्षक पोशाख घातलेल्या नर्तकांचे नृत्य चालले होते. नानाविध वाद्ये वाजत होती. संथामचे सर्व सरदार तिथे उपस्थित होते. संथामच्या लोकांनी तो सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. देवतेभोवती काही अंतर रिकामे ठेवून वर्तुळाकार गर्दी जमली होती. उन्हात मधेच लखकन चमकणारे भाले घेऊन लोकाना आवरण्यासाठी रक्षक वर्तुळाच्या आतील बाजूस तैनात होते.

अचानक, वाद्यांचा आवाज अजूनच वाढला. लोक उत्सुकतेने पाहत होते. स्थिर पावले टाकत सम्राट देवतेच्या शिळेकडे निघाला होता.. त्याच्या अंगावर अत्यंत उंची वस्त्रे व आभुषणे होती. तो पूर्ण नि:शस्त्र होता. आपल्या दोन्ही हाताने त्याने तो जड घट धरला होता. तो पवित्र घट सुगंधी द्रव्यांनी व निरनिराळ्या दुर्मिळ जिन्नसांनी भरला होता.

सैनिकांच्या सुचनेवरून काहीश्या अनिच्छेनेच लोक सम्राटाचा जयजयकार करु लागले. पण काही वेळापूर्वी नाचणा-या नर्तकांसारखेच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न नाचत होते... आता त्या पवित्र घटाने तृप्त होऊन देवता संथामचे रक्षण करणार.. पण संथामचे रक्षण म्हणजेच सम्राटाचेही रक्षण असे का ? त्या क्रूरकर्म्याच्या राजवटीपासून लोकांची कधी सुटका होणारच नाही का ? देवतेला सम्राटाचे राज्य पसंत आहे का ?

आता काही पावलेच राहिली होती.. सम्राटाच्या चेह-यावर समाधान पसरले होते. देवतेला घट अर्पण केला की ताबडतोब किल्ल्यात परतण्याची व्यवस्था शासकाने केली होती. घट अर्पण करताना चालत येण्याची परंपरा असली तरी परत जाताना त्याच्या खास अश्वपथकासह त्वरेने किल्ल्यात परतायचे होते..

आता काहीच क्षण..

सम्राट शिळेच्या पायथ्याशी पोचला.. एकवार त्याने तो पवित्र घट मस्तकाला लावला..

आता.. शेवटच्या क्षणी.. सम्राट तो घट शिळेला अर्पण करणार एवढ्यात...

कुठून तरी वेगाने एक बाण सरसरत सम्राटाच्या दिशेने आला.. आणि दुस-याच क्षणी त्याने नेमका वेध घेतला..

त्या पवित्र घटाचा !

प्रथम काय झाले ते कुणालाच समजले नाही.. एका क्षणातच त्या घटाचे लहान तुकडे होऊन त्यातील पदार्थ चारी दिशांना फेकले गेले. सम्राटाचा चेहरा आणि त्याचा पोषाख पूर्णपणे माखला गेला !

एकच गोंधळ झाला. लोक भितीने पळू लागले. सम्राटाच्या रक्षकांना बाण आला त्या दिशेचा निश्चित अंदाज येईना, त्यांनी गर्दीच्या दिशेने अंदाधुंद बाण व भाले सोडायला सुरुवात केली...

एका लयीत चाललेल्या संथामच्या उत्सवात हलकल्लोळ माजला व समारंभाचा पूर्ण विचका झाला..

काही क्षण गेले.. सम्राट अजूनही अपमानाने थरथरत होता. घडलेल्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. शासकाची संरक्षण व्यवस्था, खास सुरक्षा पथक, सशस्त्र रक्षक, शिवाय प्रचंड गर्दीत मिसळलेले हेर .. कशाचाच उपयोग झाला नव्हता !

शासकाने प्रसंगावधान राखून तातडीने सम्राटाचा अश्व मागवला.. आणि काही क्षणातच विलक्षण वेगाने तो सम्राटाबरोबर किल्ल्याच्या दिशेने दौड करु लागला. सम्राटाचा चेहरा घटातून उडलेल्या द्रव्यांमुळे व संतापतिरेकाने विकृत दिसत होता.

झाली होती ती हानी दिसत होती त्यापेक्षाही भयंकर होती.. सम्राटाच्या अपमानापेक्षाही जास्त ! कदाचित कधीही भरून न निघणारी !

ज्या अर्थी सम्राट पवित्र घट देवतेला वाहू शकला नव्हता त्या अर्थी संथामच्या प्रजेच्या दृष्टीने तो अपशकून होता. काही कारणामुळे सम्राट देवतेच्या रोषाला बळी पडला होता आणि म्हणूनच घट स्वीकारण्यास किंवा सम्राटाचे रक्षण करण्यास देवता प्रतिकूल होती.. आता तिच्या कोपामुळे सम्राट कदाचित लवकरच .. ?

राजधानीतून गावागावात ही बातमी पोचणार होती. सर्वत्र हाच निष्कर्ष लोक काढणार होते.

........

........

काही बोलायची आवश्यकताच नव्हती.

किल्ल्यात शिरल्यावर शासक व सम्राट त्या खास दालनाच्या दिशेने जाऊ लागले.. कुठल्याही आणिबाणीच्या प्रसंगासाठीच त्या दालनाची व्यवस्था शासकाने केली होती.

दालनात शिरल्यावर, डिवचलेल्या हिंस्र पशूसारखा संतापलेला सम्राट आपल्या स्थानावर जाऊन बसला. त्याच्या डोक्यात प्रचंड स्फोट होत होते. आपला राग काढायला समोर जर कुणी दोषी मिळाला असता तर त्याने आजवर दिलेल्या क्रूर शिक्षांना लाजवेल असे हाल केले असते त्याचे !

पण आज त्याच्यासमोर कुणीच अपराधी नव्हता, आणि हीच गोष्ट त्याच्या संतापात अजूनच भर टाकत होती.

त्याच्या नंतर दालनात प्रवेश केलेल्या शासकाने तिथला एकमेव दीप प्रज्वलित केला. त्या दिव्याच्या अपु-या प्रकाशात सम्राटाचा चेहरा अजूनच अक्राळविक्राळ दिसू लागला.

मग शासकाने त्या दालनाच्या रुंद अशा भिंतीतली बेमालूमपणे मिसळून गेलेली एक कळ सर्व शक्तिनिशी आत सरकवली. त्याबरोबर त्या दालनाचा एकमेव अवजड दरवाजा बंद होऊ लागला. त्या विशिष्ट धातूंच्या मिश्रणातून बनलेल्या दरवाजाला भेदणे बाहेरच्या कुठल्याही मानवाला वा शस्त्राला शक्य नव्हते.

दरवाजा पूर्ण बंद झाल्याची खात्री करुन शासक सम्राटासमोर आपल्या आसनावर बसला. झालेल्या घटनेनंतर लगेचच त्याने आपल्या भावनांवर ताबा मिळवलेला दिसत होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच अतिशय शांत होता. एखाद्या निश्चल जलायशासारखा. पण त्या शांत पाण्यात खोल कुठल्या कारस्थानांचे सर्प फिरत असतील ते पहाणा-याच्या लक्षात यायचे नाही !

त्याच्या समोर बसलेला सम्राट अजूनही झालेला अपमान पचवायचा प्रयत्न करत होता.. एकीकडे तो संतापला होता आणि दुसरीकडे आत्तापर्यंत कधीही न आलेली विलक्षण भिती आणि अस्थैर्याची भावना त्याचं मन पोखरत होती ! शासकाचे अनुभवी डोळे सम्राटाकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याचा शांतपणा पाहून सम्राट अजूनच बिथरला.. अंगाला आलेले कापरे अजूनही कमी झाले नव्हते.

"शासक, मला आजचा अपराधी हवा आहे " शांतता असह्य होत सम्राट बरळल्यासारखा ओरडला

सम्राट, मला तुमच्याशी तीन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत" शासक म्हणाला.

"पण आजच्या घटनेशी.. "

"संबंध आहे ! त्या तीनही गोष्टींचा आजच्या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे !" शासक ठामपणे म्हणाला... "तुम्हाला आठवतं ? तुमच्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा तुमच्या सुरक्षा पथकाच्या प्रमुखाला, 'तेजराज'ला, तुम्ही द्रोही ठरवलंत.. आणि मग.. सर्वांदेखत हाल हाल करून मारलंत ! ... नंतर केलेल्या चौकशीत असं आढळलं की तेजराज प्रामाणिक होता, शूर होता, आपल्या सहका-यात अतिशय लोकप्रिय होता.. आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे निर्दोष होता. हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता "

"अशा शुल्लक गोष्टींची चर्चा आपण कधीपासून करु लागलो शासक ?" सम्राट ओरडला " त्याच्या मृत्यूचा आजच्या.."

"सम्राट, ही शक्यता तुम्ही लक्षात घेतली आहे का की लोकप्रिय तेजराजच्या कुणा आप्ताने सूड म्हणून आज..."

"असे दु:साहस कोण करेल तर त्याची काय अवस्था होईल हे सर्वाना माहित आहे.. तरीही शंकानिरसन म्हणून त्याच्या सर्व आप्तजनांना पकडून.. " बोलता बोलता सम्राटाला एकदम दम लागला. " ते जाऊ दे. शासक ! तू सांगणार असलेली दुसरी गोष्ट महत्वाची असेल अशी मी आशा करतो".

सम्राटाच्या उद्गारांनी शासक दुखावल्यासारखा वाटला.

पण तरीही सावरून तो पुढे सांगू लागला " ठीक ! आता दुसरी गोष्ट. तुम्हाला माहित आहेच की तुमच्या आधी सेवकाने तुमच्या अन्नातील भाग सेवन करण्याची योजना माझीच आहे !... तो सेवक आपल्या मातापित्यांचा एकुलता एक पुत्र नाही !"

सम्राटाचे मस्तक विलक्षण वेदनेने ठणकू लागले.. तो ओरडला " शासक ! आज तुला काय झाले आहे. ह्या आणिबाणीच्या क्षणी तू काय निरर्थक..'

त्याचे वाक्य तोडत शासक म्हणाला " त्या सेवकाला जुळा भाऊ आहे. आणि ह्या वयातही दोघे तंतोतंत सारखे दिसतात.. ज्याला तुम्ही सध्या पाहत आहात तो जुळा भाऊ आहे"

शासकाने आपले भेदक डोळे सम्राटावर रोखले. सम्राटाचा पार शक्तिपात झाला होता. शासकाची तीक्ष्ण नजर सम्राटामधले अपेक्षित बदल टिपू लागली. ती नजर पाहूनच सम्राटाच्या अंत:र्मनात कुठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली.

आणि एखाद्या वीजेसारखे शासकाचे वाक्य त्याच्यावर कोसळले : "सम्राट, तो सेवक मृत्यू पावून आता पंधरा दिवस झाले आहेत"

"काय ??" सम्राट हडबडला.. त्या वाक्याचा अनर्थ हळूहळू त्याच्या लक्षात येत होता !

"होय. त्याचे राहण्याचे ठिकाणही गुप्त असल्याने कुणालाच सुगावा लागला नाही. मी लागू दिला नाही ! तेव्हापासून त्याचा जुळा भाऊ संरक्षक सेवक बनून तुमचे अन्न सेवन करत आहे !"

"शा.. शासक " सम्राटाने चवताळून उठायचा प्रयत्न केला पण तो मागेच आसनावर कलंडला..

"ह्या सगळ्याचे उत्तर तिस-या गोष्टीत आहे सम्राट ! पण त्या आधी तुम्हाला काही दाखवायचे आहे " शासकाने काळजीपूर्वक आपल्या पोशाखातील एका कप्प्यात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. ब-याचशा पारदर्शक पदार्थाने बनलेली ती एक छोटी कुपी होती. जवळ जवळ रिकामीच.. फक्त तिच्या तळाशी विचित्र निळ्या रंगाचे चिकट द्रावण दिसत होते.

सम्राटाचा चेहरा पांढराफटक पडला होता.. त्याने थरथरत हात उचलला आणि त्या कुपीकडे बोट केले

"हे... "

"अगदी बरोबर.. हेच रोज थोडं थोडं ! अन्नामधून ! ... त्या सेवकाचा मृत्यू झाला आणि तुमच्यावर चालू असलेल्या प्रयोगाचा शेवटचा भाग चालू झाल्याची खात्रीच मला पटली ! होय, अत्यंत मंद गतीने होणारा विषप्रयोग !"

"तू ? मला ... ? का !" सम्राट बरळला.

"होय. मी तूलाच !" शासकाच्या बदललेल्या आवेशाने सम्राट दचकला. "मीच अत्यंत योजनापूर्वक तुझ्यावर विषप्रयोग केला ! ह्या दुर्मिळ विषाची हीच खासियत आहे. अगदी नैसर्गिक वाटतो मृत्यू ! हा जुळा भाऊ असलेला सेवकही मीच निवडला होता.. कारण अतिशय सुदृढ व निरोगी असा तो सेवकही तुझ्या आधी मृत्यू पावण्याची शक्यता मी गृहीत धरली असती. आणि झालंही तसंच ! पण त्याच्या बदली त्याच्या भावाला मी किल्ल्यात गुप्तपणे आणल्यामुळेच... त्या सेवकाच्या अचानक तेजस्वी झालेल्या कांतीचे रह्स्य तुला कळलेच असेल.. "

"पण शा... का...? का ?"

शासकाचे निखारे ओकणारे डोळे एकदम निवले.. पाण्याने डबडबल्यासारखे झाले..

"ते माझे प्रायश्चित्त आहे.. आणि एका दुर्दैवी पित्याचा सूडही !" शासकाचे अश्रू ओघळले पण त्याला पर्वा नव्हती "होय सम्राट ! तेजराज माझा पुत्र होता !! ही गोष्ट त्याच्या मातेशिवाय कुणालाही माहित नव्हती. त्याचा भयानक मृत्यू माझ्या ह्या डोळ्यानी पाहताना... " शासकाने डोळे हातानी झाकून घेतले..

सम्राटाला आभाळ कोसळल्यासारखे वाटत होता. सर्वांगास वेदना सुरु झाल्या होत्या.

डोळे पुसून शासक सांगू लागला "मला प्रथमच त्या असंख्य लोकांच्या वेदना जाणवल्या ज्यांना मी निर्दयपणे मृत्यू दिला. केवळ तुझे साम्राज्य टिकावे आणि सदैव तुझेच रहावे म्हणून ! खूप कट कपटकारस्थाने केली केवळ तुझी आणि संथामची सत्ता वाढावी म्हणून... माझ्या पुत्राला मी त्याचा हक्क देऊ शकलो नाही.. पण त्याचा असा मृत्यूही मला टाळता येऊ नये.. ?" शासकाचे डोळे पुन्हा एकवार कठोर झाले. " त्या क्षणापासून सूडाग्नीमधे माझे अ:तकरण जळत आहे. त्या क्षणापासून स्वामीनिष्ठेचा मी फक्त अभिनय करतो आहे"

"शा..." सम्राटाने क्षीण प्रयत्न केला, आणि तो तसाच हताश पडून राहिला.

ते पाहिल्यावर शासक अत्यंत समाधानाने हसला. कमरेचे धारदार शस्त्र काढून त्याने सहज हाताला येईल असे ठेवले.. "ही फक्त खबरदारी आहे सम्राट ! तू आता उठूही शकणार नाहीस. तूला माहीतच आहे माझी प्रत्येक योजना निर्दोष राहील अशी काळजी मी घेतो!"

सम्राटाने सर्व शक्ती लावली पण त्याला बोटही उचलता येईना.. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.. हृदय मंद होत चालल्याचा भास होऊ लागला.

शासक आता शून्यात पाहून समाधानाने बोलू लागला "आज माझा सूड पूर्ण होईल ! थोड्याच वेळात शत्रूराज्यांचे एकत्रित सैन्य किल्ल्यात प्रवेश करेल. तशी व्यवस्था मी केली आहे. त्यांच्या पहिल्या हल्ल्यानंतर मीच त्यांच्या प्रमुखाशी गुप्त भेटी घेतल्या. त्याच तेजस्वी वीराने मी सांगितल्याप्रमाणे पवित्र घटाचा वेध घेतला ! ह्या राज्याला आता प्रजाजनांची काळजी घेणारा न्यायप्रिय सम्राट लाभेल.. पण त्या आधी.. स्वामीनिष्ठेचा शेवटचा अभिनय मला करायचा आहे. आता थोड्याच वेळात तुझी पूर्ण वाचा जाईल. . मग मी दालनाचा दरवाजा उघडून धावाधाव करेन. अचूक सांगायचे तर अजून एक प्रहरानी तू मृत्यू पावशील ! "

सम्राट असहाय्यपणे ऐकत होता..

"तुझे निष्ठावान सरदारही काही करू शकणार नाहीत ! त्याना शंकाही येणार नाही ! कारण संथामची देवता तुझ्यावर कोपली आहे असाच सर्वत्र समज आत्तापर्यंत पसरला असेल. तिनेच तुझा बळी घेतला अशीच सा-यांची समजूत होईल... आता फक्त काही क्षणच मला प्रतिक्षा करायची आहे"

एव्हढे बोलून, काहीश्या थकव्याने, शासक त्याच्या आसनावर पहुडला आणि त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले.. थोड्याच वेळात गुप्त कळ पुन्हा दाबून तो अजस्त्र दरवाजा त्याला उघडायचा होता. शिवाय अजून काही वेळाने, किल्ल्यावर ताबा मिळवायला इतर राज्यांच्या सैन्याला मार्गदर्शन करायचे होते !

...

सम्राट आता निश्चेष्ट पडला होता..

त्या दालनात आता फक्त शांतता मंद वाहत होती... त्या शांततेच्या डोहात सावकाश पावले टाकत येत असलेला आपला मृत्यू सम्राटाला ऐकू येत होता.

सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी झाला होता !





***

May 28, 2008

तिसरा हल्ला ! - भाग २

भाग १


त्याच वेळी...

त्याच वेळी संथामच्या किल्ल्याजवळच्या त्या अरण्यात, एक अश्वधारी पथक विशिष्ट दिशेने दौड करत होते.

दाट झाडीची, काटेरी झुड्पांची पर्वा न करता ते पुढे सरकत होते. सूर्य पूर्ण बुडायच्या आधीच त्या ठिकाणी पूर्ण अंधार पसरला होता. दूर खोल कुठेतरी सूक्ष्म प्रकाश मधूनच दिसत होता. त्या दिशेने ते पंधरा वीस अश्व सावधपणे वाट काढत होते. त्या निबीड वनात साधारण दिशा कळायला त्याना तोच एक मार्गदर्शक होता.

.. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला.. काही मशाली दिसू लागल्या आणि ते अश्वपथक इच्छीत स्थळी पोहोचले. कुणा पूर्वजांनी बांधलेले ते महाकाय मंदिर होते. एकेकाळी भव्य असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष वृक्षवेलींच्या गर्दीत चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. त्या जागी काही लोक आधीच जमले होते. मंदिराच्या राक्षसी आकाराच्या पन्नास एक पाय-यांपैकी एक दोनच एकसंध अवस्थेत होत्या.

त्यात सर्वात वरच्या पायरीवर एक विशेष लक्ष वेधून घेणारा एक वीर होता. त्याच्या जवळच असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या बलवान शरीरावरील युद्धपोषाख उजळून टाकत होता. त्या पोषाखावरील धातूची कलाकुसर मधेच चमकत होती. आधीच ते:जपुन्ज असलेला तो वीर भोवतालच्या काळ्या तमसागरात मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे भासत होता !

त्याच्या आजूबाजूला चिंताक्रांत चेह-यानी जमलेले लोक म्हणजे संथामच्या भोवतालच्या लहान राज्यांतील महत्वाच्या व्यक्ती होत्या. कुणी सेनानी होता, कुणी मुत्सद्दी होता तर कुणी त्या राज्याचा सर्व अधिकार दिलेला खास दूत. संथामचा कुठलाही पहारेकरी किंवा हेर त्या ठिकाणी फिरकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच अशा निर्जन ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते.

त्यांना नुकत्याच येऊन मिळालेल्या अश्वपथकास विसावण्याची संधी देऊन तो वीर धीर गंभीर आवाजात बोलू लागला :

"मित्रहो, पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून इथे जमल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. नुकतेच आतिस्म राज्याचे योद्धे आपल्याला सामील झाले आहेत, त्यामुळे आपल्या सर्व राज्यांच्या एकत्रित सैन्याची ताकद अजूनच वाढली आहे. "

आतिस्म योद्धयांच्या नेत्याने उठून त्याला अभिवादन केले. त्याचा स्वीकार करून तो वीर पुढे बोलू लागला :

"त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा काही गोष्टींचा आढावा घेतो. आपण सर्व जाणताच की संथामच्या सम्राटाची क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. संथामची प्रजा त्याच्या लहरी कारभाराला, उन्मत्त रंगेलपणाला कसेबसे तोंड देत एकेक दिवस काढत आहे. आपल्या दुर्दैवाने संथाम अतिशय बलशाली राज्य आहे. त्या विशाल सैन्याचा पराभव करणे आपल्याला शक्य नाही ! परंतु त्यांचे राज्य सहन करणे आता तेव्हढेच अशक्य झाले आहे. आपल्या संथाममधल्या सग्यासोय-यांची दौलत अब्रू कधी लुटली जाईल ह्याचा भरवसा नाही... आणि कधी आपल्या राज्यांवर ते सैन्य वावटळीसारखे कोसळेल सांगता येत नाही.."

उपस्थित लोकांपैकी अनेकांनी खेदाने माना हलवल्या.

"ह्यावर निर्वाणीचा उपाय आपण निवडला. थेट सम्राटावर हल्ला ! दुर्दैवाने आपले २ ही हल्ले अयशस्वी ठरले. दोन्ही हल्ल्यांचे सूत्र एकच होते : धाडसी आणि अत्यंत शूर अशा निवडक योद्ध्यांबरोबर मी किल्ल्यातील आपल्या हेरांच्या मदतीने आत प्रवेश मिळवायचा. अचानक हल्ला करुन थेट सम्राटापर्यंत पोचायचे. आणि मग मी त्याला पारंपारिक द्वंद्वाचे आव्हान द्यायचे !... माझे द्वंद्वयुद्धातील नैपुण्य तुम्हाला माहित असले तरी सम्राटही अतिशय बलशाली नि कुशल योद्धा आहे, त्यामुळे ह्या योजनेत धोका जरुर होता. सम्राटास दूर करायचा तो एकच वैध मार्ग होता. "

"सदैव कपटनिती करणा-या सम्राटास मारायचे मात्र नितीमत्ता सांभाळून ? " एक तरूण संतापून म्हणाला..

त्याला थांबायची खूण करून वीर पुढे बोलू लागला : "एकदा सम्राट मृत्यूमुखी पडला असता की त्या गोंधळाचा फायदा घेऊन किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही पुढची योजना होती. सम्राटाची जुलमी राजवट नापसंत असलेल्या लोकांची मदतही त्या मोक्याच्या क्षणी अपेक्षित होती.. पण.. पण सम्राटापर्यंत पोचण्याआधीच आपले दोन्ही प्रयत्न फसले !"

"होय" दुसरा एक योद्धा म्हणाला "दुस-या हल्ल्यामधे तर ह्या अरण्यापर्यंत येणारे एकमेव गुप्त भुयार वापरून जखमी अवस्थेत माघार घ्यावी लागली. आपला किल्ल्यातील शेवटचा हेरही पकडला गेला आणि ती गुप्त वाटही शत्रूला ज्ञात होऊन बंद केली गेली आहे"

हे भाषण ऐकून सर्व योद्धयांवर निराशेचे अदृश्य मळभ पसरले ! आजूबाजून अंधार मनात शिरला नि अजून गडद झाल्यासारखा वाटू लागला. मशालींच्या ज्योतीही अस्वस्थपणे फरफरू लागल्याचा भास होऊ लागला.

थोडी उसंत घेऊन तो वीर निग्रहाने पुढे म्हणाला "आता सर्व मार्ग संपले आहेत. त्यामुळे त्या राक्षसाचा थेट वध करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही !"

हे ऐकल्यावर काही आश्चर्योद्गार निघाले.

शेवटी, ब-याच जणांच्या मनातील शंका एका सरदाराने बोलून दाखवली "पण आपण ठरवले जरी तरी हे शक्य वाटत नाही. किल्ल्याच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. किल्ल्यात आपला एकही हेर उरलेला नाही. शासकाच्या देखरिखीखाली निष्णात योद्धे सम्राटाचे अहोरात्र संरक्षण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे दोन फसलेल्या हल्ल्यांमुळे शत्रू अधिकच सावध झालेला आहे !"

"होय ! मला कल्पना आहे" वीर म्हणाला "ह्यासाठीच मी अंतिम योजना तयार केली आहे.. सम्राटावर तिसरा आणि शेवटचा हल्ला !!"

वीराच्या ह्या उद्गारांनंतर तिथे एकच खळबळ माजली. पुन्हा हात वर करुन सर्वांना शांत करत वीर पुढे सांगू लागला :

"सम्राट शक्यतो किल्ल्यात राहूनच कारभार करत असला तरी दरवर्षी हमखास एका दिवशी किल्ल्याबाहेर येतोच येतो. तुम्हा सर्वांना माहित असेलच की संथाममधे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे किल्ल्याबाहेरच्या शिळेला म्हणजेच त्यांच्या देवतेला विविध वस्तूंनी भरलेला घट सम्राटाने अर्पण करणे... ती शिळा म्हणजेच संथामची संरक्षक देवता आहे असा लोकसमज आहे.. एरवी लोकांना तुच्छ लेखणा-या सम्राटालाही त्या लोकश्रद्धेचा अनादर करुन चालत नाही एव्हढे त्या समारंभाला पारंपारिक महत्व आहे. तर त्या समारंभाच्याच दिवशी... "

"व्यत्ययाबद्दल क्षमा असावी " वीराच्याच समोर उभा असलेला एक कृश वृद्ध म्हणाला "पण तुम्ही योजना सांगण्याआधीच माझी एक शंका आहे"

वीराने मान डोलावून संमत्ती देताच तो अनुभवी मुत्सद्दी पुढे बोलू लागला " संथामचा राज्यकर्ता जरी सम्राट असला तरी सर्व कारभार व कारस्थानांमागील चातुर्य आणि योजना मात्र शासकाची असते असाच समज आहे.. आणि तो बराच खराही आहे. मला वाटते, आपण जर निकराचा हल्ला करणारच असू तर तो शासकावरच करावा !"

पुन्हा एकदा तिथल्या लोकात कुजबूज सुरु झाली... उलटसुलट मते आपसात मांडली जाऊ लागली..

आपल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ तो वृद्ध सांगू लागला "हत्तीवरील अंबारीतील योद्ध्याशी लढायला जर आपल्या सैन्याला जड जात असेल तर, त्या हत्तीच्या माहुतालाच कंठस्नान घालावे ! ... तसे केल्यास अंकुश न राहिल्याने हत्ती अंदाधुंद होतो आणि मग अंबारीतला योद्धाही निष्प्रभ होतो.. अशा वेळी त्याचा पराभव करणे खूपच सोपे जाते ! मला काय म्हणायचे आहे ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच ! "


वृद्धाचे बोलणे ऐकून वीराने क्षणभर विचार केला आणि त्याच्या चेह-यावर स्मित पसरले..

तो म्हणाला "महाशय, तुमचा मुद्दा अतिशय तर्कशुद्ध आहे ह्यात शंकाच नाही. पण युद्धशास्त्रातल्या ह्या डावपेचाचा ह्या परिस्थितीत थेट उपयोग होईल असे वाटत नाही ! शासकाचा मृत्यू घडवला तरी सम्राटाची दहशत एव्हढी आहे की तो जिवंत असेपर्यंत, त्याच्या विरोधात असणारे पण नाईलाजाने त्याच्या बाजून लढणारे सरदार आपल्याला मदत करणार नाहीत. अशा परिस्थिती सम्राटाचे निष्ठावान सरदार आपला सहज पराभव करतील.. परंतु ह्यापेक्षाही महत्वाचे कारण आपल्याला माझी पूर्ण योजना ऐकल्यावर कळेलच... "

.. मध्यरात्र उलटून गेली होती.. वीर शांतपणे योजना सांगत राहिला.

त्याच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर कुणाचाच अविश्वास नव्हता. पण...

शांततेने व सन्मानाने जगण्याची ती शेवटची संधी होती. सम्राटावरचा तिसरा हल्ला यशस्वी होणे आता अत्यंत आवश्यक बनले होते !

क्रमश:


भाग १





May 25, 2008

तिसरा हल्ला ! - भाग १

तो काळ कुठला होता.. कोण जाणे.

मनाच्या वेगाने भूतकाळात प्रवास केलात किंचीत तर त्या आसपासच केव्हातरी.

पण तेव्हाही मानव असाच होता. आजच्यासारखाच. महत्वाकांक्षी, पराक्रमी, उपद्व्यापी, लोभी, तामसी. देहाने थोडा मोठा पण आकार तोच. आणि विकारही तेच.. आणि त्या देहात गुणावगुणांचा विसंगत संगम घडवणारे मानवी मनही तसेच !

...

त्या दिवशी सायंकाळी...


बेभान वारा भयाण आवाज करत होता, बेफाम वेगाने धुळीचे लोटच्या लोट उठवत होता.. त्या वा-याच्या वेगाला न जुमानणारा 'संथाम' च्या राजधानीचा प्रचंड किल्ला बुलंद दिसत होता. गेली कित्येक वर्षे अंगावर ओरखडाही उठता तो तसाच ठामपणे उभा होता. रोजच्याप्रमाणे आजही त्याच्या राक्षसी भिंती तापवून सूर्याची किरणे आता निवत चालली होती. खंदकातल्या तापलेल्या पाण्यात राहून खवळलेल्या मगरीही काहीश्या शांत होत होत्या.

किल्ल्याच्या भोवती सर्व बाजूने विस्तिर्ण असे मोकळे पटांगण होते. उत्तरेकडे किल्ल्याजवळ बाणाचा मारा पोचेल इतक्या अंतरावर कुठल्यातरी देवतेची मूर्ती होती. मूर्ती कसली, निसर्गाच्या चमत्काराने मानवी आकार प्राप्त झालेली एक मोठी शिळाच. किल्ल्याच्या एकूण आकाराच्या मानाने ती दगडी मूर्ती अगदीच नगण्य दिसे. परंतु, उत्सवाच्या दिवशी किल्ल्याइतकेच किंबहुना जास्तच महत्व त्या दगडाला येत असे.

पूर्वेकडे काही अंतरावरच एक भयंकर अरण्य सुरु होत होते, आणि तिथेच संथामचे अतिसामर्थ्यशाली राज्य संपत होते.

त्या सायंकाळी.. त्या अरण्याच्या दिशेला किल्ल्याच्या एका झरोक्यातून पाहत एक व्यक्ती उभी होती..

सम्राट !

संथामचा सर्वेसर्वा सम्राट ! घोर पराक्रमी सम्राट. कुशल सेनानी सम्राट.. आणि दुर्दैवाने अत्यंत क्रूर सम्राट !

आता काही वेळातच अंधाराचे साम्राज्य सुरु होणार होते.. पण, दिवसा मात्र त्या विशाल भूमीवर फक्त सम्राटाचे राज्य असायचे. संथामच्या म्हणजेच सम्राटाच्या आक्रमणापासून आत्तापर्यंत वाचलेली, तुरळक छोटी राज्ये होती पण अगदीच नगण्य. दुर्गम भुगोलामुळे थोडी अधिक सुरक्षित राहिलेली. पण सम्राटाच्या राज्याच्या विषारी छायेत भयग्रस्त. कधी आक्रमणाचा सर्प सीमा ओलांडून त्यांना गिळंकृत करेल ते सांगता येत नव्हते.

किल्ल्याच्या पूर्वेला अरण्य असल्याने त्या सीमेच्या बाजूने हल्ला होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे तिथे संरक्षणासाठी अगदीच कमी सैन्य तैनात असे. अर्थात संथाम वर हल्ला करून आपल्याच मृत्यूला आमंत्रण कोण देणार !

त्या भयंकर अरण्याच्या आतील काही भागात सूर्यप्रकाशही पोचू शकत नसे. हिंस्र पशूंचा मुक्त वावर, आणि वाट चुकल्यावर जन्मभर त्या अरण्यातच फिरत रहाण्याची भिती अशा कारणांमुळे त्या बिकट रानात पाऊलही टाकण्याची कुणाची छाती होत नसे.

अगदी सुरवातीच्या भागात लाकूडतोड चाले.. तीही दिवसाच.

त्या सायंकाळी किल्ल्यातल्या त्या सर्वात उंच दालनातल्या झरोक्यातून, अरण्याच्या दिशेहून परतणारे काही लाकूडतोडे पाहत सम्राट उभा होता. त्याच्या मजबूत देहावरची अत्यंत उंची राजवस्त्रे आत पोचणा-या वा-याने फडफडत होती. शांतपणे बाहेर बघणा-या सम्राटाच्या मनात मात्र खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विलक्षण घटनांचा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी येऊन उभे राहिल्याचे सम्राटाला जाणवले.

सम्राटाने मागे वळून बघितले आणि त्या व्यक्तीला पाहून ब-याच वेळाने त्याच्या मुखावर स्मित उमलले.

"शासक ! वेळ झाली का ?"

"होय सम्राट ! भोजनाची वेळ झाली आहे. सेवक तयार आहे" नेहमीच्या शांत धीरगंभीर आवाजात शासक म्हणाला.

सम्राटाने क्षणभर समाधानाने शासकाकडे पाहिले.

शासक. संथामचा प्रधान ! सम्राटाच्या सर्व कटकारस्थानांमागचा मेंदू. सम्राटाच्या अनेक क्रूरकृत्यांचा साक्षीदार. अत्यंत धूर्त, कारस्थानी. तितकाच संशयी. पण त्याच्या ह्याच गुणामुळे इतर अनेक महत्वाच्या जबाबदा-यांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सम्राटाने त्याच्याकडे दिली होती : सम्राटाच्या सुरक्षेची !

शासकानेही त्या कामी सर्व बुद्धी पणाला लावली होती. सम्राटाचा संपूर्ण दिनक्रम जास्तीत जास्त वेळ किल्ल्यात सुरक्षित बसून कसा व्यतीत होईल अशी योजना शासकाने तयार केली होती. सम्राटावर हल्ला होण्याच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन खास सुरक्षित दालने आणि वेगवेगळी शस्त्रे असलेल्या निष्णात योद्ध्यांची खास पथके तयार करण्यात आली होती. सम्राटाचे संरक्षण ही एकमेव कामगिरी त्यांच्यावर होती.

एव्हढ्या योजनेनंतरही, याशिवाय अजून एका प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होतीच... आणि ती म्हणजे सम्राटाला कपटाने होऊ शकणारा विषप्रयोग !

पण ह्यावरही शासकाने एक युक्ती केली होती : सम्राटाच्या भोजनाआधी एक विशिष्ट सेवक त्या अन्नातील भाग वेगळा काढून त्याचे सेवन करत असे. दररोज तोच सेवक ! खुद्द सम्राटाने त्या सेवकाला धडधाकट पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. ही सर्व बुद्धी शासकाचीच. संशयाला जागा नको म्हणून त्या विश्वासू सेवकाची निवडही खुद्द त्यानेच केली होती.

इतकी काळजी घेऊनही, कडेकोट बंदोबस्त असूनही गेल्या काही दिवसांत सम्राटावर दोन हल्ले झाले होते !!

सम्राटाच्या सुदैवाने.. दोन्ही वेळेला ते साफ फसले होते. पण त्या घटनांनी सम्राटाची जणू झोप उडाली होती. क्षुल्लक कारणांवरून लोकांना अतिशय सहजपणे क्रूर शिक्षा देणारा सम्राट स्वत:च्या जीवावर बेतल्यावर अत्यंत अस्वस्थ बनला होता. मृत्यूच्या कल्पनेने त्याच्या कठोर ह्रुदयाचे ठोके जलद होत होते. स्वत: शूर असूनही अचानक होऊ शकणा-या हल्ल्याच्या कल्पनेने त्याचे सर्वांग घामात भिजत होते. त्याचा एकमेव आधार होता शासक !

त्या परिस्थितही विचलित न होता शासक काम करत होता. आणि म्हणूनच शासकाकडे पाहत सम्राट त्या सायंकाळी सम्राट काहीसा निर्धास्त झाला.. धीम्या गतीने पावले टाकत तो दालनाकडे जाऊ लागला. शासकही अदबीने त्याच्या मागे चालू लागला.

...

सम्राटासमोर आता तो सेवक उभा होता. त्याने अन्न ग्रहण केल्यानंतर आता बरोबर दोन प्रहर उलटून गेले होते. सेवकाने दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून सम्राटाला अभिवादन केले. त्याही मन:स्थितीत सम्राटाची मग्रूरी काहीशी उफाळून आली आणि काहीश्या थट्टेच्या सुरात तो सेवकाला म्हणाला "आमचे खास भोजन तुझ्या देहाला अगदी मानवलेले दिसत आहे. तुझी कांती आता अगदी सतेज झाली आहे."

शासकाने मंद स्मित करुन त्या सेवकास जायची आज्ञा केली. तो धिप्पाड सेवक नम्रपणे मागे सरत दालनातून निघून गेला. तो जाताच शासक अदबीने म्हणाला "सम्राट ! आपण भोजन घ्या. त्यानंतर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचे आहे ! ".


त्याच वेळी...


(क्रमश:)


Feb 20, 2008

चाकाखालचा रस्ता !

आज रस्ता पहायचा मूड आहे. रस्ता काही खास नाही. नेहमीचाच अयशस्वी !

चित्रातले रस्ते असतात तसा सुबक वगैरे तर अजिबात नाही. काही काही रस्त्यावर आकर्षक कपड्यात सुंदर चित्रे चालतात, लखलखणारी दुकाने असतात.. तसाही नाही. एकेका रस्त्याचे भाग्य असते बहुतेक.

खरं म्हणजे मी चाललोय तो रस्ता काही एकच नाही. 'नेहमीचा रस्ता' म्हणजे अनेक रस्त्यांची साखळी आहे.. जॉइंट फॅमिली असल्यासारखी. पण कळत नकळत सगळ्या मेम्बरांचा एकमेकांवर प्रभाव पडतो आहे असं वाटत राहतं..

हा पूर्ण रस्ता तसा मध्यमवर्गीय आहे. म्हणजे अगदी गंजलेल्या सामानाची दुकानं, फुटकळ खोपटी, देशी दारुचे दुकान वगैरे गोष्टी नाहीत.. तशीच गुळगुळीतपणा, बाजूला बंगल्यांची रांग, दिव्यांचे नवीन खांब, रम्य झाडे वगैरेही नाहीत.

हा तसा ब-याच ठिकाणी ओबडधोबडच आहे. मधेच कधीतरी काही अज्ञात माणसे येउन त्याला जरा डागडुजी करतात. त्यांच्यातला मजूर, मुकादम आणि मालक जवळजवळ सारखेच दिसतात. उकळणारा लाव्हा भरकटत वाहत जावा तसे ते डांबर कसेही पसरवले जाते. मग त्यावर अजस्त्र लाटणी फिरवली जातात. पोळी करणारा शिकाऊ असेल तर कडांना रेखीवपणा न येता वेडेवाकडे आकार होतात तसेच ह्या रस्त्याच्या कडेला पसरलेले डांबर दिसते. दोनेक दिवस रस्त्याचा तो तकाकलेला मेक-अप राहतो. मग पुन्हा तो पार धुळकतो.

ह्या रस्त्यावरचा गोंधळही मेथड इन मॅडनेस असल्यासारखा.. अनेक तालमी घेऊन बसवल्याप्रमाणे चालू असतो... पण त्या चित्रातल्या रस्त्यांपेक्षाही ह्या नेहमीच्या रस्त्यातली चित्रे आज ठाशीव नि सुंदर दिसतात. अगदी आत्ता पुढे असलेली कच-याची गाडीसुद्धा !

ठीक. मग आज गाड्याच पाहू !

तशी खिडकीत बसून माणसांचे नमुने पाहण्याची मौज औरच आहे. पण एव्हढ्या रिकामटेकडेपणाची चंगळ परवडत नाही. त्या बाबतीत लहान सहान दुकानांचे मालक एकदम 'तयार' असतात. बरणीतला जिन्नस झपाझप कागदात बांधून देताना आणि 'कट'कन पुडीचा दोरा तोडतानाही अशा दुकानदारांचे रस्त्यावर अगदी बारिक लक्ष असते.

पण गाड्यांचे स्वभाव नि मूड्स माणसांपेक्षा लवकर वाचता येतात आणि ब-याचदा दिसतात तसेच असतात.

ही समोरची कच-याची गाडी निवांत खडखडत चालली आहे.. एखाद्या गरिबीने मळलेल्या लहानग्या मुलीसारखी ती वाटते. तिला दुनियेची नि तिच्या चकचकीत प्रगतीची काही पडलेली नाही. तिच्यातला काहीबाही जिन्नस मधे मधे खुशाल रस्त्यावर सांडतो आहे. कच-यातल्याच प्लॅस्टीकच्या पांढ-या पिशव्यांमधे भसदिशी हवा शिरली की त्याचे फुगे होऊन त्या उडत आहेत आणि अल्लद तरंगत तरंगत खाली येत आहेत. ती मुलगीच जणू फुंकरी मारून साबणाचे फुगे उडवत मजेत चालल्यासारखी वाटते.

त्या जुनाट गाडीत कच-याची पिवळी पेटी आहे. साखळीने बांधलेली. धूळ कचरा, घाणीने लडबडलेली. मूळचा पिवळा रंग जवळजवळ दिसतच नाहीये इतकी ती माखली आहे. पण तीही निवांत कांगारूच्या पिल्लासारखी गाडीच्या पोटात पहुडली आहे. आत्ता गेलं त्या वळणावर ती एका बाजूला सरकली. कुशीवर वळल्यासारखी... सिमेट्री जराशी बिघडलीच.. पण त्यामुळे तिचं काही बिघडत नाही. पुढच्या वळणावर ती पुन्हा कूस बदलेल कदाचित. पण वळणावर फक्त मीच वळलो. ती कच-याची पेटी ठेवलेली गाडी सरळच गेली...

आता एक लालभडक ट्रक आलाय समोर. ट्रक आणि लॉरी मधला लिंगभेद कसा ठरवतात कोण जाणे ? त्याच्या मागच्या बाजूला छान वेलबुट्टी, मोर वगैरे काढले आहेत. मागे दोन्ही बाजूला लटवलेल्या साखळ्यांची टोकं हिंदकळत आहेत. कानातल्या डूलांसारखी. त्यामुळेही त्या ट्रकमागे लिहीलेले 'चल मेरी रानी' अगदी शोभतयं. त्या खाली लिहीलेल्या 'सुरक्षित अंतर ठेवा' ला आता मजेदार अर्थ येतोय. त्या 'रानी'चा मर्यादाभंग होणार नाही ह्या बेताने मग जरा अंतर ठेवून मागे रहावेसे वाटते. ही डूल घातलेली रानी डुलत डुलत 'देश महान' असल्याचा संदेश देत गावोगाव फिरत्ये आपली.

एक मर्सिडीज घरंगळल्यासारखी पुढे गेली... रस्त्याला अजिबात न दुखावता. जणू रस्ता अदृश्य आहे आणि तिच्यासाठी उलगडतो आहे आयत्या वेळी ! ती आहे अगदी काळीशार. स्पॉटलेस ब्लॅक ! काळ्या साडीत अतिशय देखणी हिरॉईन असावी तशी. आपलं सौष्ठव सगळे नीट पहात आहेत ह्याची कल्पना असलेली तरीही खानदान मोठं असल्यामुळे आपला आब राखून जाणारी. पावसात भिजलेली अशी काळी मर्सिडीज पहाणं म्हणजे... पण आज पाऊस नाही.

पण ही विशिष्ट मर्सिडीज जरा फारच अलिप्तपणे चालली आहे. गूढ आणि काहीसे निष्ठूर तिच्या पोटात आहे असं वाटत राहतं. बाकीच्याना न कळू दिल्यासारखं सावध ती एका पांढुरक्या जीर्ण बंगलीसमोर थांबली. एखाद्या संपन्न जीवन जगलेल्या वृद्धाला शांत, हळूवार मृत्यू यावा तशी ती काळी मर्सिडीज वाटते.. जणू 'काळ'च त्यात बसून आला आहे.. कोण रहात असेल त्या बंगलीत ?

डावीकडून एक 'एसयूव्ही' उन्मत्त सांडासारखी जाते. काही तरल विचार यायला लागले की अशी उधळलेली वाहने जणू त्या विचारांनाच घासत, ठिणग्या उडवत गेल्यासारखी जातात. अंधूकसं दिसलं पण तिच्यातला चक्रधारी बहुतेक एक किरकोळ इसम होता. त्या प्रचंड धूडामधे तो अगदीच सूक्ष्म वाटला. एकंदर त्याला पाहून त्या जगत नियंत्याची आठवण होते. परिस्थिती त्या माणसाच्या कधीही हाताबाहेर जाईल असे वाटत राहते. कदाचित गेलीही असेल ! त्या एसय़ूव्ही चे चक्र योग्य वेळी वळवणे त्याला जमेल का ? ब्रेक पर्यंत त्याचे पाय तरी पोचत आहेत का सहजी ? मग का तो एव्हढ्या जोरात चालवतो आहे? जगाचा अंत जवळ आला आहे का ?

अशी अनेक चित्रे दिसतात... गाड्यांचे स्वभावधर्म त्या जाता जाता दाखवून जातात, कधी त्यांच्या मनातले ऐकवून जातात.

ती बसला करकचून थांबायला लावणारी आडमुठी संथ सायकल..
रिटायर्ड स्मग्लरची वाटावी अशी एक अवाढव्य पसरलेली जुनी गाडी..
ती तेलपाणी खाउन पिउन सुखी असणारी पापभीरु चारचाकी...
एखाद्या बोजड सफारीवाल्याला कशीबशी रेटणारी, थकलेली दुचाकी...
पोटात माणसे कोंबून तृप्त झालेली 'लाल पिवळी'..

गाड्यांची हलती चित्रे बघता बघता गुंग होत मी इच्छीतस्थळी पोचतो !

Feb 11, 2008

कोण आहे रे तिकडे - २

महाराज: कोण आहे रे तिकडे ?

प्रधानजी: मी महाराज ! अजून तरी आहे मी ! हा घ्या पुन्हा एकदा मुजरा करतो !

महाराज: मुजरा ? प्रधानजी, काय तवायफ आहात की बारबाला ? पण कुठे उलथला होतात ? तुम्हाला कधीपासून हाक मारतो आहे.

प्रधानजी: अहो चौथ्यांदा सांगतोय महाराज ! मी इथेच आहे ! प्रश्न असा की माझं उत्तर तुम्हाला ऐकू का येत नाहीये..

महाराज: हं.. काय सांगू...मला जरा आजकाल कमीच ऐकू येतंय !

प्रधानजी: का महाराज ?


महाराज: अहो आमच्या महालाच्या पाठीमागच्या साईडलाच कुणीतरी कसलातरी मांडव घातलाय आणि स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या केल्या आहेत ! गेले दोन दिवस कुणी काही बोललं तरी मला नुसतं ‘ढपाक टपाक’, ‘ढपाक टपाक’... ‘ढपाक टपाक’ च ऐकू येतं ! काय त्रास आहे ह्यांचा !

प्रधानजी: अच्छा म्हणून तुम्ही कानाडोळा केलात होय माझ्याकडे .. पण काय त्रास झाला महाराज ? वर्गणी जास्त मागितली का या वर्षी ? काय करणार महाराज.. चंदा है पर धंदा है ये ! पण मग मांडववाल्यांबरोबर मांडवली करायचीत ना !

महाराज: च्च च्च ! वर्गणीचं नाही हो काही एव्हढं ! त्यासाठी सरकारी अनुदान दिल आम्ही ! पण एकंदरच ध्वनीप्रदूषण किती वाढतय ! देशापुढील तो एक वाढता प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर कुणीच आवाज उठवत नाही !

प्रधानजी: महाराज ! आवाज कुणाचा !

महाराज: कुणाचा म्हणजे ??? अर्थातच आमचा !


प्रधानजी: तस नव्हे. एकदम तलवार काढू नका. आता निवडणूका एव्हढ्यात नाहीत अजून.. आवाज कुणाचा म्हणजे कुणाकुणाचा ! म्हणजे कुणाकुणाचा आवाज तुम्हाला त्रास देतो आहे अस विचारतोय मी !

महाराज: किती आवाज सांगू ! ह्या ध्वनीप्रदूषणाविषयी ऐकायला कान देण्याची कुणाची तयारी नसते ! पण आता ह्या प्रश्नाला कान नाही तर तोंड देण्याची वेळ आता आली आहे !

प्रधानजी: महाराज, बरोबर आहे तुमचं.. पण उत्सवाचे दिवस असेच असणार ! एखादा दिवस ..

महाराज: एक दिवस, एक आठवडा असं नसतं ते ! कधी ह्या धर्माचा उत्सव तर कधी त्या धर्माची प्रार्थना ! का तुमचा देव बहिरा आहे का लोकं बहिरी आहेत ! ह्याना कुणी थांबवायला गेलं की धर्म बुडाला म्हणून बोंब मारतात !

प्रधानजी: मी पण गेल्या वर्षी त्याना हेच सांगत होतो नाचता नाचता ! ए ढपाक टपाक ढपाक टपाक (नाचतो)

महाराज: प्रधानजी ! अहो तुम्ही तरी त्यांच्या तालावर नाचू नका ! प्रश्न फक्त एखाद्या उत्सवाचा नाहीये ! उदासपणे, मरगळल्यासारखा उत्सव साजरा करा अस कोण म्हणेल ? अहो हीच तर आमच्या जनतेसाठी आनंद लुटायची सुवर्णसंधी !

प्रधानजी: हो ना महाराज नाहीतरी आपल्या राज्यात अश्या संध्या फार कमी मिळतात !

महाराज: प्रधानजी ! हं.. पण अशा उत्सवात मोठ्या आवाजाने लोकाना त्रास होवू नये हा साधा विचार कुणाच्या मनात येत नाही ? त्याना त्यातून कसा मिळणार आनंद ? कधी थांबणार हे ध्वनीप्रदूषण ? कुणी आजारी माणूस असेल, म्हातारंकोतारं असेल, लहान मूलं असतील त्यांना किती तो त्रास ? माझ्या कानाचा पडदा गच्चीवर वाळत घातलेल्या पंच्यासारखा फडफडतोय !

प्रधानजी: पण महाराज.. आत्ता काय ह्याच एकदम ? सगळे उत्सव संपले आता.. तुमचं बोलणं म्हणजे आत्ता जुनाच एपिसोड चुकून दाखवल्यासारख वाटतंय !

महाराज: अहो, उत्सवाच्या काळात ऐकण्याच्या मनस्थितीत फार कमी लोक असतात म्हणून आत्ता बोलायचं ! बोललं तरी त्या स्पीकरच्या ‘भिंतींच्या’ आवाजात आमचाही आवाज ऐकू येईनासा झालाय !

प्रधानजी: खर आहे महाराज. मिरवणुकीतले काही लोक तर ऐकण्याच्याच काय तर चालण्याच्या परिस्थितीतही नसतात... पण ह्या विषयी जनजागृती व्ह्यायला पाहिजे !

महाराज: अगदी बरोबर म्हणालात !

प्रधानजी: झालं तर मग.. मी आत्ताच लाऊड स्पिकर लावून लोकाना जागृत करायचे आदेश देतो!

महाराज: प्रधानजी !!! तुम्ही... तुम्ही म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहात ! आत्ता मी तुम्हाला ध्वनीप्रदूषणाविषयी सांगितल आणि तुम्ही लाऊड स्पिकर लावायच्या गोष्टी करताय ?

प्रधानजी: महाराज टेक इट लाऊडली .. म्हणजे आपल ते, टेक इट लाईटली ! पण तुम्ही ध्वनीप्रदूषीत झालात म्हणजे काय ?

महाराज: (‘सांग सांग भोलानाथ’ च्या चालीवर )
कान कान गेला काऽऽन ! पडदा फाटेल का ?
कानामधे शिट्टी वाजून बहिरा होईन काय ?

कान कान गेला काऽऽन !

माझ्या घराशेजारी
भलामोठा स्पीकर
आवाज त्याचा आदळून
उठेल कारे डोकं..

गेला काऽऽऽन ! गेला काऽऽऽन !

प्रधानजी: बास बास महाराज.. कळला तुमचा मुददा ! ह्यांची आवाजी बंद करायला हवी आहे ! आपल्या लोकाना बेशिस्तीची सवय झाली आहे. कुठलाही नियम पाळायचा नाही हाच नियम झाला आहे हल्ली !

महाराज: म्हणजे काय ?

प्रधानजी: आता आपण शिस्तीत विचार करु. एकेक आयटम सॉंग घेउ आता !

महाराज: कायऽऽऽऽऽऽ ?

प्रधानजी: नाही एकेक आयटम घेउ अस म्हणायच होत. सवयीने…

महाराज: छान !

प्रधानजी: काय आहे महाराज लोकाना कळतंय पण वळत नाहीये. आता बघा, वनस्पतींवर सुद्धा कर्कश्य संगीताचा वाईट परिणाम होतो अस सिद्ध झालय !

महाराज: काय म्हणताय काय ?

प्रधानजी: खर आहे महाराज. आपले शास्त्रज्ञ वेळ जात नसला की अधून मधून प्रयोगही करतात. असाच त्यानी प्रयोग केला की काचेच्या दोन बंद खोल्यामधे प्रत्येकी एक अशा एकसारख्या वनस्पती ठेवल्या.

महाराज: हा कसला प्रयोग ?

प्रधानजी: ऐका तर खर ! मग त्यानी एका खोलीमधे मंद मधुर शास्त्रीय संगीत लावलं तर दुसऱ्या खोलीत कर्कश्य असे संगीत.

महाराज: कर्कश्य म्हणजे ?

प्रधानजी: म्हणजे ज्यात नुसते ढणाढणा बडवत असतात आणि शब्द काही माती का दगड काही कळत नाही !

महाराज: माती का दगड कळत नाही ? हां हां.. म्हणजे हार्ड रॉक ! बर मग काय झाल ?

प्रधानजी: काय आश्चर्य सांगायच महाराज. थोड्याच दिवसात त्या मधुर मंद संगीताकडे झेपावत पहिल्या खोलीतली वनस्पती वाढली आणि दुसऱ्या खोलीतली वनस्पती कर्कश्या संगीतापासून दूर विरुद्ध दिशेने वाढायचा प्रयत्न करत करत बिचारी कोमेजली !

महाराज: काय म्हणताय काय ? म्हणजे जे झाडांना कळतं ते आपल्यातल्या काही जुन्या खोडांना कळत नाही ?

प्रधानजी: कळत महाराज. पण मूळ मुद्दा हाच आहे की परंपरेच्या नावाखाली ते मनमानी करतात ! कुठलेही बंधन त्याना नको आहे. पण हे ध्वनिप्रदूषण उत्सवापुरतेच मर्यादित नाही महाराज ! ह्या गोंधळात सुजाण नागरिकांची मुस्काटदाबी होऊन त्यांचा आवाज बंद झाला आहे !

महाराज: ते काही नाही ह्या सगळ्यावर ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई करा.

प्रधानजी: ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई ? अवघड आहे महाराज !

महाराज: आता काय झालं ?

प्रधानजी: नाही, कारवाई कायदेशीर केली तर ती ताबडतोब असणार नाही ! आणि कडक केली तरी ती कायदेशीर असणार नाही !

महाराज: हं...

प्रधानजी: त्यापेक्षा तुम्ही जनहित याचिका दाखल करा.

महाराज: म्हणजे काय होईल.

प्रधानजी: म्हणजे मग पटापट कारवाई होईल महाराज.

महाराज: ते काही नाही ! मी महाराज आहे ना ? मीच जनहित याचिका दाखल करु ? एकेकाला कडक शिक्षा करा.

प्रधानजी: कुठली महाराज !

महाराज: एकेक गुन्हा सांगा, मी शिक्षा सांगतो.

प्रधानजी: ठीक मी आजच दवंडी पिटवतो

महाराज: ऑं ?

प्रधानजी: नाही, हळू आवाजात पिटवतो ! पहिला गुन्हा : वेळीअवेळी कर्कश्य गाणी लावणे विशेषत: अर्थहीन, अश्लील गाणी देवासमोर किंवा पुजेच्या ठिकाणी लावणे !

महाराज: अश्या लोकांच्या कानाखाली खुद्द आमच्या हातून आवाज काढण्यात येईल ! पुढचा गुन्हा सांगा …
प्रधानजी: गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभारुन देवाला इतक बहिरं करुन सोडणं की तो वैतागून सर्वसामान्यांची गा-हाणी ऐकेनासा होतो !

महाराज: ह्यावर एकच शिक्षा ! त्या लोकाना डोलबायच्या स्पिकरच्या भिंतीत चिणून मारले जाईल !

प्रधानजी: महाराज पुढचा गुन्हा म्हणजे मोठ्मोठ्याने हॉर्न मारत गाडी चालवणे अथवा उभी करणे !

महाराज: त्याना हॉर्नवर सुळी द्या !

प्रधानजी: आ ?

महाराज: अहो बैलाच्या हॉर्नवर म्हणजे शिंगावर सुळी द्या !

प्रधानजी: शेवटचा गुन्हा जरा खाजगी आहे. राणीसाहेबांच्या..

महाराज: आ ? राणीसाहेबांच्या खाजगी गोष्टी तुम्हाला काय माहीत !

प्रधानजी: नाही तस नाही. राणीसाहेबांचे एक काका, भैय्यासाहेब त्यांच नाव.. ते आमच्या शेजारी रहातात. माझी बायको सांगते की ते आंघोळीच्या वेळी ..

महाराज: तुमच्या बायकोच्या ?

प्रधानजी: नाही हो ! भैय्यासाहेब त्यांच्याच आंघोळीच्या वेळी …

महाराज: काय करतात ?

प्रधानजी: आंघोळ करतात ! ते सोडा .. पण शिवाय मोठ्या भसाड्या आवाजात गातात हो ! तेसुद्धा क्लासिकल... म्हणजे आपण क्लासिकलच गातो असंच भैय्यासाहेबांना तरी वाटतं ! त्यांचे ते भिजलेले सूर ऐकून घशाला कोरड पडते हो आमच्या !

महाराज: मग जलमंत्र्यांना सांगून पाणी पुरवठा बंद करायचा त्यांचा ! एकदा नळाचं पाणी पळालं असतं की त्यांच्या तोंडचही पळालं असतं..

प्रधानजी: अहो तेही केलं .. तर नळाकडे पाहून त्यानी मेघमल्हार राग असा आळवायला सुरुवात केली की घाबरून आम्ही पाणीपुरवठा पूर्ववत केला ! आता तर त्यांचा स्वत:च्या गाण्यावर फारच विश्वास बसलाय.. गाता यावं म्हणून ते तीनतीनदा आंघोळ करतात ! महाराज आजूबाजूची प्रजा संत्रस्त झाली आहे हो !

महाराज: होय अशा तक्रारी फार येत आहेत आजकाल ! ह्यावर एकच शिक्षा, एकच उपाय !

प्रधानजी: कोणता महाराज ?

महाराज: त्यांना दहा दिवसाची मुदत द्या.. तेवढ्या अवधीत जर त्यांचे गाणे थांबले नाही तर भैय्यासाहेबांचे आंघोळीच्या बादलीत विसर्जन करा ! बोला गणपती बाप्पा …

प्रधानजी: मोरया !!!


***

Jan 1, 2008

आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

अहा हा ! एणार एणार म्हणताना सहलीचा दिवस आलाच. आक्शरशा सुवरणाच्या आक्शरानी लिहून ठेवून देण्याचा तो दिवस होता (आमच्या वर्गात सुवरणा चित्रेचे आक्शर सर्वात चांगले आहे).
सकाळच्या मंगल वेळी पक्शी कोकीलकूजन करत होते. मि व अंत्या एकत्र शाळेत पोचलो तेव्हा बसचा पत्ताच नव्हता. साखरदांडे सर नेहमीचसारखे रागीट दिसत होते (त्याना आम्ही उसाचं चिपाड म्हणतो कारण की ते काडीपेल्वान आहेत) . आज ते बसवाल्यांवर अतिचशय चिडले होते. आपल्या देशात वेळापत्रकातल्या वेळेचे महत्व लोकाना नेमी उशिरा कळते. पक्शी घड्याळ न घालताही योग्य वेळी किल्बी लाट करतात मग माणसे तसे का करत नाहीत बरे ? मी अंत्याला हे सांगितल्यावरती तो म्हणाला की घड्याळ घालावयास पक्शांना हात नसतात त्यामुळे त्यांचे घड्याळ अदरुश्य असते. मग शेवटी एकदाचे बसवाले आले.
बसमधे चढताना सरवाना रोमहर्शक वाटत होते. पण तेव्हढ्यामधे गायतोंडेच्या वेणीला कुणीतरी चुंगम चिक्टवण्याचे निन्दनीय क्रुत्त केल्याचे समजताच ती किंचाळली. मग साखरदांडे सरानी तिच्या जवळील एक दोन मुलाना झोडपून शासन केले. बसमधे मजल दरमजल करत अस्ताना आम्ही मुले विरुद्ध मुली अशा गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. मुलांवर चऊदावी भेंडी चढत असतानाच आम्ही शनिवार वाड्यापाशी पोचलो.
शनिवार वाडा हा आयतीहासिक किल्ला आहे. एका पेशवे आडनावाच्या राजांनी तो बांधला होता. ते घरचे श्रीमंत होते. ही मऊलिक माहिती अंत्याने आम्हाला दिली. अंत्याला आयतीहासिक गोष्टींची खूपच माहिती आहे (साखरदांडे सरांपेक्षाही जास्त).
वाड्यापाशी गुरे, गायी, म्हशी व रेडे इत्यादि पाळीव व उपयुक्त पशू होते. वाड्याची भिंत तीन पुरुष उंच आहे असे उपासने सर म्हणाले. अबब असे म्हणत आम्ही मनाशीच एकावर एक माणसे चढवून दहीहंडी करुन पाहिली तर ती ४ माणसे होवू लागली. कदाचित पुर्वीच्या पुरुषांपेक्शा आत्ताची माणसे बुटकी झाली असावीत. त्यामुळे थोडा गोंधळ उडत आसातानाच गुर नावाच्या एका पाळीव पशूने मला धक्का दिला. त्या धक्क्यातुन सावरल्यावर मी पुन्हा भिंतीचे निरिक्शण करु लागलो.
उपासने सरानीच आम्हाला जिदन्यासा हा एक मोठा गुण आहे हे शिकविले आस्ल्यामुळे मी लगेच ही एव्हढी उंचच उंच भिंत बांधली कशी आसेल आसं विचारलं. तर ते वसकिनी आमच्या अंगावर खेकसले. मग अंत्या हळूच म्हण्ला की एकावर एक उभे राहून तीन मजूरानी ती बांधली असेल तर माईणकर म्हणाला की त्यांनी शिडी वापरली असेल. पण आधी भिंतच नसेल तर शिडी टेकवणार कशावर ? असा प्रशन मला पडला होता तो पडूनच राहिला.
पण ह्या उदाहरणावरून आपल्याला अरवाचीन शिल्पकला किती प्रगतीशिल होती हेच दिसत नाही का ?
आत जाताच उपासने सर आम्हाला भराभर भराभर माहिती देवू लागले. ती काहीच कळत नसल्याने आम्हाला जणू काही त्यांच्या तासाला बसल्यासारखेच वाटले. पूरवी तिथे अरवाचिन बाग तसेच बगीचे वगेरे होते. (त्यावेळीही हरित क्रांति झाली होति काय असा प्रशन मला विचारायचा होता परन्तु सर पुन्हा वसकिनी ओरडावयाच्या भितिने मी मटकी गिळून गप्पच राहिलो) . तिथे एक मोड कळीस आलेले दगडी कारंजेही होते. एके काळी त्यात खालून वर पाणी उडावयाचे. पण आत्ता ते बंद होवुन नादुरुस्त पडले होते. ह्यावरून त्या काळचे पाण्याचे पंपही प्रगतीशिल होते हेच दिसत नाही का ?
इतका विचार करावयाची सवय नसल्याने आम्हाला कडाक्याची भुक लागली. बाजारु खाण्याने प्रक्रुतीवर हानिकारक व खोलवर परिणाम होतात त्यामुळे आम्ही आमचे घरुन आणलेले डबे उघडले व वदनिक वळ घेता म्हटले. जेवताना उपासने सरानी काका मला वाचवाची गोश्ट सांगितली. त्यात हिंसा व खुनाखुनी असल्याने आमची छाती आतिशय धडधडू लागली. पण ती रहस्यमय गोश्ट ऐकुन आमचे न्यान खूपच वाढले.
दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले. मग मात्र त्यानी माईणकरला बुकलायला सुरुवात केली. तेव्हा तो वेड्यासारखा काका मला वाचवा असे ओरडू लागला. मग आम्ही पर्तीच्या प्रवासासाठी बसमधे बसलो.
घरी आलो तेव्हा शेजारचे भिंगार्डे आजोबा आमच्याकडे आले होते. (ते खडूस आहेत. आम्ही त्याना डोमकावळा म्हणतो) त्यानी माज्यावर प्रशनांची सर बत्ती केली. मी आपली आठवून आठवून कशीबशी उत्तरे दिली. त्यावर त्यानी ' शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की ? ' असे विचारले. (ते मला अजिचबात आवडत नाहित)
रात्री झोपल्यावरती मला विचित्र विचित्र अशी स्वपने पडली. एका स्वपनात तर मला वाड्याच्या दरवाजात अडकलेली पिमटी बस दिसत होती व टपावर माईणकर बसला होता. दुसर्या स्वपनामधे साखरदांडे सर भिंतीला टेकविलेल्या शिडीवर बसून चुंगम खात होते.
तर मित्रानो व मैतिरिणीनो , अशी झाली आमची आयतीहासिक वाड्याची रोमहर्शक सहल !
- आयशॉट उरफ राफा - सहावी ड


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Dec 31, 2007

शुभेच्छा !

हे नवीन वर्ष (पक्षी : २००८) आमच्या वाचकांना अत्यंत सुखाचे, उत्तुंग यशाचे व मन:शांतीचे... म्हणजे एकूणच झिम्माड वाटेल असे जावो ही शुभेच्छा !

सरत्या वर्षात आपण दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !!!

आपले नम्र,

- राफा
- आयशॉट
- राजा, प्रधानजी आणि सेवक
- उंबरकर आणि झुंबरकर
- सुधारक शेणोलीकर काका
- जगू जगदाळे

आणि

राहुल फाटक

Dec 16, 2007

अघटित ! (कथा)

“Love people, use things.. Not vice versa !” - Kelly Ann Rothaus

माणसांवर प्रेम करा नि वस्तू वापरा. माणसांना वापरू नका !

तुम्हाला आवडतात अशी वाक्यं ? ब-याच लोकाना आवडतात ! मग लक्षात ठेवून अशी वाक्य ते डायरीत टिपून ठेवतात. कधी सहज उघडून वाचण्यासाठी.

शिवाय एखाद वेळी, एखाद्या विशेष संभाषणात ही अशी वाक्य मिसळायला छानंच वाटतं. काहीना अशी वाक्य नुसती वाचून, लिहूनही समाधान वाटतं एक प्रकारचं... म्हणजे माणूस म्हणून आपली वाढ झाली आहे, एक प्रकारची परिपक्वता आली आहे... असंच काहितरी !



***

राजेशचा मूड आजकाल सकाळी सकाळी पार बिघडलेला असायचा..

आजही तेच झालं.

त्याचा चेहरा त्रासलेला.. आक्रसलेला असा. दातओठ खात त्याच्या कॉटलगतच्या भिंतीकडे बघत होता.

भिंतीवरच्या त्या घड्याळाकडे !

राजेश जितका चिडला होता तितक्याच शांतपणे भिंतीवरचं ते घड्याळ वेळ दाखवत होतं.. टिक टिक.. त्याचे निरस, निष्प्राण तास नि मिनिट काटे.. संथ लयीत काम करणारा सेकंद काटा.. त्याचा टिक टिक आवाज… तो आवाज शांत वेळी रुममधे स्पष्ट ऐकू यायचा, मोठा वाटायचा. …

टिक टिक टिक टिक.. आवर्तन चालूच होती..

साडेसात ! ठण्ण…

का ? का होतात रोज साडेसात? होतात तर होतात, हे घड्याळ का दाखवतं बरोबर वेळ?

राजेश झोपायचा त्या लोखंडी कॉटला लागून असलेली भिंत इतर भिंतीसारखीच खरबरीत पोपडे उडालेली.. तिच्यावर साधारण चारएक फुटावर एक आडवी फळी ठोकलेली होती. त्यावर काही फुटकळ सामान होतं.. आणि त्या फळीच्या थोडं वर दोन फुटावर ते जुनाट घड्याळ !

त्याने रुम भाड्याने घेतली तेव्हा जुजबी फर्निचरशिवाय फक्त हे घड्याळ होतं तिथं. अर्थातच घरमालकाच्या दृष्टीने अगदीच टाकाऊ. असून नसल्यासारखं.. म्हणूनच त्याने काढून नेलं नव्हतं बहुतेक.

ते एव्हढं जुनं अजूनही मागे पडत नव्हतं, म्हणून टाकून दिलं नव्हतं एव्हढंच. बरं एखादा सुंदर नमुना असता तर ऍंटीक पीस म्हणून तरी किंमत आली असती कदाचित, पण हे होतं अगदीच मामुली. त्यावर कसलीही कलाकुसर नाही कि रंगसंगती नाही. अगदी रेल्वे प्लॅटफॊर्मवरच्या घडयाळासारखं दिसणारं. पांढ-या वर्तुळावर काळे बोजड आकडे नि भाल्यांचे पाते वाटावेत असे मोठे टोकदार काटे…

त्या घड्याळाचा निर्जीव तटस्थपणा राजेशला आवडायचा नाही.

आपली कंटाळवाणी नोकरी, रोज सकाळी लोकल पकडून वेळेत पोचताना होणारी आपली तारांबळ, ऑफिसमधलं मलूल वातावरण.. हे असं वेळापत्रकात अडकलेलं आपलं आयुष्य.. आहे ह्या मद्दड घड्याळाला ह्याचं काही ?

आपल्या मजबूरीची ते घड्याळ जणू मजा बघतं अस राजेशला राहून राहून वाटायचं.. एखाद्या गुलामाला भाले टोचून त्याला पुन्हा एखाद्या अतिश्रमाच्या कामावर लावावं तसं ते घड्याळ आपले काटे टोचून टोचून आपल्याला हैराण करतं आहे अशी स्वप्नही कधी त्याला पडायची ! मग त्या टिकटिकीतून त्याला ते जणू ऐकू यायचं : ‘उठ ! आवर भराभर. साडेसात झाले. चल ! हात उचल.. आठ दहाला डबा भरून तयार नसेल तर गेली आठ सव्वीस ची लोकल !’ असंच काहीसं.

आजही राजेश आपल्या भकास आयुष्यावर चरफडला.. जणू सगळी त्या घड्याळाचीच सगळी चूक असल्यासारखं त्याने पुन्हा एकवार त्याकडे बघितलं… ..

आणि काहितरी पुटपुटत पांघरूण बाजूला भिरकावून तो उठला..


***

त्याच दिवशी दुपारी..

मुंबईतल्या एका पॉश एरियातली एक चकचकीत इमारत.

तळमजल्याला जाड काचेचं दार असलेलं ऑफिस. आत थंडगार वातावरण. बाहेरच्या उन्हाच्या झळा, रहदारी, गर्दी ह्यापासून सुरक्षित नि अलिप्त.

त्या थंड वातावरणात गुबगुबीत खुर्चीत आपला सुटलेला अवाढव्य देह कोंबून एक माणूस बसला होता. बरंच टक्कल पडलेला.. पण त्याची भरपाई म्हणून की काय मागे बरेच लांब केस वाढवलेला.. त्याने लावलेल्या महागड्या सेंटचा उग्र वास त्या कृत्रीम थंडीत मिसळत होता… त्याचा तो केशरी कलरचा भडक शर्ट जेमतेम त्याच्या पोटाचा घेर झाकू शकत होता.

पुन्हा एकदा त्याने फोन टेबलावर आपटलान आणि एक शिवी हासडलीन.. गेल्या एका मिनिटात तिस-यांदा अस होत होतं बहुतेक.

त्याच्या समोर टेबलापलिकडे बसलेला एक किरकोळ माणूस हसून म्हणाला “अरे केसव भाई, कायको अश्रफ का गुस्सा फोन पे निकालता है. पैसे तर त्याला द्यावेच लागतात ना..”

पण त्या टकलू माणसाचं तिथे फारसं लक्ष नव्हतं.. हातातल्या मोबाईल फोनकडे पुन्हा खुन्नस देऊन तो म्हणाला “इसकी तो.. साला चालीस हज्जार चा फोन चालत नाही. रेंजच येत नाही. हे बघ.. बघ ! आता अश्रफचा फोन आला तर त्याला वाटेल मी मुद्दाम कट करतोय..”

“केसव अरे रेंज नाही तर फोनची मिस्टेक काय त्यात ? वो कंपनी को बोलो ना..”

तेव्हढ्यात मोबाईल वाजतो. कुठ्ल्यातरी नवीन पिक्चरमधलं सवंग ‘आयटम सॉंग’ रिंगटोन म्हणून वाजू लागतं. त्या लहान ऑफिसमधे तो आवाज खूपच मोठा वाटतो. पण तो माणूस उत्तर देणार एव्हढ्यात फोन बंद पडतो !

पुन्हा एकदा तो चरफडतो. चिडून अजून दोन चार वेळा फोन आपटतो !

त्या फोनच्या कडा आपटून आपटून घासल्या गेल्या आहेत.. कडांच्या रंगाचं कोटींगही निघाले आहे. पण त्या माणसाला त्याची विशेष पर्वा नाही..

‘xxx की ! अब गया मै ! आता अश्रफचा मगज सरकला असणार.. मीच त्याला सांगितल होतं की मी कदाचित ऑफिसमधे नसेन, तर लेंड लाईन मधे नको.. मोबाईलवरच कर फोन..”

हताश होऊन तो मोबाईल पुन्हा जोरात आपटतो आणि टेबलावर भिरकावतो.

त्या फोनच्या सुंदर मॉडेलची आपटून आपटून पार रया गेली आहे. तो मोबाईल बिचारा निपचित पडून रहातो. पुन्हा उचलून आपटले जाण्याची वाट पहात..

त्या दोघांचे संभाषण चालूच रहाते…



***


राजेश पहिल्यापासून त्याच्या रुमवर एकटाच राहतो.

म्हणजे आईवडील सोलापूरला असतात. कुणी रुममेटही नाही. आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे बरोबर कुणी टिकणं शक्यही नव्हतं.. शिक्षण चालू असताना हॊस्टेलवर रहात असताना त्याच्याच लक्षात आलं होतं की आपलं सहज कुणाशी पटणार नाही. त्यामुळे पैसे वाचण्याची शक्यता असूनही त्याने भाड्याची रुम शेअर करण्याविषयी विचार केला नव्हता.

आपण चिडचिड करतो म्हणून एकटं रहाव लागतयं, का एकटं रहातोय म्हणून जास्तच चिडचिड करतो हे कधीकधी त्यालाच कळेनासं व्ह्यायच !

एकटाच रहात असल्याने बोलायला कुणी नाही. कोणाशी बोलणार ?

रुमवर भकास शांतता. फक्त डोक्यावर ते घड्याळ आणि त्याची ती अव्याहतपणे चाललेली टिकटिक !

आपण इतके धुसफुसतो, चिडून बोलतो.. एखादा माणूस असता तर आपलं काम थांबवून आपल्या बोलण्यावर काहीतरी तर प्रतिक्रिया दिली असती. अगदी उलट चिडून बोलला असता तो माणूस तरी परवडल असतं.. पण हे घड्याळ नको.

मालकाचं नसतं तर उचकटून फेकून दिलं असतन त्याने ते घड्याळ !

त्या दिवशी रात्री तो कामावरून परत आला.. त्याचं डोक पार उठलं होतं ऑफिसमधल्या कटकटीनी..

जेवून कॉटवर अंग टाकल्यावर त्या घड्याळ्याच्या टिकटिकीने हैराण झाला अगदी..

आणि मग एखाद्या भ्रमिष्टासारखा त्या घड्याळाला बोलू लागला तो.. एखाद्या माणसाशी भांडावं तसं.. अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली त्याने.. आणि मग एकदम निर्वाणीचं, निश्चयाने तो म्हणून गेला: “बास ! आता फार झालं.. उद्या सकाळी उचकटून फेकून देतो तुला.. पार गच्चीवर जाऊन खाली टाकतो.. तुकडे तुकडे होतील तुझे. तिच्यायला.. दिवसरात्र टिकटिक.. टिकटिक..”

आणि.. एकच सेकंद !

एकच सेकंद ते घड्याळ थबकल्याचा त्याला भास झाला.. अर्थात, भासच असणार ! कारण राजेशच्या धमकीने काळजाचा ठोका चुकायला ते घड्याळ काही जिवंत नव्हतं.

हे असंच काहीसं बरळत राजेश केव्हा तरी झोपून गेला…

अर्थात तो झोपला तरी घड्याळाचं काम चालूच होतं.

टिक टिक.. टिक टिक..



***


मुंबई असली तरी दोन वाजलेले असल्याने तुलनेने ब-यापैकी शांतता…

त्या आलिशान फ्लॅटची लिव्हींग रूममधे मंद झिरपणारा चंद्रप्रकाश. काचेच्या एका मोठ्या सेंटर टेबलवर पडलेला एक मोबाईल… मॉडेल नवीन आहे पण.. त्याच्या कडांचा रंग काहीसा घासला गेला आहे !

रात्रीच्या शांततेत तो मोबाईल एकदम किंचाळून वाजल्यासारखा वाजू लागतो.

तेच ते आयटम सॊंग ! तोच रिंगटोन. रात्रीच्या शांततेत तो अजूनच कर्कश वाटतो.

काही सेकंद जातात..

एक खूप जाडसा मनुष्य अडखळत लिव्हींग रुम मधे येतो. टक्कल पडलेला.. मानेवर लांब केस वाढवलेला. त्याच्या फुगलेल्या पोटावर ताणला गेलेला टीशर्ट आहे नि खाली शॉर्टस आहे. पोटापर्यंत आलेली गळ्यातली सोन्याची जाड साखळी मधेच अर्धवट प्रकाशात चमकते आहे.

तो काहीसा अडखळत चालतोय. बहुतेक तो अर्धा झोपेत आहे आणि अर्धा नशेत.

मोबाईल किंचाळतोच आहे.

शेवटी त्या आवाजाने किंचीत सावध होत तो माणूस मोबाईलपर्यंत पोचतो आणि एकदम त्याला धडधडायला लागतं…

अश्रफचा फोन असेल ?

तो नंबर बघतो.. आश्चर्य म्हणजे कुठलाच नंबर नाहीये. नुसताच फोन वाजतोय.

तो थरथरत्या हाताने फोन उचलतो.

‘हालो’ तो काप-या आवाजात म्हणतो.

‘केशव भगनानी !’

तो आवाज ऐकल्यावर भगनानी एकदम दचकतो. हा अश्रफचा आवाज नाही. त्याच्या गॅंगमधल्या कुणाचाही नाही. हा माणसाचा वाटतच नाहीये आवाज.. पण फार खतरनाक आहे. जणू मृत्यूनेच हाक मारली आहे !

पण तरीही… तरीही आपल्या ओळखीचा का वाटतोय ?

‘क.. कोण?’ भगनानीच्या तोंडाला कोरड पडलीये. आता छातीवर मणाचं ओझं ठेवल्यासारखं विलक्षण दडपण आलंय !

“मी बोलतोय !

कोण बोलतय ते कळत नाहीये. पण… तरीही थोडं लक्षात येतंय.
भगनानीला छातीत एकदम कळ आल्यासारखं होतं. हा.. हा आपल्या मोबाईलचा आवाज आहे ?

नो ! नॉट पॉसिबल !

हा आपला फक्त भास आहे. एक भयंकर भास.

तो छातीवर डाव्या बाजूला हात दाबतो..

“आता तू पुन्हा मला कधीच आपटू शकणार नाहीस ! फेकू शकणार नाहीस !”

आपण काय ऐकलं, बरोबर ऐकलं का ते भगनानीला कळत नाही.. पण तो हबकतो.. त्याच्या छातीतली कळ एकदम वाढते.. वाढतच जाते.

… आणि हळूहळू तो खाली कोसळतो.



***


तर.. आपण बोलत होतो त्या वाक्याबद्दल !

ह्या वाक्यातला साधा संदेश एव्हढाच की माणसांवर प्रेम करायच असतं. त्याना स्नेह, आदर, ममता, मित्रत्व अशा सुंदर भावनांनी जोडायच असत.. सुखाची आणि यशाची नवनवीन शिखरं गाठायला एखाद्या शिडीसारखी वापरायची नसतात माणसं !

कारण माणसं म्हणजे काही वस्तू नाहीत ! वापरायला नि वापरून फेकून द्यायला. ती आहेत जिवंत, हाडामासाची, भावभावना असलेली माणसं !

.. आणि वस्तू ?

वस्तूंचं काय ?


***


इन्स्पेक्टर मानकामे आज खूप चिंताग्रस्त चेह-याने बसले होते..

समोर असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची नजर फिरत होती. पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्टस वगैरे. त्यांच्या दहा वर्षांच्या अनुभवात एकाच दिवशी अशा विचित्र केसेस कधी आल्या नव्हत्या.

मानकामे त्या माहितीतली सुसूत्रता शोधण्याचा प्रयत्न करत होते..

नाव: राजेश चौबळ
वय : २९ वर्षे
मृत्यूची वेळ : रात्री सुमारे २.३०
मृत्यूचे कारण: ...


भयंकर ! रात्री कसल्यातरी धक्याने भिंतीवरचे घडयाळ खिळ्यापासून निसटले असावे. ते अगोदरच सैल झालेले असणार. आधी ते खिळा आणि कॉट यांच्यामधे असलेल्या फळीवर आदळले असणार. त्या जुन्या घड्याळाचे भाग तुटून वेगवेगळे झाले आणि मग ते काहीसे अवजड घड्याळ थेट राजेशच्या डोक्यात पडले. तरीही तो कदाचित वाचला असता पण विचित्र रितीने घड्याळाचे मोठे आणि अणकुचीदार दोन काटे एखाद्या हत्याराच्या पात्यासारखे त्याच्या गळ्यात आणि छातीत घुसले. तेच त्याच्या मृत्युचे कारण आहे.

विचित्र मृत्यू आहे अगदी !


नाही, म्हणजे घड्याळ पडू शकतं निसटून.. पण अगदी एखाद्याने मुद्दाम खुपसावेत तसे ते काटे त्याच्या शरीरात घुसणं म्हणजे... हॉरिबल !

जुजबी चौकशीत तरी राजेशची कुणाशी दुश्मनी असल्याचे काही समजले नव्हते.. त्यामुळे 'विचित्र अपघात' अशीच नोंद करावी लागणार बहुतेक..

आणि ही दुसरी भगनानीची केस !

केशव भगनानी
वय : ४७ वर्षे..

पुढे वाचायची गरजच नाही.. माहिती आहे चांगलाच. बी ग्रेड पिक्चरचा हा फायनान्सर. त्यासोबत नाना धंदे आणि लफडी. दोन वेळा ह्याला आपणच वॉर्निंग दिलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची डिपार्टमेंटची खात्रीच आहे!

खर म्हणजे हा भगनानी एक दिवस जायचाच होता.. पण कसा ? तर त्याच्या ऑफिसवर भाडोत्री गुंडांचा अंदाधुंद गोळीबार.. त्याच्या ऑफिसच्या काचेच्या दरवाज्याचा चक्काचूर.. आणि रक्ताच्या थारोळ्यात आत पडलेला भगनानी.

हे असच काहीतरी होणार होतं एक दिवस..

काल भगनानी गेलाच… पण हार्ट फेलने !

रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर कॉल आला एव्हढंच आठवत त्याच्या बायकोला. तो उठून फोन घ्यायला गेला आणि ब-याच वेळाने तिला जाग आली. बाहेर येऊन पहाते तो जमिनीवर पडलेला. निष्प्राण ! जोरात ऍटॅक आला असणार त्याला. हाक मारायचीही संधी मिळाली नसणार.

आधी वाटलं की, त्याला धमकीचाच फोन आला असणार…

पण तेच फार विचित्र आहे ! कारण…


कारण त्याला रात्री अकरा नंतर कुणीच फोन केलेला नाही फोन कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे ! दोनदा रिपोर्ट मागवून खात्री केली आपण…

मग… त्याचा मोबाईल वाजलेला त्याच्या बायकोने ऐकला कसा ? त्याचा मोबाईल वाजलाच कसा ?

विचारात असतानाच मानकामेनी घडयाळात पाहिलं.. दोन सतरा ! बरीच रात्र झाली… आता घरी जायला हवं..

दुस-या ऑफिसरला चार्ज देऊन मानकामे बाहेर आले. दोन कॉन्स्टेबल बसून आपसात आरामात कुजबुजत होते ते एकदम सरळ झाले. मानकामेनी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलं करुन, पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या आपल्या जुन्या मोटरसायकलकडे पाहिलं..

आणि त्यांच्या चेह-यावर लगेच त्रासिकपणा आला.

..अगदी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोनचार किक्स मारुनही मोटरसायकल चालू होईना.

xxx तिच्या.. आता साताठ वर्ष झाली वापरतोय साली ही मोटरसायकल. आधी नीट चालायची.. आता गेल्या काही दिवसातच फार त्रास देते आहे. नवी घेऊ शकतो की आपण स्वत:च्या पैशातून.. अगदी सहज. पण मग डिपार्टमेंटच्या डोळ्यात लगेच येतं आजकाल ..

नेहमीप्रमाणे सुरू होईचना तेव्हा शेवटी तडकून त्यानी मोटरसायकलला दोन चार लाथा मारल्या !

.. अजून दहा मिनिटानंतर, मानकामे अगदी घामाघूम झाल्यावर, ती एकदाची चालू झाली..

मानकाम्यानी मग पुन्हा एकदा तिला एक शिवी हासडली… आणि रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानी ती जुनी मोटरसायकल अगदी भरधाव सोडली.



***

हं.. वस्तूंचं काय ?

दचकू नका.. बरोबरच आहे तुमचं ! वस्तूंचं काय एव्हढं ? त्या फक्त हव्या तश्या वापरायच्या. बिघडल्या, तर दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. ते शक्य नसेल तर सरळ फेकून द्यायच्या.. आणि त्या जागी नवीन वस्तू आणायच्या ! ..कदाचित अजूनच उपयोगी आणि वापरायला सोप्या.

फारतर एखाद-दुसरी वस्तू आठवण म्हणून जपून ठेवायची. बास ! एव्ह्ढाच काय तो अपवाद !

बरोबरच आहे अगदी.. वस्तूंचं त्यांचं आयुष्यच मुळी माणसांच्या उपयोगासाठी. अर्थात, आयुष्य कशाला म्हणायच म्हणा.. निर्जीव निष्प्राण वस्तू त्या !

पण तुम्ही एखाद्या वेळेस वैतागलात आणि..

अं.. समजा, तुमचा कॉम्प्युटर प्रतिसाद द्यायचा बंद झाला, म्हणून किबोर्डच्या किज रागारागाने आपटून आपटून वैताग व्यक्त केलात.. किंवा टिव्हीवर सगळीकडे नुसते भिकार कार्यक्रम आहेत असं पाहून, कंटाळून अक्षरश: रिमोट फेकून द्यावासा वाटला.. एखाद वेळी दिलातही फेकून !

फार कशाला, नीट ठिणगी न पाडणा-या स्वयंपाकघरातल्या साध्या लायटरवर भडकलात आणि दातओठ खात ओट्यावर आपटलात तो दोनचार वेळा ..

तर ?

तर काय ? त्या निर्जीव वस्तू काय करणार... निमूटपणे तुमचं वागणं सहन करण्यापलिकडे !

पण.. काही सांगता येत नाही ! आता कल्पना करा ना.. मानकामे भरधाव निघाले त्यांच्या मोटर सायकलला शिव्या घालत घालत..

पण समजा, मोटरसायकल १०० च्या स्पीडला असताना एखाद्या मोक्याच्या क्षणी अगदी अनपेक्षितपणे हॅंडल लॉक झालं .. किंवा त्यांनी दाबला नसतानाही जर अचानक करकचून ब्रेक लागला तर ?

.. तर काय होईल त्यांचं ? राजेश किंवा भगनानीसारखंच काहीतरी ??? नक्कीच !

छे ! कल्पनाही करवत नाही…

म्हणून आपलं सहज सांगावस वाटलं...

Love people.. and if possible, love things too !

माणसांवर प्रेम करा.. आणि जमलंच तर.. निर्जीव, निष्प्राण वस्तूंवरही !


*****


Dec 6, 2007

वेगमर्यादापुरुषोत्तम आणि व्यक्तिमत्व !

असं ब-याच वेळा होतं..

म्हणजे काय की मी रस्त्यावरून बाकीच्या नागरिकांचे विविध घटनात्मक आणि प्रासंगिक हक्क सांभाळत माझा गाडी हाकण्याचा हक्क बजावत असतो. आणि माझ्या पुढे गाडी चालवणारा एक कुणीतरी बाबाजी कळत नकळत कलाकारी करुन माझ्या मस्तिष्काचे तापमान वाढवण्याचे यथाशक्ती प्रयत्न करत असतो. कधी कधी एखादी स्त्रीशक्ती फेम आदिमायाही त्या वाहनाला चालवत असते !

मी आता भारतीय रस्त्यांवर चालवायला चांगला(च) रुळलो आहे. (ह्या वाक्यावरून अगदी ब्रिटीश परगण्यात मी 'पला बडा हूँ' असा अर्थ घेऊ नका.. अमेरिकेतून वापसीनंतरही अडीच वर्षे झाली म्हणून म्हटले) तर ह्याचा अर्थ असा की अष्टावधानी राहणे व कुठूनही कुठलेही वाहन अथवा जिवंत ऐवज कुठल्याही वेगाने आडवा किंवा उभा येऊ शकेल हे गृहीत धरणे मला जमायला लागले आहे. अर्थातच वाहतुकीचे सर्व - 'जवळजवळ सर्व' म्हणू म्हणजे साधारण ९९.८५ % - नियम पाळणे हे काही बदललेले नाहीये. 'व्हेन इन रोम' हे शक्यतो चांगल्या बाबतीतच वापरावे !

तर अशा नगांकडून एकंदर काही माफक नियम किंवा सौजन्याची अपेक्षा मी करत नसतोच. पण मला त्यांच्या आडमुठेपणाचे अतिशय कुतूहल वाटते ! त्याच्यासमोर रस्ता मोकळा आहे. मला वाट देणे थोड्याश्या प्रयत्नांनी शक्य आहे. तरी 'उजव्या लेन' (जरा कल्पनाशक्ती वापरा) मधून हे बाबाजी साडेतीन किंवा पावणेचार च्या स्पीड ने चारचाकी हाकत असतात. रस्ता असा विचित्र असतो की भरकन डावीकडून ओव्हरटेक करणे (जे मूळातच चूक आहे) ते शक्य नसते. काही वेळा हा इसम त्याच्यापुढे दोन तीन गाड्यांचे अंतर ठेवून चालवत असतो. अशा वेळी डावीकडून ओव्हरटेक केलाच तरी तेव्हाच तो वेग वाढवून आपल्याला उजव्या लेन मधे येऊ देणार नाही अशीही शक्यता असते.

तात्पर्य, तो रस्त्याचा बादशाह असतो. आपण मांडलिक राजा असल्याप्रमाणे वागायचं असतं. संयत हॉर्न वगैरे क्षुद्र गोष्टींचा तो त्रास करून घेत नाही. रस्ता अडवण्याच्या महान कार्यापासून तो अजिबात विचलित होत नाही. अशी अडवणूक करताना (त्याच्या डोक्याच्या स्कॄची 'पिळवणूक' आकाशातला बाप करील काय ?) शिवाय 'मोबाईल कानाला लावलेला असणे' किंवा 'शेजारी बसलेल्याशी निवांतपणे गप्पा मारणे' अशा मोहक गोष्टीही तो कधी कधी करत असतो. मग अशा वेळी विधायक मार्गाने निषेध नोंदवावा का कायदा हातात घ्यावा, ह्याचा मी माझ्या त्या दिवशीच्या मन:स्थितीनुसार (आणि त्या बाबाजीच्या आकारानुसार !) विचार करत बसतो.

पण, हटकून अशा वेळी मला य! वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवतो..

जेव्हा इंटरनेट बोकाळलेले नव्हते तेव्हा (म्हणजे जग जवळजवळ रिमिक्सगाणीमुक्त होते तेव्हा आणि महाराष्ट्र आजच्यासारखाच टॅंकरमुक्त नव्हता तेव्हा ) एक ऍंटी व्हायरस संचेतन / आज्ञावली तयार करणारी कंपनी होती.. अतिशय वेगाने तिची भरभराट झाली होती, होत होती. तिच्या मुख्य कार्यकारी अधिका-याची ती मुलाखत होती. अर्थातच कंपनीतल्या कुठल्याही अत्यंत महत्वाच्या जागेसाठी शेवटची मुलाखत घेण्याचे काम तो स्वत: करायचा.

त्त्याने असं म्हटलं होतं की - हमखास काही कारणाने (लंच मिटींग वगैरे साठी) मी त्या उमेदवाराला बाहेर दूर कुठेतरी नेतो व त्याला गाडी चालवायला लागेल असे बघतो. बोलताना त्याच्या गाडी चालवण्याकडे माझे अतिशय बारिक लक्ष असते.. जे असेल ते असो, पण त्या निरीक्षणावरून जे संकेत मिळतात त्यांचा, त्याला निवडण्यामधे किंवा न निवडण्यामधे खूप वाटा असतो.

मला तेव्हा वाचून गंमत वाटली होती. कदाचित तेव्हाची ती CEO जगतातली एक नवीन फॅशन असेल, कदाचित मुलाखत रोचक करण्याची ती युक्ती असेल.. पण तेव्हा मला त्याचे म्हणणे काहिसे पटले होते.. आजकाल मला ते जास्तच पटते !

म्हणजेच एकूणात, गाडी चालवण्याच्या पद्धतीवरून माणसाचे साधारण व्यक्तीमत्व कसे आहे त्याचा काही बाबतीत अंदाज बांधता येतो असे मला वाटते.

आता ह्या बाबत काही मुद्दे आधी बघितले पाहिजेत :
१. गाडी चालवणे हे एक कौशल्य आहे, कलाही आहे. त्यामुळे एखाद्याची चित्रकला वाईट असेल किंवा एखाद्याला गुलाबाचे कलम करता येत नसेल किंवा फ्य़ुज बदलता येत नसेल तर लगेच तो माणूस अकार्यक्षम आहे असे अनुमान आपण काढत नाही, तसेच असे निरिक्षण म्हणजे काही लिटमस टेस्ट नव्हे. काही बाबतीत ढोबळ संकेत त्यावरून मिळू शकतात / शकतील एव्हढेच.
२. काही विशिष्ट बाबतीतलेच ठोकताळे आपण त्या निरिक्षणावरून बांधू शकतो. उदा. अर्थातच एखाद्याला वडा सांबार आवडते की नाही हे काही आपण जाणू शकत नाही :)
३. एखाद्याचा चेहरा किंवा पेहराव पाहून जे आपण प्राथमिक अंदाज बांधतो व ते जसे कधी कधी अगदी चुकीचे ठरू शकतात तसेच इथेही होऊ शकते. उदा. दुस-याला त्रास न देता पण अतिशय संथ गाडी चालवणारा प्रत्यक्षात 'डॅशिंग' (म्हणजे डॅश मारून जाणारा नव्हे !) असू शकतो. शिवाय वरिष्ठ किंवा जो कुणी बरोबर असेल त्यानुसार त्याच्या चालवण्याच्या पद्धतीत त्या वेळी चांगला वाईट फरक पडू शकतो.


मग ड्रायव्हिंग वरून जर अंदाज बांधायचे झाले तर साधारण बाबतीत ? त्या ड्रायव्हरच्या स्वभाव, व्यक्तिमत्वाच्या कुठल्या गोष्टी कळू शकतील ? त्यामागचे तर्कशास्त्र काय ?

मला असे वाटते की खालील गोष्टी पाहता येतील :

१. शिस्तबद्धता : वाहतुकीचे किती व कुठले नियम तो पाळत आहे. तो नियमाचा मतितार्थ आणि गरज समजून घेऊन पाळत आहे का बिनडोकपणे ? (आजकाल काही दुचाकी वाले असे करतात. उजवीकडे वळताना हात का दाखवायचा असतो ह्याची काही कारणे आहेत. ते काम ब्लिंकरनेही होऊ शकते, माफक व एक्दोनदाच हात दाखवला (कोटी अपेक्षित नाही :) ) तरी चालू शकते पण असा विचार न करता काही लोक फाडकन लांबलचक हात बाहेर काढतात. काही इंचावर असलेल्या दुस-या दुचाकीस्वाराच्या कानफटात बसायची थोडक्यात चुकते पण तो बिचारा भांबावतो निश्चित. शिवाय हात काढणा-याच्या चेह-यावर "नियम पाळला तरी हे क्षुद्र असे विचित्र नजरेने बघताहेत माझ्याकडे. खरोखरच शहराची स्थिती म्हणजे आजकाल.." असे भाव असतात. शेजा-याना भुंकून भुंकून बेजार करणारा राक्षसी कुत्रा 'पाळल्यासारखे' हे नियम 'पाळतात'.)

२. Driving is a co-operative effort. बाकीच्यांच्याही गाडी चालवण्याच्या हक्काचा तो आदर करत आहे का ? का एक मर्दूमकी दाखवण्याची संधी किंवा शर्यत म्हणून तो त्याकडे पाहतो ? पादचा-याना तो कस्पटासमान तर लेखत नाही ना ? अडवणूकीचे धोरण ठेवून रस्त्यातील वाहतूकीच्या प्रगतीला तो अडथळा तर बनत नाही ना ?

३. SWOT Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities & Threats) नजिकच्या व दूरच्या भविष्यातील संधी आणि आव्हाने : तो अर्धा सेकंद, २ सेकंद, १० सेकंद, १ मिनिट, अर्धा तास ह्यानंतरच्या आसपासच्या स्थितीबद्दल काही अंदाज बांधतो आहे का ? केव्हा वेग वाढवावा, अडथळे आधीच कसे ओळखावेत वगैरे त्याला समजते आहे का ? उदा. तो समोरुन येणारा ट्रक रस्त्याचा तो अरुंद भाग अडवणार आहे तेव्हा थोडे आधी थांबून ट्रकला जाऊ द्यावे हे त्याला कळते आहे का ? का घाईघाईने जाउन ट्रकला खिंडीत गाठून दोन्ही दिशेला वाहतूकीची कोंडी करत आणि भांडत बसण्यात त्याला रस आहे ?
पुढच्या एखाद्या रस्त्यावरच्या स्थितीचा तो अंदाज बाधतो आहे का ? त्यानुसार नेहमीचा मार्ग बदलतो आहे का ?
आपल्या गाडीची क्षमता आणि आकार ह्याचे फायदे तोटे त्याला माहित आहेत का ? त्यानुसारच तो गाडी चालवतो आहे का ?

४. सहज शक्य असले तरी पुढे जाण्याची संधी तो संथपणामुळे किंवा सुरक्षिततेला नको एव्हढे महत्व देऊन गमावतो आहे का ? (त्याचे risk appetite किती आहे आणि calculative risk घेण्याची त्याची तयारी आहे का ?)


हे अर्थातच गणिती किंवा ठोक पद्धतीने करायचे विश्लेषण नाही. एकाच दिवशीच्या निरीक्षणावरून अनुमान काढणेही पूर्ण बरोबर नाही.. परंतू वर दिल्याप्रमाणे चालकाच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंचा आणि विशिष्ट परिस्थितींमधे त्याच्या प्रतिक्रियांचा अंदाज नक्की बांधता येईल / येतो असे मला वाटते. चालकाचा common sense ही कळू शकतो (हा गुण आजकाल फार कॉमन राहिलेला नाही).


थोडक्यात नाडीपरीक्षेसारखीच ही गाडीपरीक्षाही उपयुक्त ठरु शकते.

व्हॉट से ?

Dec 4, 2007

(घरच्याघरी) विनोदाची बनवाबनवी - १





रॉबर्ट: बॉस !

अजित: येस राबट ?

रॉबर्ट: बॉस, इसको गद्दारी करते हुए हमने रंगे हाथ पकडा है ! आप कहे तो इसको लिक्वीड ऑक्सिजन मे डाल दूँ ?

अजित: नो राबट. वो आयडीया बहोऽऽऽत पुराना हो चुका है..

रॉबर्ट: तो फिर ?

अजित: उसे साफ्टवेर प्रोजेक्ट मे डाल दो. क्लायेंट उसे जीने नही देगा और पीएम उसे मरने नही देगा !


- राफा

Nov 23, 2007

नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !

१. जुनी नोकरी :

भगवान के लिए मुझे छोड दो !


२. नवीन नवीन नोकरी :

जैसा मैने सोचा था, बिलकुल वैसाही पाया तुम्हे !



३. न मिळालेली नोकरी :

तुम मेरी दोस्ती तो क्या दुश्मनी के भी काबिल नही हो !



४. नोकरीत हातात नारळ मिळणे (अर्थात Lay-off !) :

वही हुआ जिसका डर था !



५. (चांगले उमेदवार न मिळाल्याने) अगतिक झालेली HR वाली:

बाबू, पूनममासी की रात को अगर तुम पहाडी पे न आये, तो मै कूदकर अपनी जान दे दूंगी !



६. आंतरराष्ट्रीय कंपनीत पहिला दिवस (Induction) :

हमारा फैला हुआ कारोबार है... और ये देखो, जहांतक नजर जाये, सब अपनी ही जमीन है !



७. (नको ते) लाड पुरवणारी कंपनी :

तुम्हे काम का बोझ बहुत है । ऐसा करो, कुछ दिनोंके लिए स्विट्झर्लैंड हो आओ !



८. employee about to abscond (to US ?) :

इससे पहले के किसीको कानोकान खबर हो, हम इस मुल्क से हजारो मिल दूर होंगे !



९. Best employee award घेता / देताना :

मैने क्या किया है, एक अच्छे शेहेरी होने के नाते ये तो मेरा फर्ज था की...
.. काश इस देश का हर नौजवान इसी तरह सोचे तो..



१०. Quality Audit :

तमाम गवाहोंको मद्दै नजर रखते हुए ये अदालत इस नतिजेपे पहुची है की..


११. अनपेक्षितरित्या व प्रमाणाबाहेर वाढलेला प्रोजेक्टचा स्कोप :

मैं तुम्हारे बच्चे की ... !!!

 

-- राफा